Nilesh Rane: 'बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे, नितेशने जपून बोलावे...', 'त्या' वक्तव्यावरून निलेश राणेंचा भावाला सल्ला
Nilesh Rane: नितेश राणे यांचे बंधू निलेश राणे यांनी आपल्या भावाला 'नितेशने जपून बोलावे' असं म्हणत सल्ला दिला आहे.

मुंबई: वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असलेले भाजप नेते आणि राज्याचे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पुन्हा एकदा आपल्या आक्रमक भाषणशैलीतून शिवसेनेला इशारा दिला आहे. धाराशिव जिल्ह्यात भाजपच्या मेळाव्यात बोलताना राणेंनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. जिल्हा नियोजन समितीच्या कामांवर स्थगिती मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी थेट चेतावणी देत भाजपचा प्रभाव अधोरेखित केला. नितेश राणे म्हणाले, "सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा." त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले असून, विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्यांनी पुढे असेही म्हटले की, "कोणी कितीही ताकद दाखवली, कोणीही कसेही नाचले तरी देशात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान आणि राज्यात देवेंद्र फडणवीस हेच खरे मुख्यमंत्री आहेत." या पूर्वीही नितेश राणे यांनी पोलिसांनाही थेट दम दिल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे मंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीकडून वारंवार सामाजिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य होत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. यावरती विरोधक टीका करत असतानाच आता नितेश राणे यांचे बंधू निलेश राणे यांनी आपल्या भावाला 'नितेशने जपून बोलावे' असं म्हणत सल्ला दिला आहे.
नितेशने जपून बोलावे...
निलेश राणे यांनी सोशल मिडिया एक्सवरती पोस्ट लिहली आहे, पोस्टमध्ये, नितेशने जपून बोलावे... मी भेटल्यावर बोलेननच पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे. सभेत बोलणं सोपं आहे. पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही, असंही निलेश राणे यांनी म्हटलं आहे.
नितेश ने जपून बोलावे... मी भेटल्यावर बोलेननच पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 7, 2025
सभेत बोलणं सोपं आहे पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे.
आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही.
नेमकं काय म्हणाले नितेश राणे?
धाराशिव जिल्हा नियोजन समितीमधील निधीवाटपाच्या स्थगितीवर बोलताना नितेश राणे यांनी घटक पक्षांना गर्भित इशारा दिला. कुणी कितीही ताकद दाखवली, कसेही नाचलं तरी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बसलाय हे लक्षात ठेवा असा दमच नितेश राणेंनी दिला. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असले तरी धाराशिवच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाहीत. म्हणूनच, जिल्हा नियोजन समितीच्या कामांना स्थगिती मिळाल्याचं राणेंनी म्हटलं. धाराशिवमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून भाजप आणि शिवसेनेत सुप्त संघर्ष आहे. शिवसेने नेते असलेल्या पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या कामांना भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या तक्रारीनंतर स्थगिती देण्यात आली आहे. त्याच, अनुषंगाने भाजपच्या मेळाव्यात बोलताना नितेश राणेंनी शिवसेना नेत्यांना थेट इशाराच दिलाय.
सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय सगळ्यांनी लक्षात ठेवा, अशी धमकीच त्यांनी स्थानिक शिवसेना नेत्यांना दिली आहे. कुणी कितीही ताकद दाखवली , कोणीही कसेही नाचले तरी देशात भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्याचं लक्षात ठेवा, असेही ते म्हणाले.























