![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Morbi Bridge Collapse: पोलीस म्हणतात गंजलेल्या तारांमुळे पूल पडला; मॅनेजर म्हणाला, ही तर ईश्वराची इच्छा!
Morbi Bridge Collapse: मोरबी झुलत्या पुलाच्या तारांना गंज लागला होता. त्याची दुरुस्ती केली नसल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी कोर्टाला दिली.
![Morbi Bridge Collapse: पोलीस म्हणतात गंजलेल्या तारांमुळे पूल पडला; मॅनेजर म्हणाला, ही तर ईश्वराची इच्छा! Morbi Bridge Collapse cable of the morbi suspension bridge was rusted police inform to court Morbi Bridge Collapse: पोलीस म्हणतात गंजलेल्या तारांमुळे पूल पडला; मॅनेजर म्हणाला, ही तर ईश्वराची इच्छा!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/02/9e79d993da5ed57512a25a5215afe5a91667360993704290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Morbi Bridge Collapse: गुजरातमधील मोरबीमध्ये रविवारी पूल कोसळून झालेल्या अपघाताप्रकरणी पोलिसांनी स्थानिक कोर्टासमोर महत्त्वाची दिली. झुलत्या पूलाच्या तारांना गंज लागला होता. त्या तारांची दुरुस्ती केली असती तर अपघात घडला नसता अशी माहिती तपास अधिकारी आणि मोरबीचे पोलीस उपअधीक्षक पी.ए. जाला यांनी मंगळवारी कोर्टाला दिली. तर, पोलिसांनी अटक केलेल्या ओरेवा कंपनीचा व्यवस्थापक दीपक पारेख याने ही ईश्वराची इच्छा असल्याने अपघात झाल्याचे म्हटले.
पोलिसांनी पूल अपघाताप्रकरणी जबाबदार ठरवून नऊ जणांना अटक केली आहे. त्यापैकी ओरेवा कंपनीचा व्यवस्थापक दीपक पारेख याने मुख्य मॅजिस्ट्रेट आणि अतिरिक्त वरिष्ठ सिव्हिल न्यायाधीश एम. जे. खान यांच्यासमोर आपला जबाब नोंदवला. त्यावेळी पारेख याने हा अपघात ईश्वराची इच्छा होती. त्यामुळे ही दुर्देवी घटना घडली असल्याचे म्हटले.
मोरबी केबल पूल दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांची संख्या 134 इतकी झाली आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार, अटक करण्यात आलेल्या नऊपैकी चार आरोपींसाठी 10 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी पोलिसांनी केली. डीएसपी जाला यांनी कोर्टात सांगितले की, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या अहवालानुसार, पुलावर किती लोक असावीत, त्याची क्षमता काय आदी बाबी निश्चित न करता सरकारच्या मंजुरीशिवायच 26 ऑक्टोबर रोजी पूल लोकांसाठी खुला करण्यात आला. त्याशिवाय, कोणतेही जीवरक्षक उपकरणे किंवा लाइफगार्ड तैनात करण्यात आला नव्हता. फक्त प्लॅटफॉर्म (डेक) बदलला होता. दुसरे कोणतेही काम केले नाही.
तपास अधिकारी जाला यांनी कोर्टात सांगितले की, हा पूल तारांवर होता. या तारांना ऑईलिंग अथवा ग्रीसिंग करण्यात आले नव्हते. ज्या ठिकाणी तारा तुटल्या त्यांना गंज लागला होता. जर तारांची दुरुस्ती केली असती तर अपघात झाला नसता. पुलाच्या दुरुस्तीचे कोणते काम करण्यात आले, ते काम कसे करण्यात आले, याबाबत माहिती देणारे कोणतेही दस्ताऐवज ठेवण्यात आले नाहीत. पुलाची दुरुस्ती आणि देखभालीसाठी जे साहित्य खरेदी करण्यात आले, त्याची तपासणी करणे अद्याप बाकी असल्याचीही माहिती कोर्टाला देण्यात आली.
सरकारी वकील एच.एस. पांचाळ यांनी सांगितले, आतापर्यंत केलेल्या तपासानुसार, कंत्राट देण्यात आलेले इंजिनिअर निकष पूर्ण करत नव्हते आणि त्यांनी दुरुस्तीचे काम केले नाही.
पोलिसांनी दीपक पारेख, दिनेशभाई महासुखराय दवे, कंत्राटदार प्रकाशभाई लालजीभाई परमार आणि देवांगभाई प्रकाशभाई परमार यांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. पारेख यांचे वकील अॅड. जी.के. रावल यांनी कोर्टाला सांगितले की, पुलाची सुरक्षा निश्चित करण्यात पारेख यांची कोणतीही भूमिका नव्हती. पारेख हे ग्राफिक डिझाइनचे काम करत होते आणि कंपनीत मीडिया मॅनेजर म्हणून काम करत होते. पारेख यांनी सांगितले की, कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांपासून ते सर्व कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले. मात्र, ईश्वराची इच्छा असल्याने अशी दुर्देवी घटना घडली.
अॅड. रावल यांनी सांगितले की, कंत्राटदार हे फक्त वेल्डिंग, इलेक्ट्रिक फिटिंग सारख्या कामांसाठी जबाबदार होते. त्यांना मिळालेल्या साहित्य, उपकरणांच्या आधारे त्यांनी हे काम केले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)