Ashok Chavan VIDEO : काँग्रेसमध्ये खोटे आरोप अन् 14 वर्षांचा वनवास, तर भाजपने दिला सन्मान; अशोक चव्हाण काय म्हणाले?
Ashok Chavan Latur Speech : काँग्रेसमध्ये असताना खोटे आरोप करण्यात आले, त्यानंतर भाजपने सन्मानाने पक्षात घेतलं आणि त्यामुळे आपण आज खासदार असल्याचं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं.

लातूर : माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते अशोक चव्हाणांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला. राजकारणात मला संपण्याचा प्रयत्न झाला, मात्र आम्ही टिकलो. खोट्या आरोपांमुळे काँग्रेस सोडल्याचं वक्तव्य अशोक चव्हाणांनी केलं. तसंच मतचोरीवरून आरोप करणाऱ्या काँग्रेस नेत्यांनाही त्यांनी सुनावलं. मतचोरी झाली असती तर नाना पटोले अडीचशे मतांनी जिंकले असते का असा सवाल अशोक चव्हाणांनी उपस्थित केला.
भाजपच्या लातूर ग्रामीण कार्यकर्त्यांचा संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अशोक चव्हाणांनी काँग्रेसवर तोफ डागली. त्याचवेळी भाजपची स्तुती केली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही अशोक चव्हाणांनी भाष्य केलं.
काँग्रेसमध्ये वनवास भोगावा लागला
आदर्श घोटाळ्याचा उल्लेख करताना अशोक चव्हाणांनी आपल्या राजकीय कारकिर्दीतील प्रसंग मांडला. ते म्हणाले की, “2010 मध्ये माझ्यावर निष्कारण खोटे आरोप करण्यात आले. त्यावेळी मला मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं. 2008 ते2010 हा माझ्या कारकिर्दीतील शिखराचा काळ होता. पण कुठलीही चूक न करताही मला चौदा वर्ष वनवास भोगावा लागला.
भाजपाने सन्मान दिला
काँग्रेसमध्ये असताना आपल्याला चौदा वर्षे वनवास भोगावा लागल्याची खंत व्यक्त करणाऱ्या अशोक चव्हाणांनी भाजपचे मात्र कौतुक केलं. भाजपमध्ये आपल्याला मान-सन्मान मिळाला असं म्हणत त्यांनी समाधान व्यक्त केलं. भाजपने आपल्याला सन्मानाने पक्षात प्रवेश दिला त्यामुळे आपण आज खासदार असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले.
कुणाच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही
मराठा समाजाला आरक्षण देताना कुणाच्याही आरक्षणाला धक्का लावण्यात येणार नाही असं खासदार अशोक चव्हाण म्हणाले. ते म्हणाले की, “निजाम राजवटीतील गॅझेटमधील नोंदींच्या आधारे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं आहे. त्यामुळे इतर कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही. शासनाची भूमिकाही हीच आहे की, आरक्षणाच्या बाबतीत प्रोसिजर फॉलो करूनच पुढे जावं.”
गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाचा अतिशय क्लिष्ट प्रश्न आहे. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी तो सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असून त्यात यशही आलं आहे असं अशोक चव्हाण म्हणाले.
अशोक चव्हाण हे सध्या भाजपचे राज्यसभा खासदार आहेत. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी मुख्यमंत्रिपद भूषवलं. नंतर त्यांच्यावर आदर्श घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. नंतरच्या महाविकास आघाडीमध्ये असतानाही अशोक चव्हाण मंत्री होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
























