Nagpur Heavy Rain: विदर्भाला पावसाने झोडपले ; 6 नागरिकांचा मृत्यू, गुरं वाहून गेली, नागपूरला आजही ऑरेंज अलर्ट
नागरिकांना गरज नसताना घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केलं आहे. नदी-नाल्यांपासून दूर राहण्याचे आणि सुरक्षित स्थळी आश्रय घेण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

Vidarbha rain update: विदर्भात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचंड पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. नागपूर, गोंदिया, वर्धा आणि भंडारा या चार जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण 6 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय अनेक जिल्ह्यांत पूरसदृश्य स्थिती असून घरांचे, जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेक भागात मोठी पडझड झाली असून नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत .अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरलं आहे . गेल्या 24 तासांत नागपूर शहरात . मिमी तर जिल्ह्यात सरासरी 139.6 मिमी पावसाची नोंद झाली .अनेक नद्यांना पूर आलाय . परिसरात दाणादाण उडाली आहे . हवामान विभागाने नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या पाच जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
नागपूरमध्ये पुरपरिस्थितीने दाणादाण
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार्तिक लाडसे आणि अनिल पानपत्ते हे दोघे नाल्यात वाहून गेले. कार्तिकचा मृतदेह सापडला असून अनिलच्या शोधासाठी प्रयत्न सुरू आहेत. गेल्या 24 तासांत नागपूर शहरात . मिमी तर जिल्ह्यात सरासरी 139.6मिमी पावसाची नोंद झाली. सलग तीन दिवसांच्या पावसामुळे नागनदी, पोहरानदी आणि पिवळी नदीला पूर आला. परिणामी शहरातील 50पेक्षा अधिक वस्त्यांमध्ये पाणी शिरले. 23रस्ते जलमय झाले असून अनेक भागांत वाहनांची हालचाल ठप्प झाली होती. नागपूर महापालिकेच्या आपत्कालीन पथकाने पुरात अडकलेल्या 47 नागरिकांना सुखरूप बाहेर काढलं.
नागनदीची सुरक्षा भिंत कोसळली
रामदासपेठ भागातील कॅनल रोडवर नागनदीची सुरक्षा भिंत पावसामुळे खचली आहे. सेवा सदन शाळा आणि महाविद्यालयाच्या मागे ही भिंत कोसळली असून एक मोठा जनरेटर नदीत वाहून गेला आहे. या परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
नागपूरच्या पूर परिस्थितीवर कायस्वरूपी तोडगा काढायचा असेल तर सरकारने व्हीएनआयटी च्या तज्ञ लोकांची समिती तयार करून यावर कायस्वरूपी उपायोजना कराव्या अशी मागणी काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी केली.काल विधानसभेत त्यांनी नागपूरच्या पूर समस्येवर प्रश्न उपस्थित केला होता.नागपूरमध्ये सिमेंट रोडमुळे पाण्याचा निचरा होत नाही. त्याला कारण त्यांच्या बाजूला कारण्यात येणारी नाली सिमेंट रोड पेक्षा उंच असते. त्यामुळे 24 तासात झालेला 140 मिलीमीटर पावसाच्या पाण्याचा निचरा होऊ शकला नाही . हे पूर्ण अपयश पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे होत असल्याचे आमदार विकास ठाकरे म्हणले.
गोंदियात झाड कोसळून मृत्यू
गोंदिया जिल्ह्यात सडक अर्जुनी भागात झाड कारवर कोसळल्याने वासुदेव खेडकर आणि आनंद राऊत या दोघांचा मृत्यू झाला. मागील तीन दिवसांतील मुसळधार पावसामुळे गोंदियात तिघांचा मृत्यू झाला आहे. ७ घरे पूर्णतः जमीनदोस्त तर 265 घरे अंशतः नुकसानग्रस्त झाली आहेत. 84 जनावरांचे गोठे उद्ध्वस्त झाले असून नुकसानभरपाईसाठी प्रशासनाने अहवाल तयार केला आहे.
वर्धा-भंडाऱ्यातही मोठे नुकसान
वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) येथे प्रफुल्ल शेंदरे हा इसम नाल्यात वाहून गेला. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे नंदकिशोर साखरवाडे यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ते पावसात छत्री धरत असताना छत्रीला करंट लागल्याची माहिती आहे.
नागरिकांना सतर्कतेचा इशारा
नागपूर हवामान विभागाने नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या पाच जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. नागरिकांना गरज नसताना घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केलं आहे. नदी-नाल्यांपासून दूर राहण्याचे आणि सुरक्षित स्थळी आश्रय घेण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.























