Maharashtra News Updates : नौपाडात बांधकाम सुरू असताना मातीचा ढिगारा कोसळून दोन जण ठार, एक जण जखमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने बदल केलेला नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा अशी मागणी करत विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन सुरू केलं आहे. त्याचसंदर्भात विद्यार्थ्यांचं एक शिष्टमंडळ राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला जाणार आहे. तसेच राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा आजचा तिसरा दिवस आहे. यासह आज दिवसभरात इतर कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत त्या पाहूयात,
MPSC विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ शरद पवारांना घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटणार
MPSC च्या विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ आज संध्याकाळी पाच वाजता शरद पवारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात भेटणार आहे. MPSC च्या परीक्षा जुन्याच अभ्यासक्रमानुसार घेण्यात याव्यात आणि नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा यासाठी पुण्यातील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात गेल्या तीन दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य असल्याचे जाहीर केले असले तरी जोपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोग लेखी स्वरुपात निर्णय जाहीर करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्णय या विद्यार्थ्यांनी घेतलाय. मंगळवारी रात्री शरद पवारांनी या विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी भेट देऊन मुख्यमंत्र्यांसोबत याबाबत बैठक घेण्यास पुढाकार घेऊ असे म्हटले होते. त्यानुसार शरद पवार यांच्यासह पाच विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे.
सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा आज तिसरा दिवस
मागच्या दोन दिवसांपासून सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू आहे. आज या सुनावणीचा तिसरा दिवस आहे. काल झालेल्या दुसऱ्या दिवशीदेखील ठाकरे गटांकडून अॅड. कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला. सिब्बल यांनी राजकीय पक्ष-विधीमंडळ पक्ष, मुख्य प्रतोद, पक्षातील बंडखोरी, तत्कालीन राज्यपालांच्या भूमिकेवर युक्तिवाद केला.
किरीट सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर
भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यामागचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. महाविकास आघाडीतील नेत्यांच्या विरोधात मोर्चा उघडलेल्या किरीट सोमय्यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जिल्हा बँकेतील भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील घरी ईडीने धाड टाकली होती. आजचा सोमय्यांचा दौरा त्या संदर्भातच आहे का याचं उत्तर काही तासांमध्ये मिळणार आहे.
Thane Accident: नौपाडात बांधकाम सुरू असताना मातीचा ढिगारा कोसळून दोन जण ठार, एक जण जखमी
नौपाडा बी केबिन येथील संतोषी माता मंदिराच्या बाजूला असणाऱ्या सत्यनिलायम सोसायटीच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे. जेसीबीने खालची माती काढण्याचे काम सुरू असतानाच बाजूला असलेल्या मातीचा भला मोठा ढिगारा कोसळून त्या खाली तीन कामगार अडकले. त्यानंतर ठाणे आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत ढिगारा हटवण्याचे काम सुरू केले. काही वेळातच ढिगारा बाजूला केल्यावर त्याखाली अडकलेल्या दोन जणांना बाहेर काढले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. तर एकजण गंभीर जखमी आढळला. त्याला तात्काळ सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिलीय. हबीब बाबू शेख वय (42) आणि रणजित हे दोघे मृत्यूमुखी पडलेत आणि गंभीर जखमीचे नाव निर्मलराब कुमार असं आहे.
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये वणव्यामुळे डोंगराला लागली आग; शेकडो झाडांचं नुकसान
Ahmednagar News : नगर तालुक्यातील इमामपूर घाटातील डोंगराला वणव्यामुळे आग लागल्याची घटना घडली या आगीत शेकडो झाडे जळून खाक झाली आहेत. दुपारी एक वाजताच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती आहे. या आगीत इमामपूर घाटातील कवडा आणि धुमा डोंगरावरील शेकडो झाडांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि जेऊर येथील वनमित्रांनी घटनास्थळी जाऊन आगीवर नियंत्रण मिळवले आहे. मात्र, या घटनेत वनसंपदेचं मोठं नुकसान झालं आहे.
MPSC : एमपीएसीचा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करणार : राज्य सरकारचा मोठा निर्णय
MPSC : एमपीएससीचा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून विद्यार्थ्यांची जी अभ्यासक्रमाच्या बाबतीत मागणी होती ती आता मान्य झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे.
राहुल गांधी यांना हायकोर्टानं दिलेला दिलासा कायम, मानहानी प्रकरणातील याचिकेवरील सुनावणीला 16 मार्चपर्यंत स्थगिती
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना हायकोर्टानं दिलेला दिलासा कायम. मानहानी प्रकरणात दिलासा मागत दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीला 16 मार्चपर्यंत स्थगिती दिली आहे. गिरगाव दंडाधिकारी कोर्टातील खटल्यात तोपर्यंत सुनावणी न घेण्याचे निर्देश दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख "चौकीदार चोर है" असा केल्याबद्दल राहुल गांधींविरोधात मानहानीची तक्रार करण्यात आली होती.
Nawab Malik: नवाब मलिकांच्या जामीनावरील आजची सुनावणी तहकूब
Nawab Malik: नवाब मलिकांच्या जामीनावरील आजची सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. उद्या दुपारी 12:45 वाजता पुन्हा सुनावणी घेण्याचं हायकोर्टाकडून निश्चित करण्यात आले आहे.