Ajit Pawar: सारखं माफ, सारखं फुकट, आम्हाला निवडून यायचं होतं म्हणून आम्ही बोललो; कर्जमाफीवरून अजितदादा पुन्हा बोलले!
अजित पवार यांनी अतिवृष्टीच्या मदतीवरूनही भाष्य केले. ते म्हणाले की, अनेक ठिकाणी नुकसान झालं आहे. पंचनामे वाढत आहेत. 32 हजार कोटींचा आकडा 40 हजार कोटींवर गेला आहे.

Ajit Pawar on Farmer Loan Waiver: राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून बच्चू कडू, राजू शेट्टींसह अत्यंत आक्रमक पवित्रा घेत महायुती सरकारला वायदा देण्यास भाग पाडलं. सरकारकडून पुढील सहा महिन्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. दुसरीकडे, याच मुद्यावरून आता उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा बोलले आहेत. आज अजित पवार यांनी शून्य टक्के व्याजदराने पैसे दिल्यानंतर तुम्ही कर्ज फेडा ना? असे म्हटले आहे. यापूर्वी कर्जमाफीवरून अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यांवरून वाद निर्माण झाला आहे. त्यांना जाहीर सभांमधूनही कर्जमाफीवरून विचारणा झाली आहे.
साहेबांनी एकदा कर्जमाफी दिली
अजित पवार कर्जमाफीवरून म्हणाले की, शून्य टक्के व्याजदराने पैसे दिल्यानंतर तुम्ही कर्ज फेडा ना? की सारखं माफ, सारखं फुकट, सारखं माफ, साहेबांनी एकदा कर्जमाफी दिली. आता आम्हाला निवडून यायचं होतं म्हणून आम्ही बोललो. त्यासाठी काही पैसे खर्च करावं लागतं ना? असे अजित पवार म्हणाले. दरम्यान, अजित पवार यांनी अतिवृष्टीच्या मदतीवरूनही भाष्य केले. ते म्हणाले की, अनेक ठिकाणी नुकसान झालं आहे. पंचनामे वाढत आहेत. 32 हजार कोटींचा आकडा 40 हजार कोटींवर गेला आहे.
दरम्यान, कर्जमाफीवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला आहे. त्यांनी सहा महिन्यांच्या विलंबावरून सवाल केला आहे. उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की, कर्जाच्या डोंगराखाली शेतकरी खचला आहे. निसर्ग कोपलाच आहे. त्यात संवेदना नसलेल्या सरकारचा तुघलकी कारभारः अशा अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सरकारने लोणकढी थाप मारून वेळ काढायचा प्रयत्न केला आहे. कर्जमाफीसाठी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांना जे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे त्यातून पुढील प्रश्नांची उत्तरे मिळतील काय? शेतकऱ्यांची दैनावस्था समोर दिसत असताना तुमची परदेशी समिती नेमका कसला अभ्यास करून अहवाल देणार? पुढच्या वर्षी जूनमध्ये जर खरंच कर्जमाफी होणार असेल तर आत्ताच्या कर्जाचे हप्ते भरायचे का? पुढील वर्षी जुनच्या कर्जमाफीत है हप्ते माफ होणार असतील तर ते का भरायचे? ते न भरता शेतकऱ्यांना रब्बीसाठी कर्ज मिळणार आहे का? जर नव्याने कर्ज मिळणार असेल तर ते देखील माफ होणार का? या प्रश्नांची उत्तरे कोण देणार?
आणखी 'योग्य वेळ' कोणती असू शकते?
इतर मदत करण्याआधी खरडून गेलेली जमीन पूर्ववत करण्यासाठी शेतकरी माती मागतो आहे. पण त्याविषयी सरकार काहीच करायला तयार नाही. जगाचे पोट भरणारा शेतकरी आज भयंकर संकटात सापडला आहे. पाऊस अजूनही शेतकयांची पाठ सोडायला तयार नाही. सरकाराचे हजारो कोटींच्या नुकसानभरपाईची घोषणा केली; पण शेतकऱ्यांच्या खात्यावर किती पैसे जमा झाले हा प्रश्नच आहे. महाराष्ट्रात सहा महिन्यांपासून पाऊस पडतो आहे. शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. कर्जमुक्ती देण्याची यापेक्षा आणखी 'योग्य वेळ' कोणती असू शकते? तरीही योग्य वेळ आल्यावर कर्जमुक्ती देऊ असे सांगून सरकारने जो वेळकाढूपणा चालवला आहे, ती शेतकन्यांची क्रूर चेष्टा आहे. मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातून सातत्याने शेतकरी आत्महत्यांच्या बातम्या येत आहेत. आत्महत्यांचे हे वाढते आकडे सरकारच्या कानावर आदळत नाहीत काय?
मुहूर्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे
तरीही सरकारने कर्जमुक्तीसाठी पुढच्या वर्षी जूनचा मुहूर्त काढावा, हे चीड आणणारे व शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे. कर्जमुक्तीसाठी चालढकल करून हे सरकार शेतकऱ्यांना मृत्यूच्या दारात ढकलत आहे. जूनपर्यंत होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची जबाबदारी सरकार घेणार आहे काय? सरकार शेतकऱ्यांना केवळ खेळवत आहे. थोडक्यात शेतकऱ्याऱ्यांच्या आत्ताच्या हालअपेष्टा तशाच राहणार, पुढच्या जूनचा गुळ सरकारने शेतकऱ्यांच्या कोपराला लावला आहे. आत्ता आवाज करायचा नाही असेच बहुदा सरकारला सांगायचे असावे. शेतकयांना फसवण्याचचे हे खेळ बंद करा आणि अभूतपूर्व संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना न झुलवता तत्काळ कर्जमुक्त करा, असे आम्ही मायबाप सरकारला शेतकऱ्यांच्या वतीने हात जोडून सांगत आहोत!
इतर महत्वाच्या बातम्या























