Sanjay Raut : हे सरकार बेकायदेशीर, मंत्रिमंडळाचा शपथविधी का होत नाही?, संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut On New Goverment : महाराष्ट्रातील नवीन सरकार मागील सरकारचे निर्णय बदलत आहे. हा फक्त विरोधासाठी विरोध केला जात आहे, असा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नागपूरमध्ये केला.
Sanjay Raut On New Goverment : महाराष्ट्रातील नवीन सरकार मागील सरकारचे निर्णय बदलत आहे. हा फक्त विरोधासाठी विरोध केला जात आहे, असा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नागपूरमध्ये केला. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावरही निशाणा साधला. फक्त दोघांचं कॅबिनेट काम करत आहे. महाराष्ट्रात अद्याप सरकार अस्तित्वात आलेलं नाही. फक्त दोघेच कॅबिनेटमध्ये आहेत. अजून सरकार का अस्तित्वात आलं नाही? मंत्रिमंडळाचा शपथविधी का होत नाही? हा प्रश्न आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केलाय. ते आज नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी टीकास्त्र सोडलं.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, आता बंड विसरून जा. मी आता उपमुख्यमंत्र्याच्या शहरात आलो आहे. कालपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या शहरात येत होतो. मी पक्ष आणि संघटनेच्या कामासाठी आलो आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकारी सर्व जागच्या जागी आहे. महाराष्ट्रातली सध्याची परिस्थिती म्हणजे भास आहे. हे सर्व तात्पुरतं आहे.. शिवसेना अशा परिस्थितीतून अनेक वेळेला बाहेर पडली आहे. गेले 56 वर्ष अनेक संकटं, अनेक वादळं आम्ही पाहिली आहेत. शिवसेना विदर्भात काम करत आहे, हळूहळू चित्र स्पष्ट होईल. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला नागपुरात शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे मनोगत जाणून घेण्यासाठी पाठवले आहे. सर्व कार्यकर्ते जागच्या जागी आहेत, त्यामुळे चिंता नसावी.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी केल्यामुळे लोकांना दिलासा मिळाला आहे. ही चांगली गोष्ट आहे. लोकांना दिलासा मिळत असेल तर ते स्वागत आहे, असे राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी उदय सामंत यांच्यावरही टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, नशीब उदय सामंत 115 खासदार शिंदेच्या संपर्कात आहेत, असे बोलले नाहीत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर ही शिवसेनेच्या खासदारांचा आकडा आता इतकाच कायम राहील एवढे मी सांगू शकतो, असेही राऊत म्हणाले.
राज्यातील हे सरकार बेकायदेशीर आहे. 16 आमदारांवर अपात्रतेची तलवार असताना त्यांच्याबद्दल निर्णय झालेला नसताना, मुख्यमंत्री यांनी शपथ घेतली आहे. त्यांच्याबद्दल अपात्रतेचा निर्णय प्रलंबित आहे. त्यामुळे राज्यपालाने त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे 19 तारखेला मंत्र्यांना शपथ देणे हे ही बेकादेशीर राहील, असे टीकास्त्र संजय राऊतांनी सोडले.