Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंची तब्येत अचानक बिघडली, डॉक्टरांकडून तपासणी; विश्रांतीचा दिला सल्ला, नेमकं काय घडलं?
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील हे आज शुक्रवारी (दि. 15) नांदेडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांची तब्येत अचानक बिघडल्याचे पाहायला मिळाले.

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी 29 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाला बसण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याचाच एक भाग म्हणून ते शुक्रवारी नांदेडमध्ये (Nanded News) होते. मात्र, दौऱ्यादरम्यान त्यांची प्रकृती अचानक खालावली आहे. मनोज जरांगे पाटील यांना अचानक चक्कर आल्याची माहिती समोर आली आहे.
शुक्रवारी सकाळपासूनच नांदेडमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजातील कार्यकर्त्यांसोबत सलग बैठकांचं आयोजन केलं होतं. मागील काही दिवसांपासून त्यांच्या दौऱ्यांची व्याप्ती, सततचा प्रवास, भाषणं आणि बैठकींचा ओघ थांबलेला नाही. याच थकव्याच्या पार्श्वभूमीवर त्यांची प्रकृती खालावल्याचे बोलले जात आहे.
मनोज जरांगे पाटील यांना विश्रांतीचा सल्ला
जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडल्याचे कळताच, नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम तातडीने शासकीय विश्रामगृहात दाखल झाली. डॉक्टरांकडून सध्या त्यांच्या प्रकृतीची प्राथमिक तपासणी करण्यात आली. यावेळी डॉक्टरांनी मनोज जरांगे पाटील यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
मनोज जरांगे हे गुरुवारी लातूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. आम्हाला आरक्षण दिलं तर सरकारचं गुलाल लावून आभार मानणार आहोत. कुणीही आडवं आलं तरी आम्ही मुंबईला जाणारच आहोत. माझा जीव गेला तरीही मी मुंबईत जाणारच आहे. आझाद मैदानात बसून आरक्षणाची लढाई लढणार आहे. यावेळी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण घेऊनच परत येणार आहे. माणूस किती दलबदलू असावा याचं जिवंत उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे. त्यांनी तसं वागू नये. त्यांना सत्तेवर ठेवायचं नसतं तर मराठ्यांनी त्यांना मुख्यमंत्री केलं असतं का? त्यांच्या मनात काय आहे ते माहिती नाही. पण आम्ही शांततेत मुंबईत जाणार आणि आरक्षण घेणार आहोत. देवेंद्र फडणवीस म्हणालेत पोलीस बघून घेतील. सत्ता असेल तर सगळं काही करता येईल या गैरसमजातून त्यांनी बाहेर यावे. तुम्ही एखाद्याला हात लावून दाखवा, मग सांगतो, असा इशारा त्यांनी दिला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
























