Raj Thackeray: वंदे मातरमवर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला... मनसेप्रमुख राज ठाकरे संतापले, स्पष्टच सुनावलं
Raj Thackeray on Vande Mataram: राज ठाकरे यांनी राज्यातील लहान मुलं पळवण्याच्या वाढणाऱ्या घटनांबद्दल संताप व्यक्त केला. केंद्र सरकारच्या संसदेतील वंदे मातरमच्या चर्चेवर नाराजीचा सूर

Raj Thackeray: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात लहान मुलं आणि मुली पळवण्याच्या अनेक घटना वारंवार समोर येत आहे. यापैकी अनेक मुलांचा पत्ताही लागत नाही. गेल्या काही वर्षांमध्ये हे प्रमाण वाढले असूनही राज्य सरकार किंवा पोलिसांकडून याविरोधात ठोस अशी कोणतीही कृती होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून या प्रकाराबद्दल चिंता आणि संताप व्यक्त केला आहे. हिवाळी अधिवेशनात सभागृहात उत्तर द्यायला मंत्री उपस्थित नसतात तिथे मी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर चर्चा होण्याची अपेक्षा व्यर्थ आहे, असा सात्विक संताप राज ठाकरे यांनी व्यक्त केला. तसेच संसदेत वंदे मातरमच्या (Vande Mataram) चर्चेसाठी 10 तास खर्ची घालणाऱ्या केंद्र सरकारलाही राज ठाकरे यांनी खडे बोल सुनावले आहेत. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Raj Thackeray letter: राज ठाकरेंनी पत्रात नेमकं काय म्हटलंय?
सस्नेह जय महाराष्ट्र,
एका अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर विषयाकडे तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे लिहीत आहे. महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं, ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतं आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार जरी गेलं तरी हे प्रमाण 2021 ते 2024 या काळात जवळपास 30% नी वाढलं आहे. लहान मुलांना पळवून, नंतर त्यांना कामाला जुंपणाऱ्या, त्यांना भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्य टोळ्या तयार झाल्या आहेत. आणि या टोळ्या सर्रास लहान मुलं पळवत आहेत आणि यावर सरकार नक्की काय कारवाई करत आहे हेच समजत नाही.
लहान मुलं पळवण्याच्या अमुक केसेस दाखल होतात आणि त्यातली इतकी टक्के मुलं परत शोधली जातात आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे सुखरूप परत पाठवली जातात अशा आशयाचं सरकारी उत्तर यावर महाराष्ट्राला नको आहे. मुळात एनसीआरबी जे आकडे सांगत आहे ते आकडे म्हणजे किती पालकांनी पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या आहेत त्याचा तपशील सांगितला जातो, पण अशा काही हजार तक्रारी पोलिसांपर्यंत पोहचत तरी असतील का ? आणि समजा मुलं पुन्हा सोडवून आणली तरी त्या काळात लहान मुलांच्या मनावर जो आघात होतो, त्याचं काय ? मुळात मुलं पळवून नेणारी टोळी कार्यरतच कशी होते आणि ती इतक्या राजेरोसपणे काम कशी करते ?
यावर काहीतरी जबरदस्त कृती करावी असं सरकारला वाटत नाही ? आज आपण रस्त्यावर, स्टेशनवर, बसस्टँडवर लहान मुलं भीक मागताना बघतो, ती कोण आहेत ? त्यांच्या सोबतचे जी माणसं भीक मागत असतात ते खरंच त्यांचे आई-वडील असतात का ? याचा तपास किंवा वेळ पडल्यास अगदी डीएनए टेस्ट करावी असे आदेश सरकारला द्यावेसे का वाटत नाही ?
आज या राज्यात लहान मुलं पळवली जात आहेत, तरुण मुली पळवल्या जात आहेत, महाराष्ट्रातल्या जमिनी पळवल्या जात आहेत , यावर विधिमंडळात चर्चा व्हावी, त्यावर एकमुखाने काही पाऊलं उचलायला प्रशासनाला भाग पाडावं असं सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना वाटत नाही का ? हिवाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या चुकलेल्या अंदाजपत्रकाला ठिगळ लावण्यासाठी पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्याची सोय इतकंच प्रयोजन आहे का ? अधिवेशनात अनेकदा उत्तरं द्यायला मंत्री सभागृहात नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे लहान मुलं असोत की गायब होणाऱ्या मुली अशा विषयावर विधिमंडळात चर्चा होईल अशी अपेक्षा करणं पण अवाजवी वाटेल अशी परिस्थिती आहे. पण महाराष्ट्राची ही अपेक्षा आहे. खरंतर केंद्र सरकारने हा विषय सगळ्या राज्यांशी बोलून या विषयात कृतिगट तयार करायला हवा, पण सध्या वंदे मातरम वर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला मातांचा आक्रोश ऐकू येत असेल असं वाटत नाही !
असो. आज राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने तुम्ही लक्ष घालून, फक्त अधिवेशनात यावर चर्चा घडवून आणून नव्हे तर काहीतरी ठोस कृती करावी ही महाराष्ट्राची तुमच्याकडून अपेक्षा आहे.
राज ठाकरे ।
आणखी वाचा
























