मुख्यमंत्र्यांवर आम्हाला विश्वास नाही, शरद पवारांनी मराठा समाजाला समजावलं तर...; लक्ष्मण हाकेंचं आवाहन
समाजात विस्कळीत झालेली घडी बसवायची असेल तर त्यांनी पुढे आले पाहिजे. पवार साहेबांनी पुरोगामी भूमिका घेतली पाहिजे, असे लक्ष्मण हाके म्हणाले.
पुणे : ओबीसी कार्यकर्ते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी देखील पवारांनी आरक्षणाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावं असं आवाहान केलंय. मुख्यमंत्र्यांवर आम्हाला एक टक्क्याचाही विश्वास नाही. शरद पवारांनी (Sharad Pawar) मराठा समाजाला (Maratha Reservation) समजावलं तर तोडगा निघेल, असं थेट आवाहन हाके यांनी केलंय. छगन भुजबळांनी अचानक घेतलेल्या शरद पवारांची भेट घेत मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राज्यातलं वातावरण गढूळ झालं आहे, तुम्ही लक्ष घाला,असं आपण पवारांना सांगितलं, असा दावा भुजबळांनी केला आहे. त्या भेटीनंतर लक्ष्मण हाकेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
लक्ष्मण हाके म्हणाले, मुख्यमंत्र्यांवर आम्हाला एक टक्क्याचाही विश्वास नाही. जाणता राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवारांनी इलेक्शन मोड मधून बाहेर येऊन या प्रश्नाकडे गांभीर्याने बघितलं पाहिजेत. शरद पवार यांची भूमिका अजूनही स्पष्ट करत नाहीत. त्यांनी जर मराठा समाजाला समजून सांगितलं तर नक्कीच यातून तोडगा निघू शकतो. ग्रामीण भागामध्ये समाजात तेढ वाढायला लागले आहेत, हे अगदी खरं आहे. शरद पवारांनी या अगोदर देखील आरक्षणाच्या संदर्भात लक्ष घातलं होतं. आता सुद्धा त्यांनी लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावायला हवा.
शरद पवारांनी पुढे आले पाहिजे : लक्ष्मण हाके
लक्ष्मण हाके म्हणाले, समाजातील भटक्या, विमुक्त जाती जमातीचे हक्काचे जे आहे, जे संविधानात्मक, कायदेशीर आरक्षण आहे याचे कुठेतरी संरक्षण झाले पाहिजे, ही आमची भूमिका आहे. छगन भुजबळ कायम ओबीसी समाजाच्या बाजूने उभे राहिले आहेत. आता आम्हाला शरद पवारांकडून अपेक्षा आहे. कारण शरद पवारांना महाराष्ट्राचे जाणता राजा म्हटले जात आहे. शरद पवारांनी मंडल आयोग अंमलबजावणीसाठी मोठी भूमिका घेतली आहे. गावगाड्यामध्ये मराठा समाजाकडून वेठीस धरले जात आहे.जरांगे पाटील आव्हान देत असताना शरद पवारांनी पुढे आले पाहिजे.
शरद पवारांनी पुरोगामी भूमिका घेतली पाहिजे: लक्ष्मण हाके
मी सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून वेळोवेळी शरद पवार आपली भूमिका का मांडत नाही ही भूमिका मांडली आहे. त्यामुळे शरद पवारांनी पुढे आले पाहिजे. ग्रामीण भागामध्ये प्रचंड सामाजिक दरी निर्माण झाली आहे. ओबीसी आणि भटक्या जाती कधीही शांतता, सुव्यवस्था बिघडवत नाही. पवार साहेबांनी पुढे आले पाहिजे. समाजात विस्कळीत झालेली घडी बसवायची असेल तर त्यांनी पुढे आले पाहिजे. मी पवार साहेबांना आवाहन करत आहे. पवार साहेबांनी पुरोगामी भूमिका घेतली पाहिजे, असे लक्ष्मण हाके म्हणाले.