एक्स्प्लोर
सातव्या दिवशी अण्णा हजारेंचं उपोषण मागे
सरकारचे आत्तापर्यंतचे प्रस्ताव, अण्णांची ढासळत चाललेली प्रकृती या दोन्ही पार्श्र्वभूमीवर बैठकीत चर्चा होईल. अण्णांच्या प्रकृतीबद्दल कालपासून आंदोलकांमध्ये चिंता आहे.

नवी दिल्ली : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी सातव्या दिवशी उपोषण मागे घेतलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जलप्राशन करुन अण्णांनी उपोषण सोडलं. यावेळी व्यासपीठावर कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हेदेखील उपस्थित होते. अण्णा हजारेंच्या बहुतांश मागण्या सरकारने तत्वत: मान्य केल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी अण्णांच्या मान्य झालेल्या मागण्या वाचून दाखवल्या. जनलोकपाल, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचे बदल या मागण्यांसाठी अण्णांचं गेल्या सात दिवसांपासून रामलीलावर उपोषण सुरु होतं. 23 मार्चला म्हणजे शहीद दिनाच्या दिवशी अण्णांनी उपोषणाची सुरुवात केली होती. मात्र अण्णा हजारेंची प्रकृती खालावली होती. त्यांचं वजन पाच किलोंपेक्षा कमी झालं होतं. तर रक्तदाबही कमी झाला होता. यांनंतर सरकारने वेगाने हालचाली करत सुरुवातील गिरीश महाजन यांच्याकडे मध्यस्थीची जबाबदारी दिली होती. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला पोहोचले आणि रामलीला मैदानावर जाऊन अण्णांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांची शिष्टाई कामी आली आणि अण्णांनी उपोषण सोडलं. "सरकारने शेतकऱ्यांशी संबंधित सगळ्या मान्य केल्या आहेत. लोकपाल आणि राज्यांमध्ये लोकायुक्ताची नेमणूक अद्याप झालेली नाही. सरकारने आमच्याकडे सहा महिन्यांची मुदत मागितली आहे. सरकारने आमच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की, सहा महिन्यांआधी आपल्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करु. या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व संघटनांचे आभार," असं अण्णा हजारे म्हणाले. दरम्यान, मागण्या मान्य झाल्या असल्या तरी त्या पूर्ण होण्यासाठी सहा महिन्यांची वाट बघणार, नाहीतर पुन्हा आंदोलन करणार, असा इशाराही अण्णांनी यावेळी दिला. अण्णांच्या आंदोलनातून काय हाती लागलं? कृषीमूल्य आयोगाला स्वायत्तता देण्यासाठी उच्चस्तरीय समिती कृषी अवजारांवरील जीएसटी 12 टक्क्यांवरुन 5 टक्क्यांवर आणणार लोकपालच्या निर्णयाबाबत कालमर्यादा निश्चित करण्याची मागणी मान्य निवडणूक सुधारणांबाबत सरकार सकारात्मक पाऊल उचलणार अण्णांच्या नेमक्या मागण्या काय आहेत? - शेतकऱ्यांचे प्रश्न कृषी उत्पन्नाला उत्पादन खर्चाच्या आधारावर 50 टक्के अधिक भाव मिळावा शेतीवर अवलंबून असलेल्या 60 वर्षांवरील शेतकरी आणि मजुरांना दरमहा 5 हजार रुपये पेन्शन द्यावं कृषीमूल्य आयोगाला स्वायत्तता द्यावी, सरकारी हस्तक्षेप नसावा पिकाचा सामूहिक नव्हे, तर वैयक्तिक विमा असावा - लोकपाल, लोकायुक्त संदर्भातल्या मागण्या जनलोकपाल कायदा त्वरीत लागू करावा, लोकपालची नियुक्ती व्हावी लोकपाल कायदा कमकुवत करणारे कलम 63 आणि 44 मध्ये बदल करावा केंद्राच्या लोकपालप्रमाणे प्रत्येक राज्यात सक्षम लोकायुक्त कायदा लागू करावा - निवडणुकीसंदर्भातल्या मागण्या बॅलेट पेपरवर उमेदवाराचा कलर फोटो हेच निवडणूक चिन्ह असावं मतमोजणीसाठी टोटलायझर मशिनचा उपयोग केला जावा NOTA ला Right To Reject चा अधिकार दिला जावा लोकप्रतिनिधिला परत बोलावण्याचा Right To Recall अधिकार जनतेला असावा
लाईव्ह अपडेट
- रामलीला मैदानावर जाण्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात चर्चा, पंतप्रधान कार्यालयाचे अधिकारी श्रीकर परदेशीही उपस्थित
- नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल, थोड्याच वेळात रामलीला मैदानावर अण्णा हजारेंची भेट घेणार
- आंदोलनातून काय हाती लागलं? -कृषी मूल्य आयोगाला स्वायत्तता देण्याबाबत उच्चस्तरीय समिती -कृषी अवजारांचा जीएसटी 12 वरून 5 टक्क्यांवर आणणार, तीन महिन्यांत अंमलबजावणीचं आश्वासन -लोकपालबाबत कालमर्यादा देण्याची मागणी मान्य -निवडणूक सुधारणांबाबत सरकार सकारात्मक पाऊल उचलणार, सूत्रांची माहिती
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीसाठी रवाना, अण्णा हजारेंच्या आंदोलनावर सात दिवसांनंतर तोडगा दृष्टीपथात, मुख्यमंत्री आणि गिरीश महाजन यांची शिष्टाई अखेर यशस्वी
- ज्येष्ठ विधीज्ञ आणि 2011 च्या आंदोलनातले अण्णांचे सहकारी शांती भूषण रामलीला मैदानावर अण्णा हजारेंच्या भेटीला.
- अण्णांनी आज उपोषण सोडण्याची आवश्यकता, न सोडल्यास प्रकृती आणखी खालावणार, डॉक्टरांची माहिती
- दिल्ली - अण्णांचं उपोषण आज सुटण्याची शक्यता, पीएमओतून आलेल्या सुधारित मसुद्यावर कोअर कमिटीत चर्चा, अण्णांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत दाखल होणार
आणखी वाचा























