लातूर जिल्ह्यात भूकंप, मागील दोन महिन्यातील दहावा धक्का
Latur Earthquake: लातूर जिल्ह्यातील हासोरी भागात पुन्हा भूकंपाचा एक धक्का जाणवला आहे.

Latur Earthquake: लातूर जिल्ह्यातील हासोरी भागात पुन्हा भूकंपाचा एक धक्का जाणवला आहे. 16 सप्टेंबर ते आजपर्यंत नऊ धक्के जाणवले असून दहावा धक्का किल्लारी आणि हासोरी भागात 2.4 रिश्टर स्केलचा धक्का शुक्रवारी रात्री दोन वाजून दहा मिनिटाला जाणवला आहे. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील किल्लारी हासोरी आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा भागात हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
याआधी येथे 16, 25, 26 आणि 29 सप्टेंबर रोजी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. तर 4, 9, 11 ऑक्टोबर रोजी आणि आता 19 नोव्हेंबर मध्यरात्री धक्का जाणवला आहे. यामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे. या धक्क्यामुळे 1993 मध्ये झालेल्या भूकंपाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. औसा तालुक्यातील किल्लारी परिसरातील 5 किलोमीटरचा परिसर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहार तालुक्यातील काही गावांना हा धक्का जाणवला आहे, अशी माहिती भूकंप वेधशाळा अधिकारी किशोर सिंग परदेशी यांनी दिली आहे. लातूरच्या भूकंपमापन केंद्रापासून 49 किलोमीटर ते 59 किलोमीटर अंतरावरील भागामध्ये या भूकंपाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हासोरी हे गाव गणेश आगमनाच्या पूर्वीपासूनच त्रस्त आहे. कारण या गावात सतत जमिनीतून आवाज येत होते. ग्रामस्थांनी वेळोवेळी याची तक्रार प्रशासनाकडे केली होती. ग्रामस्थांच्या मतानुसार हे भूकंपाचे धक्के होते. मात्र प्रशासनाने भूगर्भातील हालचालीमुळे जमिनीतून आवाज येत आहे, असं सांगत ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला होता. प्रशासकीय पातळीवर यंत्रणा हलली. अनेक पथकांनी हासोरी या गावाला भेटी दिल्या. दिल्ली येथील पथक देखील येथे आले होते. याच काळात या भागात पुन्हा एकदा धक्के जाणवले. 22 सप्टेंबर रोजी पहाटे 3 वाजून 38 मिनिटांनी 2.2 रिश्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला असल्याची माहिती जिल्हाधिकारी बी. पी. पृथ्वीराज यांनी दुसऱ्या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली होती. भूगर्भातील ते आवाज म्हणजे भूकंपच होते, हे पत्रकार परिषद झाल्यानंतर समोर आले. त्यानंतर आवाजाची आणि धक्क्याची मालिका काही काळ सुरूच होती.
गणेश विसर्जन आणि लातूर येथील भूकंप इतिहास
1993 ला गणेश विसर्जनाच्या दिवशी किल्लारी परिसरात भूकंपाचा मोठा धक्का बसला होता. जिल्ह्यातील किल्लारी येथे 6.4 रिश्टर स्केलचा धक्का बसला होता. काही सेकंदात होत्याचे नव्हते झाले होते. 52 खेडेगावातील तीस हजाराच्या आसपास घरे आणि आधारभूत सोयीसुविधा कायमच्या नष्ट झाल्या. या धक्क्यात आठ हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागले. सोळा हजारापेक्षा जास्त लोक जखमी झाले. पंधरा हजारा पेक्षा जास्त पशुधनाचा मृत्यू झाला. या भूकंपाचा फटका येथेच नव्हे तर राज्यातील अकरा जिल्ह्यांना बसला. अकराशे कोटी रुपयाच्या मालमत्तेचे नुकसान झाले. 29 वर्षांपूर्वी या एका घटनेने 52 गावाचा इतिहास बदलून गेला. आजही लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील 52 गावात भूकंपाच्या खुणा आहेत. या पडलेल्या गावाचे नवीन जागेत पुर्नवसन झाले आहे. मात्र जुन्या गावाच्या जखमा आजही दर 30 सप्टेंबरला पुन्हा भळभळतात. या वर्षी सप्टेंबर महिन्यातील गणेश विसर्जनाच्या वेळेतच भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने लातूरकरांच्या मनात भीतीच वातावरण निर्माण झाले होते. आताचा भूकंप हा किल्लारी भागात जाणवत असल्यामुळे किल्लारी भागातील नागरिक भयभीत झाले आहेत. अशा भीतीच्या छायेत हासोरी परिसरातील नागरिक ही आहेत.
Before You Go
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
महत्त्वाच्या बातम्या






















