NCERT: 'न्यायपालिकेतील भ्रष्टाचार' प्रकरणावरून सुप्रीम कोर्टाने फटकारलं, NCERT ने मागितली बिनशर्त माफी; आठवीच्या पुस्तकातील 'तो' धडा पुन्हा लिहिणार
NCERT: इयत्ता आठवीच्या सामाजिक शास्त्राच्या पुस्तकात “न्यायपालिकेतील भ्रष्टाचार” असा उल्लेख केल्यामुळे निर्माण झालेल्या वादानंतर NCERT ला बिनशर्त माफी मागावी लागली आहे.

NCERT: इयत्ता आठवीच्या सामाजिक शास्त्राच्या पुस्तकात “न्यायपालिकेतील भ्रष्टाचार” असा उल्लेख केल्यामुळे निर्माण झालेल्या वादानंतर राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अर्थात National Council of Educational Research and Training (NCERT) ला अखेर बिनशर्त माफी मागावी लागली आहे. या संदर्भात देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर संबंधित धडा पुन्हा लिहिण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, इयत्ता आठवीच्या सामाजिक शास्त्राच्या पुस्तकातील एका प्रकरणात न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचाराचा उल्लेख करण्यात आला होता. शालेय स्तरावर न्यायपालिकेबद्दल अशा प्रकारचा मजकूर प्रकाशित झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court of India) याची स्वतःहून (suo motu) दखल घेतली. या प्रकरणावर सुनावणीदरम्यान न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत NCERT कडून स्पष्टीकरण मागितले.
NCERT ने न्यायालयाची मागितली बिनशर्त माफी
सुप्रीम कोर्टाच्या फटकारानंतर NCERT ने न्यायालयाची बिनशर्त माफी मागत हा मजकूर हेतुपुरस्सर समाविष्ट करण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट केले. संस्थेने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार नव्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक संस्थांबद्दल जागरूकता निर्माण करणे हा होता. मात्र त्यामधील काही मजकूर चुकीच्या पद्धतीने मांडला गेला असल्याची कबुली देत NCERT ने खेद व्यक्त केला.
या पार्श्वभूमीवर संबंधित प्रकरण पुन्हा लिहिण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुधारित मजकूरासह पुस्तकाची नवीन आवृत्ती शैक्षणिक सत्र 2026-27 च्या सुरुवातीला इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती NCERT कडून देण्यात आली आहे.
NCERT ची पुस्तक तयार करण्याची प्रक्रिया
1. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (NCF) तयार करणे
NCERT पुस्तकांचा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा मुख्य आधार असतो . सध्याची पुस्तके NCF-SE 2023 आणि नव्या शैक्षणिक धोरणानुसार तयार होत आहेत.
NCF तयार करण्यासाठी आधी विषय समिती स्थापन केली जाते. २०२१ मध्ये 25 समित्या स्थापन झाल्या. या समित्या Position Papers तयार करतात, ज्यात पुस्तकांत काय बदल करावेत हे सांगितलेले असते. मग हे सर्व एका सुकाणू समितीकडे पाठवले जाते.
2. टेक्स्टबुक डेव्हलपमेंट कमिटी (TDC)
प्रत्येक विषयासाठी Textbook Development Committee (TDC) बनवली जाते. यात विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ असतात. काही उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञही यात समाविष्ट केले जातात जेणेकरून त्या विषयाच्या व्यावहारिक गरजा समजतात.
3. मसुदा तयार करणे व अंतर्गत पुनरावलोकन
टेक्स्टबुक डेव्हलपमेंट कमिटीने मसुदा तयार केल्यानंतर तो NCERT अंतर्गत तज्ज्ञांकडे पाठवला जातो. ते तथ्यात्मक अचूकता, शैक्षणिक योग्यता आणि विद्यार्थी वयोमर्यादेनुसार योग्यता तपासतात. त्यानंतर तो अभ्यासक्रम समितीकडे जातो.
4. शासकीय देखरेख
अधिकृतपणे शिक्षण मंत्रालय फक्त धोरणात्मक देखरेख करते आणि पाठ्यपुस्तकातील प्रकरणांना थेट मंजुरी देत नाही. पण अप्रत्यक्ष मॉनिटरिंग असते.
5. अंतिम मंजुरी व प्रकाशन
समाजाकडून सूचना किंवा महत्त्वाची प्रतिक्रिया आल्यास NCERT नव्या समित्या स्थापन करून मजकूराचे पुनरावलोकन केले जाते. बंदी घातलेल्या इयत्ता ८ च्या पुस्तकात 60 हून अधिक योगदानकर्ते होते.
आणखी वाचा
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
























