एक्स्प्लोर
'शेतकरी आंदोलन राजकीय, देवेंद्र विदर्भाचे असल्याने अनेकांच्या पोटात गोळा'

नागपूर: भाजप जिंकून विदर्भाचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यामुळे सर्वांच्या पोटात गोळा उठला आहे. शेतकरी आंदोलन हे राजकीय होतं. त्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते, असा आरोप सरकारच्या 'वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन'चे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला. तसंच सुकाणू समितीच्या मागण्या अतिशय चुकीच्या आणि गैर आहेत, कर्जमाफीची आवश्यकताच नाही, असा दावाही त्यांनी केला. ज्या पद्धतीने भाजप जिंकले आणि विदर्भाच्या देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळाले, त्यामुळे सर्वांच्या पोटात गोळा उठला आहे, असं तिवारी म्हणाले. "शेतकरी आंदोलन करणारे कोण, चालवणारे कोण, त्यांच्या पाठीमागे कोण? याबाबतचे व्हिडीओ आम्ही पहिले. हे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते होते. हे आंदोलन राजकीय होतं", असा दावा किशोर तिवारी यांनी केला. "शेतकऱ्यांचा जितका राजकीय नेत्यांवरचा विश्वास उडाला आहे, त्यापेक्षाही डबल शेतकरी नेत्यांवरुन विश्वास उडाला आहे. हे मांडवली करतात. आपली सोय झाली की विषय सोडून देतात", असं तिवारी म्हणाले. खासदार राजू शेट्टी हे मोदींच्या कुबड्यांमुळे निवडून आले आहेत. ते आपला एकही माणूस निवडून का आणू शकले नाहीत, असा सवाल किशोर तिवारी यांनी केला. जे सुकाणू समितीत आहेत किंवा कायदा- सुव्यवस्थेच्या गप्पा करत आहेत, त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का? असाही सवाल त्यांनी केला. "देवेंद्र फडणवीस हे गरिबांपर्यंत थेट पोहोचत असल्यामुळे, भाजपच्या आतील आणि बाहेरील नेत्यांना भीती वाटत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीतून आलेले आणि ज्यांना लवकर श्रीमंत बनण्याची इच्छा आहे, त्यांना भीती वाटत आहे. देवेंद्र चांगले काम करु इच्छित आहेत, त्यामुळे मी त्यांना साथ द्यायला आलो आहे. मला भाजपच्या दांभिक नेत्यांशी काही घेणे देणे नाही" , असं किशोर तिवारी म्हणाले.
Before You Go
Omraje Nimbalkar : रीलस्टार म्हणून माझी हिणवणी करतात, तीन दिवसात नुसत्या चर्चेनं वाईट झालो का?
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
महाराष्ट्र
राजकारण






















