![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Kolhapur News : दहावी व बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
SSC HSC Exam : दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार टाळण्यासाठी तसेच कॉपीमुक्त जिल्हा होण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या आहेत.
![Kolhapur News : दहावी व बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश Kolhapur News collector rahul rekhawar says take effective measures to make 10th and 12th exams copy free Kolhapur News : दहावी व बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/13/5f6f83a159911b6330802969365919ba1676295995441444_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kolhapur News : दहावी (SSC Exam), बारावीच्या (HSC Exam) परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार टाळण्यासाठी तसेच कॉपीमुक्त जिल्हा होण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या आहेत. परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार टाळण्याबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात घेण्यात आली. यावेळी माध्यमिक शिक्षण अधिकारी एकनाथ आंबोकर, तहसीलदार संतोष कणसे, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) दिगंबर मोरे, प्रभारी उपशिक्षणाधिकारी आर. डी.पाटील, प्रभारी उपशिक्षणाधिकारी (योजना) केतन शिंदे आदी उपस्थित होते.
बारावी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च 2023 यादरम्यान होत आहे. दहावीची परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च या दरम्यान होणार आहेत. जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले की, कॉपीमुक्त परीक्षा अभियान राज्यात राबविण्यात येत आहे. हे अभियान जिल्ह्यातही प्रभावीपणे राबवण्यासाठी योग्य नियोजन करावे. कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडू नये, याची खबरदारी घ्यावी. तसेच याबाबतीत तपासणी करण्यासाठी भरारी पथके तयार करुन यात अधिकारी व कर्मचाऱ्यांची तत्काळ नियुक्ती करा. परीक्षा केंद्र परिसरासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करा. प्रत्येक परीक्षा केंद्रावर संबंधित विषयाच्या व संबंधित शाळेच्या शिक्षकांव्यतिरिक्त अन्य शिक्षकांची नियुक्ती करा.
विद्यार्थ्यांनी परीक्षेत कॉपी करु नये, याबाबत व्यापक जनजागृती करा, असे सांगून जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले की, विद्यार्थ्यांनी परीक्षेत प्रामाणिकपणे यश मिळवावे. इयत्ता दहावी व बारावी परीक्षा हे जीवनाचे अंतिम उद्दिष्ट नसून आपली गुणवत्ता मेहनतीने सिद्ध करा, मनापासून अभ्यास करुन कठोर परिश्रमाने यश मिळवा. जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण संस्थाचालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्ह्यातील कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडू नयेत, यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली. मागील दहा वर्षांत एखाद्या परीक्षा केंद्रावर अनुचित प्रकार घडला असल्यास याबाबतची आद्ययावत माहिती तयार करावी, जेणेकरुन त्या त्या केंद्रावर अधिक लक्ष देता येईल, असे बलकवडे यांनी सांगितले.
इयत्ता दहावी व बारावी परीक्षांसाठी 17 परिरक्षक केंद्र आहेत. इयत्ता बारावीसाठी 68 मुख्य परीक्षा केंद्रे असून ते 53 हजार 676 विद्यार्थी परीक्षेस बसणार आहेत. इयत्ता दहावीसाठी 136 मुख्य परीक्षा केंद्रे असून 50 हजार 820 विद्यार्थी या परीक्षेस बसणार आहेत. इयत्ता दहावी व बारावी परीक्षेसंदर्भात अनुचित प्रकार घडू नये, याबाबत तपासणी व नियंत्रण ठेवण्यासाठी 5 भरारी पथक नियुक्त करण्यात आले आहेत. इयत्ता दहावी परीक्षेसाठी 3 केंद्रे उपद्रवी असून 4 केंद्रे कुप्रसिद्ध आहेत, तर बारावीची 8 केंद्रे कुप्रसिद्ध आहेत, अशी माहिती माध्यमिक शिक्षण अधिकारी एकनाथ आंबोकर यांनी दिली.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)