Manoj Jarange Maratha Reservation: मनोज जरांगेंचा ताफा अंतरवालीतून वडीगोद्रीत, महिनाभराची शिदोरी घेतली, एकट्या माजलगावातून 1200 गाड्या
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीवरुन मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मराठा समाज महिनाभराचा किराणा घेऊन मुंबईच्या दिशेने निघाला आहे.

Manoj Jarange Patil Maratha Reservation March: मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून सगेसोयऱ्यांचे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या नेतृत्त्वाखाली बुधवारी मराठा आंदोलक अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. जुन्नर, राजगुरु नगर, खेड, चाकण, तळेगाव, लोणावळा, पनवेल, वाशी आणि चेंबूर असा प्रवास करत हा मराठा मोर्चा 28 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानात पोहोचणार आहे. काहीवेळापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांचा ताफा आंतरवाली सराटीच्या वेशीवरुन वडीगोद्री येथे पोहोचला. या मराठा मोर्चाचा आजचा मुक्काम जुन्नरमध्ये असेल.
मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतून निघण्यापूर्वी मुंबईतील आझाद मैदानात दीर्घकाळ आमरण उपोषणाला बसावे लागेल, याची कल्पना मराठा आंदोलकांना दिली. ही आरपारची आणि शेवटची लढाई आहे. कितीही वेळ लागला तरी आपण मुंबई सोडायची नाही, असे मनोज जरांगे यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक तब्बल महिनाभर मुंबईत राहावे लागेल, अशी तयारी करुन घराबाहेर पडले आहेत. मनोज जरंगे यांनी आवाहन केल्यानंतर राज्यभरातील गाव गाड्यांमधून मराठा बांधव आरक्षणासाठी मुंबईकडे निघाले आहेत. परभणी जिल्ह्यातील प्रत्येक गावातून विविध गाड्यांच्या माध्यमातून मराठा समाजबांधव, युवक हे मुंबईकडे निघाले आहेत. दोन महिन्याचा किराणा, गॅस शेगडी, भगुने व इतर साहित्य घेऊन हे मराठा बांधव मुंबईकडे निघाले आहेत. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नसल्याचा निर्धार या मराठा बांधवांनी केला आहे.
Beed Maratha Reservation: जिल्ह्यातून ट्रक भरून मराठा समाज अंतरवली सराटीच्या दिशेने
मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू राहिलेल्या बीड जिल्ह्यातून मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतील आंदोलनासाठी पाठिंबा वाढतोय. मुंबईकडे जाण्यावर मनोज जरांगे ठाम आहेत. आणि त्यांच्यासोबत जाण्यासाठी बीडमधून मोठ्या संख्येने मराठा समाज अंतरवली सराटीत दाखल झाले. ट्रकच्या ट्रक भरून मराठा समाजातील सदस्य पंधरा दिवसांची शिदोरी घेऊन मुंबईकडे निघाले आहेत. एक ना अनेक ट्रक अशा स्वरूपात अंतरवली सराटीवरुन मुंबईला निघाले होते.
Manoj Jarange: मनोज जरांगे काय म्हणाले?
आपण सगळे जण मुंबईच्या दिशेने लगेच निघायचं, थांबायचे नाही. आपण आझाद मैदानावर कायद्याच्या कक्षेत राहून आंदोलन करायचे आहे. 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरु होईल. आपल्याला उचकण्याचा प्रयत्न केला जाईल, खुनशी वागणूक दिली जाईल, पण शांत डोक्याने राहायचं. आता आरपारची शेवटची लढाई आहे, दम धरुन बाजी जिंकू शकतो. कितीही दिवस लागू दे, पण संयम सोडू नका. अशी लढाई कधी जगाच्या पाठीवर झाली नसेल इतक्या डोक्याने ही लढाई जिंकायची आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना सांगितले.
आणखी वाचा
मनोज जरांगेंचा मराठा मोर्चा मुंबईला निघण्यापूर्वी मोठी अपडेट, पोलिसांकडून 40 अटींचं पत्र
























