नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंचा राजीनामा? शरद पवारांनी अजित दादांची री ओढली, पहिल्यांदाच प्रतिक्रिया
मंत्री धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी आजार झाल्याने त्यांना सततचे 2 मिनिटेही बोलता येत नाही. त्यामुळे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते सध्या आराम करत आहेत.

मुंबई : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर व कृषी खात्यातील घोटाळ्याच्या आरोपांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) राजीनाम्याची मागणी जोर धरत आहेत. मात्र, सरकारने मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात कुठलीही भूमिका घेतल्याचे दिसून येत नाही. विशेष म्हणजे नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा की नाही हे स्वत: धनंजय मुंडेंनी ठरवावं, माझ्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले तेव्हा मी राजीनामा दिला होता, असे अजित पवार यांनी म्हटलं. आता, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad pawar) यांनी प्रथमच मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात भाष्य करताना विरोधकांना खोचक टोला लगावला आहे. या लोकांचा आणि नैतिकतेचा काही संबंध आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच, याआधी आम्ही राजीनामे घेत होतो, असे म्हणत एकप्रकारे अजित पवारांची री ओढत खोचक टोलाही लगावला.
मंत्री धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी आजार झाल्याने त्यांना सततचे 2 मिनिटेही बोलता येत नाही. त्यामुळे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते सध्या आराम करत आहेत, तत्पूर्वी त्यांच्या डोळ्यावर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे, धनंजय मुंडे गेल्या काही दिवसांपासून ना मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहत आहेत, ना पक्षाने दिलेल्या निर्देशानुसार जनता दरबार घेताना दिसत आहेत. दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर भ्रष्टाचाराचे व कृषी खात्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार गेल्याचे आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मुंडेंच्या राजीनाम्याबाबत टोलवाटोलवी करण्यात येत असल्याचे दिसून आले. त्यामुळे, नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाईल, ही अपेक्षाच आता विरोधकांनी सोडून दिली आहे. त्यातच, ज्येष्ठ नेते व अजित पवारांचा राजीनामा घेणाऱ्या शरद पवारांनी धनंजय मुडेंच्या राजीनाम्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
मी मस्साजोगला जाऊन आलो. या आधी ज्यावेळी एखाद्या मंत्र्यावर आरोप झाले, त्यावेळी राजीनामा होतं होता. पण, आता मुद्दा असा आहे की, नैतिकता आणि या लोकंचा काही सबंध आहे का?, असा खोचक सवाल शरद पवारांनी विचारला. शरद पवारांनी एकप्रकारे धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदावरुन राज्य सरकारला टोला लगावला आहे. दरम्यान, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी करण्यात आली असून अंजली दमानिया अतिशय आक्रमक झाल्या होत्या. विशेष म्हणजे दमानिया यांनी राजीनाम्याची मागणी करत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोघांचीही भेट घेतली होती. मात्र, अद्याप तरी मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला नाही. याउलट न्यायालयाने दोषी ठरवलेल्या मंत्री माणिकराव कोकाटे यांनाही मंत्रिमंडळात स्थान कायम असल्याचे दिसून येते.
हेही वाचा
कुख्यात गज्या मारणेवर 5 व्यांदा मकोका अंतर्गत कारवाई, पुणे पोलिसांनी उचललं; उद्या कोर्टात हजर करणार
Before You Go
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती






















