Sanjay Raut Book Narkatla Swarg: 'संजयजी बोलीये...' ईडीने मित्रांच्या घरी धाड टाकताच संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; नेमकं काय संभाषण झालं?
Sanjay Raut Book Narkatla Swarg: 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकातील काही महत्त्वाचे खुलासे समोर आले होते.

Sanjay Raut Book Narkatla Swarg: मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या बहुचर्चित 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकाचं (Narkatla Swarg) आज प्रकाशन आहे. आज सायंकाळी 6 वाजता पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरमध्ये तिथे होणार. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे, शरद पवार, जावेद अख्तर उपस्थित राहणार आहेत. पत्राचाळ प्रकरणात ईडी चौकशीनंतर संजय राऊत यांनी आर्थर रोड कारागृहात शंभर दिवस तुरुंगवास भोगला. यावेळी कारागृहात असताना संजय राऊत यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. संजय राऊतांनी तुरुंगातील अनुभव यामध्ये मांडले आहेत. अनेक राजकीय दृष्ट्या खळबळजनक दावे या पुस्तकात पाहायला मिळताय. शिवाय काही गौप्यस्फोटसुद्धा या पुस्तकात करण्यात आले आहेत. एबीपी माझाच्या हाती नरकातला स्वर्ग या पुस्तकाची प्रत आहे.
'नरकातला स्वर्ग' या पुस्तकातील काही महत्त्वाचे खुलासे समोर आले होते. यात शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरेंनी संकटकाळी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना संकटकाळी कशाप्रकारे मदत केली याबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले होते. आता पुस्तकातील नवीन खळबळजनक खुलासा समोर आला आहे. आपल्यावरील कारवाईबाबत ईडी अधिकाऱ्यांवर वरून कोणाचा तरी दबाव होता असा दावा खासदार संजय राऊत यांनी केलाय. ईडी अधिकाऱ्याने वरती बोलून घेण्याचा सल्लाही संजय राऊतांना दिला होता, असं राऊत आपल्या नरकातला स्वर्ग या पुस्तकात म्हणतात. मात्र आपल्या वरती केवळ बाळासाहेब ठाकरे आहेत असं राऊत यांनी त्या अधिकाऱ्याला सुनावलं असं त्यांनी पुस्तकार नमूद केलंय.
छापे पडताच संजय राऊतांचा थेट अमित शाह यांना फोन-
पुस्तकात खासदार राऊतांनी अनेक दावे केले आहेत. आपल्याला ईडीकडून अटक होण्याआधी मित्रपरिवाराला त्रास दिला जात होता असा दावा संजय राऊत यांनी केलाय. फेब्रुवारी 2022 मध्ये संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत आणि सुजित पाटकर यांच्या घरावर ईडीचे छापे पडले. दिवसभर हे छापे सुरू राहिले. या छाप्यांनंतर खासदार संजय राऊत यांनी थेट गृहमंत्री शाह यांना फोन लावला आणि हवं तर थेट आपल्याला अटक करा, पण निकटवर्तियांना, कुटुंबाला का त्रास देता असा सवाल केला. संजय राऊत आणि अमित शहा यांच्या फोनवरील संवादात नेमकं काय घडलं? संजय राऊत यांच्या अडचणी कशा वाढल्या? हे या पुस्तकातून राऊत यांनी मांडला आहे.
संजय राऊत आणि अमित शाह यांच्यासोबत नेमकं काय संभाषण झालं?
संजय राऊत- मला गृहमंत्र्यांशी बोलायचे आहे, मी संजय राऊत बोलतोय...
गृहमंत्री कार्यालय कर्मचारी- एक मिनिट देता हूँ... थोड्यावेळात समोरुन उत्तर मिळाले, गृहमंत्री महत्वाच्या बैठकीत आहेत. मोकळे झाले की ते तुम्हाला फोन करतील...
संजय राऊत- अर्जेंट है...
संजय राऊत यांच्यासोबत दिल्लीतील घरी उपस्थित मित्र हादरले आणि त्यांनी संजय राऊत यांना विचारलं, तु्म्ही हे काय करताय?
संजय राऊत- काहीच नाही, मी राज्यसभा सदस्य आहे, मी गृहमंत्र्यांशी भेटू आणि बोलूही शकतो...
दहा मिनिटांनी गृहमंत्रालयातून फोन आला...
गृहमंत्री कार्यालय कर्मचारी- गृहमंत्रीजी बात करना चाहते है...
अमित शाह- संजयजी बोलीये...आपने फोन किया था...
संजय राऊत- अमित भाई, आपले राजकीय भांडण आहे आणि तु्म्ही मला त्यासाठी टार्गेट करु शकता. मला टार्गेट करायचे असेल तर मी या क्षणी दिल्लीत आहे...ईडीला सांगा, मला अटक करा...माझ्यासाठी इतर निरपराध लोकांना का त्रास देताय?, त्याने काय साध्य होणार आहे?...आज कारण नसताना माझ्या मुंबईतील मित्रांच्या घरावर धाडी घातल्या, त्यांना ईडीवाले उचलून घेऊन गेले...
अमित शाह- संजय भाई, मुझे कुछ भी जानकारी नहीं...मै देखता हूँ...
संजय राऊत- सर आपण गृहमंत्री आहात...राज्यसभा सदस्यांसंदर्भात कारवाई सुरु आहे...
एवढं ऐकून घेतल्यानंतर अमित शाह यांनी फोन ठेवला आणि त्यानंतर संजय राऊत यांना भाजपचे आमदार आशिष शेलार यांचा फोन आला.
आशिष शेलार- संजयजी, काय प्रकरण आहे, मला अमित भाईंचा फोन होता...समजून घ्या, म्हणाले...
संजय राऊत- आशिष, गृहमंत्र्यांना सगळा विषय माहिती आहे. त्यांच्या संमतीशिवाय हे शक्य नाही...प्रवीण आणि सुजित यांना तु देखील ओळखतोस...माझे म्हणणे आहे, सरळ मला अटक करा आणि सुडाचा कंडू शमवा..इतरांना कशाला छळताय?



















