![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
माझ्या पतीने आत्महत्या केली तर बच्चू कडू, तहसीलदार, ठाणेदार जबाबदार; सुसाईड नोट लिहून बेपत्ता झालेल्या शेतकऱ्याच्या पत्नीची तक्रार
आत्महत्येची चिठ्ठी लिहून अमरावतीमधील एक शेतकरी बेपत्ता झाला आहे. या सुसाईड नोटमध्ये त्याने पोलिसांच्या धमकीला वैतागल्याचा उल्लेख केला आहे. यानंतर पत्नीने पोलिसात धाव घेऊन माझ्या पतीने आत्महत्या केल्यास राज्यमंत्री बच्चू कडू, तहसीलदार, ठाणेदार जबाबदार राहतील, अशी तक्रार दाखल केली आहे.
![माझ्या पतीने आत्महत्या केली तर बच्चू कडू, तहसीलदार, ठाणेदार जबाबदार; सुसाईड नोट लिहून बेपत्ता झालेल्या शेतकऱ्याच्या पत्नीची तक्रार If my husband commits suicide, Bacchu Kadu, Tehsildar, Thanedar will be responsible, Complaint of the farmers wife who went missing after writing a suicide note माझ्या पतीने आत्महत्या केली तर बच्चू कडू, तहसीलदार, ठाणेदार जबाबदार; सुसाईड नोट लिहून बेपत्ता झालेल्या शेतकऱ्याच्या पत्नीची तक्रार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/13121422/Amaravati-Farmer-Suicide-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अमरावती : अमरावतीच्या चांदूरबाजार तालुक्यातील देऊरवाडा येथील विजय सुखदेव सुने (वय 40 वर्षे) हा शेतकरी सोमवारी (11 जानेवारी) रात्रीपासून बेपत्ता आहे. आत्महत्येच्या उद्देशाने घर सोडत असल्याची चिठ्ठी सापडली सोबतच मोबाईल फोनही घरीच असल्याचं समोर आलं आहे. चिठ्ठीत पोलिसांच्या सततच्या धमकीने वैतागल्याचा उल्लेख आहे.
माझ्या पतीने आत्महत्या केली तर राज्यमंत्री बच्चू कडू, त्यांचे खासगी सचिव, तहसीलदार, ठाणेदार, बिट जमादार हे जबाबदार राहतील, अशी तक्रार संबंधित शेतकऱ्याची पत्नीने शिरजगाव कसबा पोलीस ठाण्यात दिली आहे. तक्रारीत म्हटलं आहे की, "पोलिसांच्या सततच्या धमकीने वैतागल्याचा उल्लेख पतीने चिठ्ठीत केला आहे. माझ्या पतीने जर आत्महत्या केली तर याला ठाणेदार सचिन परदेशी, बिट जमादार तायडे यांना जबाबदार धरुन खुनाचा गुन्हा दाखल करावा." याशिवाय चांदूरबाजार येथील तहसीलदार धीरज थुल, राज्यमंत्री बच्चू कडू आणि त्यांचे खाजगी सचिव दीपक भोंगाडे यांच्या नावाचा उल्लेखही तक्रारी करण्यात आला आहे.
दरम्यान शिरजगाव कसबा पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून दोन पथकं तातडीने शोधमोहीमेसाठी पाठवण्यात आली आहेत.
जाणीवपूर्वक बदनामीचा प्रयत्न : बच्चू कडू
या प्रकरणाची माहिती मला सोशल मीडियाद्वारे मिळाली. वास्तविक या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही. संबंधित शेतकऱ्याने चिठ्ठीत माझा किंवा माझ्या खाजगी सचिवाचा उल्लेख केलेला नाही. कोणीतरी जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. "आमच्यावर गुन्हा दाखल असला तरी काही हरकत नाही. आमच्यासाठी तुमचा जीव महत्त्वाचा आहे. विजय सुने, तुम्ही जिथे कुठे गेला आहात तिथून परत या. तुमचा जीव वाचणं महत्त्वाचा आहे. तुम्हाला निश्चितच न्याय मिळेल, असंही बच्चू कडू म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)