Santosh Bangar: आमदार संतोष बांगरांनी सर्व नियम बसवले धाब्यावर; महिला मतदाराला बटन दाबण्यास सांगितलं, घोषणाबाजी अन् फोनवर गप्पा, मतदान केंद्रावर नेमकं काय घडलं?
Santosh Bangar: शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप केला जात आहे.

Santosh Bangar: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधूमाळी सुरु असून अनेक ठिकाणी आज सकाळपासूनच उत्साहात मतदान सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघातही नागरिक मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडले आहेत. मात्र, याच ठिकाणी शिवसेना गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत असून त्याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे.
Santosh Bangar: नेमकं काय घडलं?
सकाळी हिंगोली शहरातील मंगळवारी बाजार परिसरातील मतदान केंद्र क्रमांक ३ येथे आमदार बांगर यांनी मतदानाचा हक्क बजावला. या वेळी त्यांनी मतदान कक्षात जाऊन प्रत्यक्ष बटन दाबताना एका महिला मतदाराला मार्गदर्शन केले. मतदान केंद्रात “स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो, एकनाथ शिंदे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं” अशा घोषणाबाजी केल्याचेही व्हिडिओमध्ये दिसून आले आहे. तर संतोष बांगर यांनी मतदान केंद्रात फोन देखील वापरला. मतदान केंद्रात घोषणाबाजी करणे, मोबाईल फोन वापरणे किंवा कुठल्याही प्रकारे निवडणूक गोपनीयतेचा भंग करणे हे आचारसंहितेचे गंभीर उल्लंघन मानले जाते. त्यामुळे बांगर यांच्या या कृत्यावर निवडणूक विभागाकडून कारवाईची मागणी होत आहे.
Santosh Bangar: निवडणूक अधिकाऱ्यांकडून गंभीर दखल
या प्रकरणाची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली असून तातडीने अहवाल मागविण्यात आला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, गोपनीयतेचा भंग झाल्याचे प्राथमिक अहवालात आढळल्यास आमदार संतोष बांगर यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे संतोष बांगर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आता या प्रकरणात नेमकी काय कारवाई होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Election: कळमनुरीतील मतदान केंद्रावरील evm मशीन बंद
दरम्यान, हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी नगरपालिका निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली असून उर्दू हायस्कूल या ठिकाणी मतदान केंद्र क्रमांक आठ येथे ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया पूर्णपणे थांबली आहे. दरम्यान मतदान थांबल्यामुळे मतदारांमध्ये एकच गोंधळ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मागील अर्ध्या तासांपासून मतदान प्रक्रिया थांबली असून निवडणूक अधिकाऱ्यांच्या वतीने मतदान केंद्रावरील मशीन बदलण्याची प्रक्रिया केली जात आहे.
आणखी वाचा























