...अन् शरद पवार म्हणाले, आपण अल्पमतात आहोत, विरोधी बाकावर बसू..., जितेंद्र आव्हाड यांनी सांगितली ती आठवण
अर्धवट माहितीच्या आधारे महाराष्ट्राची दिशाभूल करणाऱ्यांसाठी आपण हे लिहित आहोत असं माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय.

मुंबई: उद्धव ठाकरे सरकार जाऊन आता राज्यात शिंदे-फडणवीसांचं सरकार सत्तेत आलं आहे. या राजकीय नाट्यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि पक्षाला अनेकांच्या टीकेला आणि आरोपांना सामोरं जावं लागलं. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक आठवण सांगितली आहे. 1995 साली जेव्हा सरकार बनवणं शक्य असतानाही जनमत आपल्या बाजूने नाही, आपण अल्पमतात आहोत, विरोधी बाकावर बसू असं शरद पवारांनी म्हटल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.
जितेंद्र आव्हाड काय आठवण सांगितली?
1995 साली जेव्हा पहिल्यांदा युती सरकार विजयी झाले, म्हणजे पहिले बिगर काँग्रेस सरकार आले, तेव्हा आदरणीय शरद पवार साहेब हे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. ते मुख्यमंत्री असतानाच काँग्रेस सत्तेतून बाहेर गेली. ते वर्षा बंगल्यावर राहत होते. त्यावेळेस मोबाईल नव्हते आणि बॅलेट पेपरवरती मोजणी चालू होती. त्यामुळे निकाल यायला उशीर लागत होते. निकाल जसजसे येत गेले तसे वर्षा बंगल्यावर उपस्थित असलेल्या सगळ्यांना जाणीव झाली की काँग्रेस बहुमत प्राप्त करू शकत नाही. ठरवलं असत तर बहुमत प्राप्तही करू शकली असती.
पण, मला आठवतंय कि दुसऱ्याच दिवशी मी स्वतः वर्षा बंगल्यावर उपस्थित होतो. निकाल लागण्यापासून ते मनोहर जोशी यांचा शपथविधी होईपर्यंत, साहेबांकडे गेलेले ज्येष्ठ नेते... त्यांची नावे मी इथे लिहू इच्छित नाही, ते सगळे साहेबांना आग्रह करत होते की साहेब सरकार बनवूया, आपण सरकार बनवू शकता. तेव्हा साहेबांच वाक्य होतं.. 'जनमत आपल्या विरोधात आहे. असं सरकार बनवणं योग्य नाही. त्यामुळे आपण विरोधी बाकावर बसायला हवं.'
हे वाक्य त्यांचे म्हणजेच पवार साहेबांचे आहे आहे. दिल्लीचा किंवा काँग्रेस हायकमांडचा काहीही संबंध नव्हता. मी ह्या सगळ्याचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे. साहेबांची राजकीय जीवनातली 60 टक्के वर्ष ही विरोधी बाकावर बसण्यात गेली आहेत. साहेब पहिल्यांदा 1968 ला निवडून आले तेव्हापासून आजपर्यंत ते विधी मंडळाचे नाहीतर संसदेचे सदस्य आहेत.
अर्धवट माहितीच्या आधारे महाराष्ट्राची दिशाभूल करणाऱ्यांसाठी मी हे लिहित आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
