मुंबईत बेकायदेशीरपणे पार्किंग करणाऱ्यांविरोधात कठोर कायदे करायला हवेत : उच्च न्यायालय
मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी बऱ्याचदा बेकायदेशीर आणि बेशिस्तपणे वाहने उभी केली जातात. त्यामुळे मुंबईत ट्राफिकची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

मुंबई : मुंबईत रस्त्यांवर आणि वर्दळीच्या ठिकाणी बेशिस्तपणे पार्किंग करत नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करा. तसेच यासंदर्भातील नियम आणि कायदे अधिक कठोर करण्याची आवश्यकता असल्याचं मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केलं आहे. सीएसएमटी आणि चर्चगेटसारख्या कायम व्यस्त असलेल्या रेल्वे स्थानकांबाहेर जागा आखून दिलेली असतानाही बेशिस्तपणे पार्किंग करुन दादागिरी करणाऱ्या टॅक्सी चालकांबाबत मुंबई पोलीस आणि महापालिका प्रशासनाने काय उपाययोजना केल्या आहेत, यावर 10 डिसेंबरच्या पुढील सुनावणीत माहिती देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
सामाजिक कार्यकर्ता टेकचंद खानचंदानी यांनी मुंबईतील पार्किंगच्या समस्येबाबत दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरु आहे.
मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी बऱ्याचदा बेकायदेशीर आणि बेशिस्तपणे वाहने उभी केली जातात. त्यामुळे मुंबईत ट्राफिकची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याविरोध तक्रार देऊनही प्रशासन यावर कठोर कारवाई करताना दिसत नाही, असा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे.
या याचिकेची गंभीर दखल घेत हायकोर्टाने मुंबई पोलीस आणि महापालिका प्रशासनाला आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच टॅक्सी स्टॅण्डसाठी जागा निश्चित केलेली असतानाही बेकायदेशीर पिकअप पॉईंट तयार करणाऱ्या टॅक्सी चालकांविरूद्ध दिवसा तसेच रात्रीच्यावेळी काय उपाययोजना केल्या आहेत?, असा सवालही उच्च न्यायालयाने प्रशासनाला विचारला आहे.
Before You Go
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू






















