Mumbai University : मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
Mumbai University Exam Rules : मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी 30 मिनिटे आधी हॉलमध्ये उपस्थित राहावे लागणार आहे.

Mumbai University New Exam Rule : मुंबई विद्यापीठातर्फे (Mumbai University) परीक्षा पद्धतीत शिस्त आणण्यासाठी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून मुंबई विद्यापीठ आणि त्याच्याशी संलग्न असलेल्या सर्व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना परीक्षेच्या निर्धारित वेळेच्या तब्बल 30 मिनिटे आधी परीक्षा कक्षात (Exam Hall) उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळ, व्यवस्थापन परिषद आणि विद्वत परिषदेच्या बैठकीत या महत्त्वपूर्ण नियमावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. आगामी सर्व शैक्षणिक सत्र आणि परीक्षांसाठी हा नियम काटेकोरपणे लागू केला जाणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.
Mumbai University Exam Guidelines : नियम लागू करण्याचे मुख्य कारण
परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे ओळखपत्र (Hall Ticket / ID Card) तपासणे, आसनव्यवस्था शोधणे, बायोमेट्रिक किंवा इतर आवश्यक पडताळणी प्रक्रियांसाठी पुरेसा वेळ लागतो. शेवटच्या क्षणी धावपळ करणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय, अलीकडच्या काळात होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांना आळा घालणे आणि खबरदारीचा उपाय म्हणूनही विद्यापीठाने ही कडक नियमावली तयार केली असल्याचे समजते.
Mumbai University Exam Time Example : वेळेचे गणित कसे असेल?
विद्यापीठाने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, जर एखाद्या परीक्षेची वेळ सकाळी 10.30 वाजता असेल, तर सर्व विद्यार्थ्यांना सकाळी 10 वाजेपर्यंत परीक्षा कक्षात आपापल्या जागेवर उपस्थित राहावेच लागेल. निर्धारित वेळेपेक्षा उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणे कठीण होऊ शकते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी शेवटच्या क्षणी येणे टाळावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
Mumbai University Official Statement : विद्यापीठाचे प्राचार्य आणि संस्थांना निर्देश
परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी यासंदर्भात अधिकृत पत्रक जारी केले आहे. विद्यापीठाचे सर्व शैक्षणिक विभाग, संलग्न व स्वायत्त महाविद्यालयांचे प्राचार्य, उपपरिसरांचे समन्वयक आणि संस्थाचालकांनी हा नवा नियम सर्व विद्यार्थी, शिक्षक तसेच परीक्षा कर्मचाऱ्यांच्या तात्काळ निदर्शनास आणून द्यावा, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
परीक्षा अत्यंत सुरळीत, शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्व नियमांचे पालन करून परीक्षा कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहनही विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.
ही बातमी वाचा:
Before You Go
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती





















