![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Kartiki Ekadashi: परतीच्या पावसाचा कार्तिकी एकादशीला फटका, निम्म्यापेक्षा जास्त भाविकांनी फिरवली यात्रेकडे पाठ
राज्यभर यंदा परतीच्या पावसाने हजारो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. यानंतर या नुकसानीचे पंचनामे अजून सुरूच असल्याने आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्याने यंदा कार्तिकी यात्रेकडे पाठ फिरवली आहे.
![Kartiki Ekadashi: परतीच्या पावसाचा कार्तिकी एकादशीला फटका, निम्म्यापेक्षा जास्त भाविकांनी फिरवली यात्रेकडे पाठ Pandharpur Kartiki Ekadashi more than half of the devotees turned their backs on the pilgrimage Kartiki Ekadashi: परतीच्या पावसाचा कार्तिकी एकादशीला फटका, निम्म्यापेक्षा जास्त भाविकांनी फिरवली यात्रेकडे पाठ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/03/35d22a1836c1c5b3845f6346db04e887166745266863389_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पंढरपूर: राज्यभर झालेल्या परतीच्या पावसाचा सर्वात मोठा फटका यंदाच्या कार्तिकी यात्रेला बसला असून यात्रेकरूंच्या संख्येत निम्म्याने घट झाल्याचे चित्र आहे. भाविकांच्या निवासासाठी प्रशासनाच्या ६५ एकरावरील भक्तिसागर या निवासतळावरील निम्मे प्लॉट मोकळे पडल्याने यात्राकाळात कायम गजबजलेला हा भक्तिसागर मोकळा पडला आहे.
आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची कार्तिकीला पाठ
राज्यभर यंदा परतीच्या पावसाने हजारो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. यानंतर या नुकसानीचे पंचनामे अजून सुरूच असल्याने आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्याने यंदा कार्तिकी यात्रेकडे पाठ फिरवली आहे. आज कार्तिक शुद्ध दशमीला शहरात अजूनही मोकळे रस्ते असून ज्या भक्तिसागरमध्ये जवळपास तीन लाखापेक्षा जास्त भाविक दरवर्षी निवास करतात तिथे केवळ 1 लाख 68 हजार भाविकांच्या निवासाची नोंद झाली आहे. अजूनही जवळपास 180 प्लॉट मोकळे असल्याने या परिसरात यात्रेचे वातावरण देखील दिसत नाही.
व्यापाऱ्यांना मोठा फटका
राज्य शासनाने या 65 एकर क्षेत्रावर भाविकांसाठी मोफत निवास तळ उभारला असून येथील भाविकांना रस्ते , वीज , पाणी आणि आरोग्याच्या मोफत सुविधा दिल्या आहेत. दरवर्षी किमान 15 दिवस आधीपासून येथील सर्व 497 प्लॉट बुक झालेले असतात. यानंतर येथे जागा मिळविण्यासाठी दरवर्षी मोठी वादावादी देखील पाहायला मिळते. मात्र यंदा कार्तिकी दशमीला निम्म्यापेक्षा जास्त भाविकांनी पाठ फिरविल्याने यात्रा फेल गेली आहे. दिवाळीच्या सुट्टीत रोज हजारोंच्या संख्येने भाविकांनी गर्दी केल्याने यंदा दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त वातावरणात होणारी यात्रा विक्रमी होणार अशी अपेक्षा होती . पण परतीच्या पावसाने वारकऱ्यांनी कार्तिकी यात्रेकडे पाठ फिरवल्याने व्यापाऱ्यांना देखील मोठा फटका बसणार आहे.
उजनीतून सोडण्यात येणारे पाणी बंद
चंद्रभागेचे स्नान करून आज भाविक विठुरायाच्या दर्शन रांगेत उभे राहत असतात. या भाविकांना उद्या संध्याकाळीनंतर दर्शन होते त्यामुळे आधी चंद्रभागेचे स्नान मग विठ्ठल दर्शन या परंपरेनुसार चंद्रभागेवर आज स्नानासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी केल्याने चंद्रभागा वाळवंट भाविकांनी फुलून गेले आहे . काही दिवसापूर्वी उजनीतून सातत्याने चंद्रभागेत पाणी सोडण्यात येत असल्याने चंद्रभागेच्या पाणीपातळी वाढली होती . अगदी पुंडलिकरायच्या दर्शनाला देखील पाण्यातून रांग लावावी लागत होती . ABP ने हे वास्तव मांडल्यावर आता उजनीतून सोडण्यात येणारे पाणी बंद झाले असून यामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळी पुन्हा सर्वसामान्य झाली आहे
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)