Pahalgam Terror Attack : केवळ एका मॅगीमुळे वाचला पर्यटकांचा जीव! नाशिककरांनी सांगितला पहलगाम हल्ल्याचा थरारक अनुभव; म्हणाले, गोळीबार सुरु झाल्यानंतर...
Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात 26 पर्यटक ठार झाले. या हल्ल्यावेळचा अनुभव नाशिकच्या पर्यटकांनी सांगितला आहे.

Pahalgam Terror Attack : काश्मीरच्या (Kashmir) निसर्गरम्य घाटांत फिरायला गेलेल्या नाशिकच्या (Nashik News) पर्यटकांच्या सहलीचं रूपांतर काही क्षणांतच थरार आणि भीतीने भरलेल्या दु:स्वप्नात झालं. पहलगाम (Pahalgam) येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Terrorist attack) हे पर्यटक केवळ नशिबाने बचावले. मॅगी खाण्याच्या एका क्षुल्लक निर्णयामुळे त्यांचे प्राण थोडक्यात वाचले आहे.
एबीपी माझाशी बोलताना सागर चौगुले, अनिकेत कोठुळे आणि सागर कोठुळे या पर्यटकांनी आपला अनुभव अत्यंत थरारक शब्दांत कथन केला आहे. हल्ल्याच्या क्षणी नाशिकचे हे पर्यटक हल्ल्याच्या अगदी आसपास होते. भारतीय नौदलाचे अधिकारी विनय नरवाल हे या पर्यटकांच्या अगदी पुढे चालले होते. काही क्षणांतच गोळीबार सुरू झाला. वातावरणात एकच सैरभैर उडाली. लोक इकडे तिकडे धाव लागले, असे त्यांनी सांगितले.
महिलांना अंगावरील दागिने, टिकली काढायला लावली
ते पुढे म्हणाले की, स्थानिक लोकांनी घाबरलेल्या स्वरात सांगितले की, दोन लोग दफन हो गये, हे ऐकताच आम्ही तिथून माघारी फिरण्याचा निर्णय घेतला. स्थानिकांनी महिलांना त्यांच्या अंगावरील दागिने, कपाळावरील टिकली काढायला लावली. हिंदू ओळख टाळण्यासाठी डोळ्यांत सुरमा घालण्यास, बुरखा परिधान करण्यास सांगितले गेले. "हिंदू नाव अजिबात सांगू नका, असे त्यांनी म्हटले होते. हल्ल्याचे भय एवढे तीव्र होते की, आमच्यासोबत असणाऱ्या काही महिला अजूनही मानसिक धक्क्यातून सावरलेल्या नाहीत आणि त्या आजारी पडल्या आहेत.
केवळ मॅगीमुळे वाचला पर्यटकांचा जीव
तर धक्कादायक प्रसंगातही एक विलक्षण घटना घडली, जिच्यामुळे पर्यटकांचे प्राण वाचले. "आम्ही पुढे निघणार होतो, पण एकदा खाल्लेली मॅगी खूपच आवडली, म्हणून पुन्हा मॅगी खाण्यासाठी थांबलो आणि त्याचवेळी समोर हल्ला झाला. जर ती मॅगी खायला थांबलो नसतो, तर आम्ही त्याच ठिकाणी असतो, जिथे गोळीबार झाला," असे पर्यटकांनी सांगितले आहे. दरम्यान, हा प्रसंग पर्यटकांच्या मनावर इतका खोलवर कोरला गेलाय की, या पर्यटकांनी आता पुन्हा कधीही काश्मीरला जाणार नाही, असा निर्णय घेतला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या























