एक्स्प्लोर

Eknath Shinde : राज्यातील बळीराजाला दीड वर्षांत 44 हजार 278 कोटी रुपयांची विक्रमी मदत, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सचं पुनर्गठन

Eknath Shinde Announcement On Farmers : धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20 हजार रुपये बोनस देण्यात आले असून 'छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने'च्या कर्जमाफीपासून वंचित साडे सहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. 

नागपूर: दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, पूर, गारपीट अशा प्रत्येक नैसर्गिक आपत्तीत आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहे. गेल्या दीड वर्षांत आम्ही विविध योजनांच्या माध्यमातून बळीराजाला तब्बल 44 हजार 278 कोटी रुपयांची आतापर्यंतची विक्रमी मदत केली असून राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सचं पुनर्गठन करण्याचा, धान उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी प्रति हेक्टरी 20 हजार रुपये बोनस देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज विधानसभेत केली. 

महाराष्ट्रात प्रथमच कांद्याची महाबँक स्थापन करण्यात आल्याचे जाहीर करतानाच ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये 44 लाख शेतकऱ्यांना 18 हजार 672 कोटी इतका कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. मात्र सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी निर्माण झाल्याने 6 लाख 56 हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहीले. 6.56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली.

कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना तब्बल 15 हजार 40 कोटींचा लाभ

अवकाळी पाऊस, गारपीट आणि एकंदरच बळीराजाच्या समस्यांसंदर्भात विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अल्पकालिन चर्चा उपस्थित केली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी ते म्हणाले, कृषि विभागाच्या प्रमुख योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जुलै 2022 पासून तब्बल 15 हजार 40 कोटींचा लाभ देण्यात आला आहे. शेतकरी हा विषय फक्त कृषी खात्याशी संबंधित नाही. तर, अनेक खात्यांशी समन्वय साधून बळीराजाला सर्वोतोपरी शाश्वत मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील अनुदान देण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत 14 लाख 31 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे 5 हजार 190 कोटी रुपये जमा करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात प्रथमच कांद्याची महाबँक

महाराष्ट्रात प्रथमच कांद्याची महाबँक स्थापन केली आहे. आजच या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला आहे. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर हे यासाठी मदत करत आहेत. न्यूक्लिअर तंत्रज्ञानाचा वापर करून कांदा इरॅडिशनचा हा पथदर्शी प्रकल्प कांदा उत्पादकांच्या समस्येवर कायमस्वरुपी उपाय ठरेल, असा विश्वास व्यक्त करीत समृद्धी महामार्गालगत 13 कृषी समृद्धी केंद्रांच्या उभारणीचं काम सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कांदा निर्यातबंदीबाबत केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा झाली असून याबाबतही लवकरच तोडगा निघेल, असेही त्यांनी सांगितले.

‘सहकार से समृद्धी’ हा मंत्र वास्तवात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची ग्वाही देतानाच इथेनॉल निर्मितीवर घातलेले निर्बंध राज्याच्या मागणीला मान देऊन शिथील केले, त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकारिता मंत्री अमित शहा यांचे आभारही मुख्यमंत्र्यांनी मानले. 

मुख्यमंत्री शिंदे  यावेळी म्हणाले, शेतकरी आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असून त्यांच्यासाठी जुलै 2022 पासून म्हणजे गेल्या फक्त 18 महिन्यांत शेतकऱ्यांसाठी जो भरीव निधी खर्च करीत आहोत त्यामध्ये मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून 14 हजार 891 कोटी रुपये, कृषि विभागाच्या माध्यमातून 15 हजार 40 कोटी रुपये, सहकार 5 हजार 190 कोटी, पणन 5 हजार 114 कोटी, अन्न व नागरी पुरवठा 3 हजार 800 कोटी,पशुसंवर्धन 234 कोटी अशा रीतीनं तब्बल 44 हजार कोटींपेक्षा जास्त खर्च करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

कृषी क्षेत्राचा विकास दर वाढविण्यासाठी प्रयत्न

कृषी क्षेत्राचा विकास दर वाढविण्यासाठी यापेक्षाही जास्त निधी लागला तरी त्याची तरतूद केली जाईल आणि तो खर्चही केला जाईल, याची ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. अशा विविध मार्गांनी शेतकऱ्यांना खंबीरपणं उभं करण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न सुरू आहे. शासनाच्या या प्रयत्नांना साथ द्या. शेतकऱ्यांच्या प्रश्नांमध्ये राजकारण आणू नका. त्याऐवजी चर्चा करू, संवाद साधू समन्वय राखू यातून आपल्या राज्याचा कृषी विकास दर कसा वाढेल असे प्रयत्न करू यातच आपल्या बळीराजाचं आणि आपल्या राज्याचं हित आहे. तुम्ही आणि आम्ही एकत्र येऊ. आपल्या शेतकऱ्यांचं घर सावरूया. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आहेच. तो जागा करण्याचा निर्धार करूया, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांना केले.

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सचं पुनर्गठन

महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या हा अतिशय गंभीर विषय आहे. एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली तरी ती दुख:द असते, असे सांगत मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी नव्याने टास्क फोर्सचं पुनर्गठन करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतीला शाश्वत शेतीकडे कसं नेता येईल, राज्यातील शेती उत्पादन वाढवण्यासाठी काय करता येईल, अवकाळी पाऊस आला किंवा दुष्काळ पडला तरी शेतीचं नुकसान होणार नाही, असं शेतीचं मॉडेल कसं विकसित करता येईल, यासाठी हा टास्क फोर्स काम करील. त्याचबरोबर कृषि पर्यटनाला चालना देऊन अधिकाधिक शेतकऱ्यांना कृषि पर्यटन विकसित करण्यासाठी प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करण्याबाबतही हा टास्क फोर्स काम करील, असेही मुख्यमंत्र्यांनी  सांगितले. 

कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन अधिक सक्षम करणार

कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनला अधिक सक्षम करण्याचाही निर्णय घेतला आहे. सततची नापिकी, कर्जबाजारीपणा, कर्ज परतफेडीचा तगादा त्यामुळे निर्माण होणारा ताण-तणाव आदी कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करतात. त्यासाठी याविषयावर काम करणारे समुपदेशक, ज्येष्ठ संपादक, निवृत्त पोलिस अधिकारी, कृषी विद्यापीठांचे प्राध्यापक, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, कीर्तनकार अशा सर्वांची मदत घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतकरी बांधवांनो धीर सोडू नका.. खचून जाऊ नका.. शासन सदैव तुमच्या पाठीशीच नव्हे, तर तुमच्या सोबत आहे.. आत्महत्या करून आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडू नका, असे भावनिक आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

केंद्राच्या पथकाकडून दुष्काळग्रस्तभागाची पाहणी

राज्यात यंदा सरासरीच्या 90 टक्के असमान पाऊस झाल्यामुळे पाण्याचं संकट निर्माण झाले आहे. केंद्राच्या पथकाने नुकतेच दुष्काळग्रस्त जाहीर केलेल्या तालुक्यांना भेटी देऊन पाहाणी केली आहे. 40 तालुक्यांमधील शेतकऱ्यांना 2 हजार 587 कोटी इतक्या रकमेची मदत देण्याबाबत केंद्र सरकारला मागणी पत्र पाठवलं आहे.केंद्राच्या इंटरमिनिस्ट्रीअल को-आर्डिनेशन टीमने 15 पैकी नऊ जिल्ह्यांना भेटी दिल्या. शासनाच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्यांच्यासोबत बैठकही झाली. ही मदत लवकर प्राप्त करून घेण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे बैठक होणार आहे त्यामुळे केंद्राकडून लवकरात लवकर निधी मिळेल, असा विश्वास असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

केंद्राच्या निकषात न बसलेल्या, परंतु कमी पाऊस झालेल्या 1 हजार 21 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या मंडळांमधील शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुनर्गठन, चालू वीज बिलात 33.5टक्के सूट, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी आदी सर्व उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. रोजगार हमीच्या निकषांमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यासह 8 वेगवेगळ्या सवलती लागू केल्या गेल्या आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता एनडीआरएफच्या दराच्या दुप्पट दरानं शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला, 2 हेक्टरची मर्यादा 3 हेक्टर केली. एनडीआरएफने आता दर काही प्रमाणात वाढवले आहेत तरीही त्यांच्यापेक्षा अधिक दराने आपण नुकसान भरपाई देणार आहोत. गेल्या वेळेस शेतकरी बांधवांना जितकी नुकसान भरपाई मिळाली त्यापेक्षा अधिकच मिळेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

जानेवारी ते ऑक्टोबर 2023 या काळात झालेली अतिवृष्टी, अवकाळी आणि पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीकरिता 1757 कोटी रुपये वितरित करण्यात येणार असून त्यापैकी 300 कोटीपेक्षा जास्तीचे वाटप देखील झालं आहे.

‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी केंद्राच्या सहा हजार रुपयांसोबत आपल्याकडील 6 हजार रुपयांची भर घालण्याचा निर्णय घेतला. 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात राज्याच्या हिश्श्याचा पहिला टप्पा म्हणून 1 हजार 720 कोटी रुपये जमा देखील झाले आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

केवळ एक रुपयात पीक विमा योजना राज्य शासनाने तयार केली. त्यामुळे पीक विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत तब्बल 177 टक्के वाढ झाली, हे अभिमानाने नमीद करतो असे सांगत 2023 च्या खरीप हंगामात राज्यातील 1 कोटी 70 लाख व रब्बी हंगामात 66 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत विक्रमी सहभाग नोंदवल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

एक रुपयात पीक विमा देऊन थांबलो नाही तर पूर्वी शेतकऱ्यांची जी तक्रार असायची की, विमा कंपन्या नुकसान भरपाई देत नाहीत, त्याबाबतीतही कठोर भूमिका घेतल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची मी बैठक घेऊन त्यांना नुकसान भरपाईपोटी योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना देण्यास सांगितलं. त्यामुळे या खरीपात झालेल्या नुकसानीपोटी विमा कंपन्यांकडून 2 हजार 121 कोटी इतकी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. या कंपन्यांकडून 1 हजार 217 कोटी रुपये एवढं अग्रीम वाटप झालं आहे. 

भूविकास बँकांकडून 34 हजार 788 शेतकऱ्यांनी घेतलेलं 964 कोटी 15 लाख रुपयांचं कर्ज आम्ही माफ केलं ते यापूर्वी कधी झालं नव्हते यामुळे सुमारे 69 हजार हेक्टर जमिनीवरील भूविकास बँकांच्या कर्जाचा बोजा कमी झाला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 2021 मध्ये पीक कर्ज वाटपाचं जे प्रमाण ७३ टक्के होतं, ते आता 85 टक्क्यांपर्यंत गेले आहे. 2023 च्या खरीप हंगामात सप्टेंबरअखेर 41 हजार 221 कोटी रुपयांचं कर्ज वाटप झाले असून रब्बी हंगामासाठीही 3.55 लाख शेतकऱ्यांना 3516 कोटींचं पीक कर्ज वाटप सुरू आहे. बँकांनी 64 टक्के टार्गेट पूर्ण केलं आहे. 

पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत ३ लाखांपर्यंत पीक कर्जाची संपूर्ण परतफेड केली तर शेतकऱ्यास 3 टक्के व्याज सवलत अनुदान दिलं जातं. या वर्षासाठी 72 कोटी खर्च करण्यात आले आहेत.  अटल अर्थ सहाय्य योजनेस मुदतवाढ दिली असून 428 प्रस्तावांना कर्ज आणि अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी 72 कोटी 42 लाख रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे. बुलडाणा, परळी-वैजनाथ, तसंच नांदेड आणि सोयगांव येथे शासकीय कृषि महाविद्यालये स्थापन करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. नागपूर येथे शेती व कृषि उद्योग आणि कृषि संलग्न उद्योगासाठी आंतरराष्ट्रीय कृषि सुविधा केंद्र स्थापन करण्याचा निर्णयही घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शेतीच्या शाश्वत प्रगतीसाठी काही महत्वाच्या योजनांना वेग दिला आहे. त्यामध्ये नदीजोड प्रकल्प आणि जलयुक्त शिवारचा दुसरा टप्पा राबवून महाराष्ट्राला  दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा साडे पाच हजार गावांत सुरू केला आहे. 

कोकणातील विशिष्ट परिस्थिती व आव्हाने विचारात घेता या पूर्ण क्षेत्राचा एकत्रित विकास विकास होण्यासाठी  सर्व यंत्रणांच्या कामांमध्ये एकसुत्रता आणण्यासाठी कोकण क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा आमचा मानस आहे. याकरिता यावर्षी पुरवणी मागण्यांमध्ये 500 कोटी रुपयांची तरतूद ठेवण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्य शासनामार्फत शेती आणि शेतकऱ्यांसाठी राबविण्य़ात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली आणि त्यासाठी करण्यात आलेल्या निधींच्या तरतुदींची माहितीही त्यांनी दिली.

सभागृहात गेल्या आठवड्यात 3 दिवस सविस्तर झालेल्या या चर्चेत सदस्य सर्वश्री जयंत पाटील, रणधीर सावरकर, संजय सावकारे, बालाजी कल्याणकर, अनिल देशमुख, राजेंद्र शिंगणे, भास्कर जाधव, नारायण कुचे, बच्चू कडू, प्रकाश सोळंकी, विश्वजीत कदम,समीर कुणावार, आशिष जयस्वाल, राजेश टोपे, प्रशांत बंब, श्रीमती सुमनताई पाटील, उदयसिंह राजपूत, विनोद अग्रवाल, अशोक चव्हाण,हरिभाऊ बागडे, दिपक चव्हाण, रमेश बोरनारे, सुरेश वरपुरकर, श्रीमती श्वेता महाले,  प्राजक्त तनपुरे, सुहास कांदे,  अमित झनक, बबनराव लोणीकर, दिलीप बनकर, कैलाश पाटील, जितेश अंतापूरकर, श्रीमती प्रणिती शिंदे आदी सदस्यांनी भाग घेतला

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पूरपरिस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीत 1 अब्ज रुपयांची मदत, शेतकऱ्यांना दिले फक्त 75 हजार; आरटीआयमधून धक्कादायक माहिती समोर, सतेज पाटील अंबादास दानवेंनी फटकारलं
पूरपरिस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीत 1 अब्ज रुपयांची मदत, शेतकऱ्यांना दिले फक्त 75 हजार; आरटीआयमधून धक्कादायक माहिती समोर, सतेज पाटील अंबादास दानवेंनी फटकारलं
Maharashtra Flood Aid: शासनाचं मोठ्ठ पॅकेज ई-केवायसीमुळे ठप्प, शेतकऱ्यांचे 355 कोटी शासनाच्या तिजोरीतच पडून; मराठवाड्याला सर्वाधिक फटका
शासनाचं मोठ्ठ पॅकेज ई-केवायसीमुळे ठप्प, शेतकऱ्यांचे 355 कोटी शासनाच्या तिजोरीतच पडून; मराठवाड्याला सर्वाधिक फटका
Weather Update: नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात थंडीचा यलो अलर्ट; राज्यात पारा आणखी घसरणार; हवामान विभागाकडून हायअलर्ट, तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती?
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात थंडीचा यलो अलर्ट; राज्यात पारा आणखी घसरणार; हवामान विभागाकडून हायअलर्ट, तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती?
Ind vs SA 2nd T20 Team India Playing XI: संजू सॅमसन IN, तिलक वर्मा OUT...द. अफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 साठी अशी असेल भारताची Playing XI
संजू सॅमसन IN, तिलक वर्मा OUT...द. अफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 साठी अशी असेल भारताची Playing XI

व्हिडीओ

Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report
Ravi Bhavan Mla Guest House : मंत्र्यांचा थाट, 'गरीबखान्या'कडे पाठ; राजकीय खळबळ Special Report
Anjali Damania : नावाला पार्थ, दादांचा स्वार्थ? मुंढवा जमीन पकरणी दमानियाचे नवे आरोप Special Report
Leopard Terror : अचाट सल्ले ऐका, बिबट्याला रोखा! बिबट्याचा धुमाकूळ, अधिवेशनात वादळ Special Report
Thackeray Brother Family : डॉ. राहुल बोरुडेंच्या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंची सहकुटूंब हजेरी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पूरपरिस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीत 1 अब्ज रुपयांची मदत, शेतकऱ्यांना दिले फक्त 75 हजार; आरटीआयमधून धक्कादायक माहिती समोर, सतेज पाटील अंबादास दानवेंनी फटकारलं
पूरपरिस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीत 1 अब्ज रुपयांची मदत, शेतकऱ्यांना दिले फक्त 75 हजार; आरटीआयमधून धक्कादायक माहिती समोर, सतेज पाटील अंबादास दानवेंनी फटकारलं
Maharashtra Flood Aid: शासनाचं मोठ्ठ पॅकेज ई-केवायसीमुळे ठप्प, शेतकऱ्यांचे 355 कोटी शासनाच्या तिजोरीतच पडून; मराठवाड्याला सर्वाधिक फटका
शासनाचं मोठ्ठ पॅकेज ई-केवायसीमुळे ठप्प, शेतकऱ्यांचे 355 कोटी शासनाच्या तिजोरीतच पडून; मराठवाड्याला सर्वाधिक फटका
Weather Update: नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात थंडीचा यलो अलर्ट; राज्यात पारा आणखी घसरणार; हवामान विभागाकडून हायअलर्ट, तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती?
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात थंडीचा यलो अलर्ट; राज्यात पारा आणखी घसरणार; हवामान विभागाकडून हायअलर्ट, तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती?
Ind vs SA 2nd T20 Team India Playing XI: संजू सॅमसन IN, तिलक वर्मा OUT...द. अफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 साठी अशी असेल भारताची Playing XI
संजू सॅमसन IN, तिलक वर्मा OUT...द. अफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 साठी अशी असेल भारताची Playing XI
Sahyadri Hospital Vandalised : पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात तोडफोड प्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल; रूग्णालयाने दिलं घटनेबाबत स्पष्टीकरण, नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात तोडफोड प्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल; रूग्णालयाने दिलं घटनेबाबत स्पष्टीकरण, नेमकं प्रकरण काय?
Mahayuti Municipal Corporation Election 2025: आगामी महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला; मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीत भाजपा-शिवसेना एकत्र; पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी-भाजपा वेगवेगळे लढणार
आगामी महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला; मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीत भाजपा-शिवसेना एकत्र; पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी-भाजपा वेगवेगळे लढणार
Pune Election : बंडू आंदेकर कुटूंबातील दोघी महानगरपालिकेची निवडणूक लढवणार; लक्ष्मी आंदेकर अन् सोनाली आंदेकरला निवडणूक लढविण्यास न्यायालयाचा 'ग्रीन सिग्नल'
बंडू आंदेकर कुटूंबातील दोघी महानगरपालिकेची निवडणूक लढवणार; लक्ष्मी आंदेकर अन् सोनाली आंदेकरला निवडणूक लढविण्यास न्यायालयाचा 'ग्रीन सिग्नल'
Mahadhan Yog 2025 : 20 डिसेंबरची तारीख लक्षात ठेवा! शुक्र ग्रहाचा जुळून येणार अद्भूत राजयोग, नशिबाचे फास फिरण्यासाठी फक्त 10 दिवस बाकी
20 डिसेंबरची तारीख लक्षात ठेवा! शुक्र ग्रहाचा जुळून येणार अद्भूत राजयोग, नशिबाचे फास फिरण्यासाठी फक्त 10 दिवस बाकी
Embed widget