Mann Ki Baat: काश्मीर जळत राहावं हे दहशतवाद्यांच्या आकांना वाटतं; पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना न्याय मिळेल, 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींचा पुन्हा इशारा
Mann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या "मन की बात" भाषणामध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर भाष्य केले आहे.

Mann Ki Baat: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, आज (27एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बात कार्यक्रमात पुन्हा एकदा दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाममधील पीडित कुटुंबांना न्याय देण्याचे आश्वासन दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या "मन की बात" (Mann Ki Baat) च्या भाषणात पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरती भाष्य केले आहे. "मन की बात" (Mann Ki Baat) मध्ये बोलताना मोदी म्हणाले, जेव्हा मी तुमच्याशी मनापासून बोलतो तेव्हा माझ्या मनात खूप वेदना होतात. 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने प्रत्येक नागरिकाला दुःख झाले आहे. प्रत्येक भारतीयाची शोकग्रस्त कुटुंबांबद्दल तीव्र सहानुभूती आहे. दहशतवादी आणि त्यांचे आका काश्मीर पुन्हा उद्ध्वस्त करू इच्छितात आणि म्हणूनच त्यांनी एवढा मोठा कट रचला. दहशतवादाविरुद्धच्या या युद्धात देशाची एकता, 140 कोटी भारतीयांची एकता ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. ही एकता दहशतवादाविरुद्धच्या आपल्या निर्णायक लढाईचा आधार आहे, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
काश्मीर जळत राहावं असं दहशतवाद्यांच्या आकांना वाटतं.
आज मन की बात करताना मनात खूप पीडा झाली आहे. हल्ल्यात मरण पावलेल्यांच्या वेदना मी समजू शकतो. पहलगामचा हल्ला दहशतवाद्यांचा हताशपणा दाखवणारा आहे. काश्मिरमध्ये शांतता प्रस्थापित होत होती. शाळा-कॉलेजेस सुरु होते, पर्यटक वाढत होते. रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत असताना हल्ला झाला. देशाच्या दुश्मनांना काश्मीर पूर्वपदावर येऊ नये वाटतं. काश्मीर जळत राहावं असं दहशतवाद्यांच्या आकांना वाटतं. जम्मू-काश्मिरच्या लोकांना दहशतवाद्यांचं हे कृत्य आवडलं नाही. दहशतवादाविरूद्धच्या या युद्धात 140 कोटी भारतीय एक झाले, मी पुन्हा एकदा पीडित कुटुंबांना आश्वासन देतो की, त्यांना न्याय मिळेल, न्याय नक्की मिळेल. या हल्ल्यातील दोषी आणि कट रचणाऱ्यांना सर्वात कठोर उत्तर दिले जाईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींना मन की बातमध्ये म्हटलं आहे.
जागतिक नेत्यांनीही मला फोन केले आहेत
देशासमोरील या आव्हानाला तोंड देण्यासाठी आपल्याला आपला संकल्प बळकट करायचा आहे. एक राष्ट्र म्हणून आपल्याला प्रबळ इच्छाशक्ती दाखवावी लागेल. आज जग पाहत आहे, या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश एका सुरात बोलत आहे. भारतातील लोकांमध्ये जो राग आहे, तो जगभर आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून शोक व्यक्त केला जात आहे. जागतिक नेत्यांनीही मला फोन केले आहेत, पत्रे लिहिली आहेत आणि संदेश पाठवले आहेत. या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा सर्वांनी तीव्र निषेध केला आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला आहे.























