निवडणुकीला महायुती फिस्कटली, नितेश राणेंमुळेच सिंधुदुर्गात युती नाही; दीपक केसरकरांनी स्पष्टच सांगितलं
निवडणूक आयोगाने राज्यातील 246 नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांची घोषणा केल्यानंतर राजकीय पक्षाकडून तयारी सुरू आहे

सिंधुदुर्ग : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात महायुती करण्यास पालकमंत्री नितेश राणे इच्छुक नाहीत, त्यामुळे युती होऊ शकली नाही, अशी माहिती आमदार दीपक केसरकर (Deepak kesarkar) यांनी दिली आहे. त्यामुळे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती एकत्र निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट झालं आहे. यापूर्वी, मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनीही याबाबत माहिती देताना स्वबळाची तयारी असल्याचे म्हटले होते. आता, राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांची घोषणा झाली असून राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. विशेष म्हणजे पुढील 10 दिवसांत उमेदवारांची नावे जाहीर करत अर्ज देखील भरावे लागणार आहेत.
निवडणूक आयोगाने राज्यातील 246 नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांची घोषणा केल्यानंतर राजकीय पक्षाकडून तयारी सुरू आहे, राजकीय पक्षाचे नेते उमेदवार निश्चित करण्यात व्यस्त असताना, महायुती, महाविकास आघाडीचा घोळ अद्यापही कायम आहे. मात्र, काही जिल्ह्यात महायुतीत फूट पडल्याचं दिसून येत आहे. त्यामध्ये, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, बीड, जळगाव जिल्ह्यात स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. सिंधुदुर्गात मंत्री नितेश राणेंनी भाजप स्वबळावर निवडणूक लढवेल असे म्हटल्यानंतर आता शिवसेनेनंही दंड थोपटले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे इच्छुक नसल्याने युती झाली नाही. आमदार दिपक केसरकर यांनी तसा खुलासा केला आहे. युतीसाठी उदय सामंत आणि मी मुख्यमंत्र्यांना भेटलो. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना सुद्धा भेटलो. मात्र, पालकमंत्री नितेश राणे बहुदा इच्छुक नसल्याने युती झाली नाही, असा खुलासाच आमदार दीपक केसरकरांनी केला आहे.
काय म्हणाले होते नितेश राणे
भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना काल पालकमंत्री नितेश राणेंनी ताकद भाजपची असल्यामुळे स्वबळावर निवडणुका झाल्या पाहिजेत. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या तशा भावना आहेत, आपला झेंडा फडकला पाहिजे. संपूर्ण कोकणात एकही विधानसभेची जागा दाखवा जी भाजपच्या ताकदीशिवाय कोणी आमदार होऊ शकला का? असा प्रश्नही राणेंनी उपस्थित केला होता. सिंधुदुर्गात असा एकही मतदारसंघ नाही, असंही नितेश राणेंनी म्हटलं होतं.
जळगावमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून स्वबळाचा नारा
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या निर्धार मेळाव्यात आमदार किशोर पाटील यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता. भाजपच्या बंडखोरांना पुन्हा पक्षात घेतल्याबद्दल त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. “महायुतीच्या एक वर्षाच्या काळात आमदारांना एक फुटकी कवडीही मिळाली नाही,” असा टोला लगावत त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला. “शिवसेनेच्या पाचही आमदारांनी ठरवलं, तर जळगाव जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा अध्यक्ष बसणार. भाजपचे नेते युतीबद्दल बोलतात पण हे कधी पलटी खातील, याचा भरोसा नाही,” असे म्हणत किशोर पाटील यांनी स्वबळाचा नारा दिलाय.
हेही वाचा
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन घोटाळाप्रकरणी तहसीलदारांचे तात्काळ निलंबन, मुख्यमंत्र्यांचे आदेश
























