![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Hasan Mushrif: जो छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू तो हिंदुस्थानचा शत्रू, औरंगजेब आपला होऊच शकत नाही; हसन मुश्रीफांचे परखड बोल
धर्मा-धर्मात तेढ वाढवून सामाजिक विद्वेष करण्याच्या दृष्टिकोनातून कोणी कितीही चिथावणी देऊ देत. अशा चिथावणीखोरांना बळी पडू नका. सावध राहा-दक्ष रहा, असे आवाहन आमदार हसन मुश्रीफांनी केले.
![Hasan Mushrif: जो छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू तो हिंदुस्थानचा शत्रू, औरंगजेब आपला होऊच शकत नाही; हसन मुश्रीफांचे परखड बोल Hasan Mushrif says on kolhapur violence Shivaji Maharaj enemy is India enemy Aurangzeb cannot be ours Hasan Mushrif: जो छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू तो हिंदुस्थानचा शत्रू, औरंगजेब आपला होऊच शकत नाही; हसन मुश्रीफांचे परखड बोल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/10/a763a394ae096844bd863cc09d7e8c751686418310600736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Hasan Mushrif: छत्रपती शिवाजी महाराज यांनी बहुजनांचे रयतेचे स्वराज्य निर्माण केले. औरंगजेब हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि बहुजनांच्या स्वराज्याचा शत्रू होता. जो छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू तो हिंदुस्थानी मुसलमानांचा शत्रूच, त्यामुळे औरंगजेबाचे उदात्तीकरण होऊच शकत नाही, औरंगजेब हा आपला शत्रूच आहे, असे परखड बोल माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. धर्मा-धर्मात तेढ वाढवून सामाजिक विद्वेष करण्याच्या दृष्टिकोनातून कोणी कितीही चिथावणी देऊ देत. अशा चिथावणीखोरांना बळी पडू नका. सावध राहा-दक्ष रहा, असे आवाहन त्यांनी केले.
कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या 24 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी भवनामध्ये मनोगत व्यक्त करताना मुश्रीफ कोल्हापुरात झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केले. मुश्रीफ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांना मुस्लिम समाजाविषयी कधीच आकस नव्हता. मुस्लिम समाजाचीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर तितकीच गाढ श्रद्धा होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदरी अनेक मुसलमान सरदार, वतनदार आणि इतर चाकरही होते. महाराजांच्या सैन्यदलाचा प्रमुख दौलतखान, महाराजांना जीवाला जीव देणारा आणि त्यांच्यासाठी जीवाची बाजी लावणारा त्यांचा अत्यंत विश्वासू व खास अंगरक्षक मदारी मेहत्तर हे मुस्लिमच होते. तसेच, वकील काजी हैदर, सिद्धी हिलाल, शामाखान, नूरजहा बेगम असे 22 सरदार महाराजांकडे होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात एवढे प्रमुख मुस्लिम असतील तर त्या सैन्यात मुस्लिम मावळे किती असतील, याचीही प्रचिती येते. 75 वर्षांपूर्वी हिंदुस्थान आणि पाकिस्तान अशी फाळणी झाल्यानंतर भारतमाता हीच आमची आई आहे. या मातृत्वाच्या भावनेतूनच हिंदुस्तानी मुस्लिम समाज या मातीत राहीला. सामाजिक विद्वेषातून दंगे-धोपे आणि दंगली घडविणे हा काही लोकांचा अजेंडाच आहे. कोणत्याही बहकाव्यामध्ये येऊन या अजेंड्याला बळी पडू नका. मुस्लिम समाजाने आपल्या लहान, अल्पवयीन मुलांवर लक्ष ठेवून त्यांच्या हातून अशा गोष्टी घडणार नाहीत, याचीही दक्षता घेतली पाहिजे.
किमान पाच जागा जिंकण्याची शपथ घेऊया
दरम्यान, आगामी निवडणुकांमध्ये कोल्हापूर लोकसभेसह जिल्ह्यातील विधानसभेच्या किमान पाच जागा जिंकण्याची शपथ घेऊया. 1999 पासून जेवढ्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये कोल्हापूरची खासदारकीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला आलेली आहे. या लोकसभा मतदार संघातील सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचा प्रभाव असल्याचे मुश्रीफ म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)