रात्री चालणारी कामं आम्ही दिवसाढवळ्या करतोय, मुख्यमंत्र्यांचा देवेंद्र फडणवीसांना टोला
येत्या काळात सर्व गोष्टी सुरू होत असताना आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागेल. लोकांना कोरोनासोबत कसं जगावं, हे शिकवण्याची आता खरी आवश्यकता आहे. कोरोना संकट हे शेवटचं संकट नसून कदाचित भविष्यातील मोठ्या संकटांची ही नांदी असू शकते, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

मुंबई : विधीमंडळाच्या दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाची आज सांगता झाली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणात विरोधकांवर चांगलीच फटकेबाजी केली. आरेतील झाडे तोडण्याच्या मुद्द्यावर बोलताना जी कामं करायची ती आम्ही दिवसाढवळ्या करतोय, रात्रीच्या अंधारात नाही. प्रत्येक पाऊल शांततेने उचलावं लागणार आहे, ओरडून बोलल्याने कोरोना होतो असाही अप्रत्यक्ष टोला उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. पुढचे अनेक वर्षे तुमचे सहकार्य असेच राहू दे, असा चिमटाही मुख्यमंत्र्यांना विरोधकांना घेतला.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशू बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, काम करताना इगो असता काम नये, तसा शॉर्ट कट मारू नये. रात्री चालणारी कामं आम्ही दिवसाढवळ्या करत आहोत. आरे विभाग हा संपूर्ण परिसर जंगल म्हणूज घोषित केला आहे. आरे कारशेडला जो खर्च झाला तो वाया जाऊ देणार नाही, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं.
माझं कुटुंब माझी जबाबदारी या अभियानासंदर्भातही त्यांनी माहिती दिली. 15 सप्टेंबरपासून एक महिना माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्रम सुरु करतो आहोत. दोन टप्प्यात ही योजना राबवली जाणार असून प्रत्येक कुटुंबाची आरोग्य चौकशी होणार आहे. 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर हा या अभियानाचा पहिला टप्पा असेल तर 12 ते 24 ऑक्टोबर हा दुसरा टप्पा असेल. यात आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन माहिती गोळा करतील. त्यात आवश्यक असेल तिथे तपासणीही करण्यात येईल. यात सर्व संबंधित विभाग तसेच लोकप्रतिनिधींचा सहभागही आवश्यक आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
कोरोना संकटाशी लढताना सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाचे संकट इतक्या लवकर संपेल असे वाटत नसल्याचे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे येत्या काळात सर्व गोष्टी सुरू होत असताना आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागेल. लोकांना कोरोनासोबत कसं जगावं, हे शिकवण्याची आता खरी आवश्यकता आहे. कोरोना संकट हे शेवटचं संकट नसून कदाचित भविष्यातील मोठ्या संकटांची ही नांदी असू शकते. त्यामुळेच लस येणार आणि हा आजार संपणार या आशेवर न राहता आपण आरोग्याच्या बाबतीत अधिक दक्ष व्हायला हवं. मास्क वापरावा, हात धुवावे असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.
Before You Go
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story






















