एक्स्प्लोर
Advertisement
विवेक तिवारी हत्या: शवविच्छेदन अहवालाने यूपी पोलिसांची पोलखोल
शवविच्छेदन अहवालानुसार विवेक तिवारींच्या शरिरात मारलेली गोळी ही वरुन खाली गेली आहे. म्हणजेच कॉन्स्टेबल प्रशांत चौधरीने समोरुन वरच्या बाजूने विवेक यांना गोळी मारली.
लखनऊ: उत्तर प्रदेश पोलिसांनी संशयित समजून ठार केलेला अॅपल कंपनीचा एरिया मॅनेजर विवेक तिवारी यांचा पोस्टमॉर्टम अहवाल आला आहे. यामध्ये पोलिसांचा खोटारडेपणा उघडकीस आला आहे. एबीपी न्यूजला उत्तर प्रदेशातील पोलीस महासंचालक कार्यालयातून हा अहवाल मिळाला आहे. आतापर्यंत पोलिसांनी सातत्याने कॉन्स्टेबल प्रशांत चौधरीने स्वसंरक्षणासाठी गोळी झाडल्याचा दावा केला आहे. प्रशांत यांनीही जबाब देताना म्हटलं होतं की, गाडीची धडक बसून खाली पडलो होतो, त्यावेळी विवेक आपल्या अंगावर गाडी चढवेल अशी भिती होती. त्यामुळेच आपण सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळी झाडल्याचं प्रशांत चौधरींनी म्हटलं आहे.
शवविच्छेदन अहवाल
मात्र शवविच्छेदन अहवालानुसार विवेक तिवारींच्या शरिरात मारलेली गोळी ही वरुन खाली गेली आहे. म्हणजेच कॉन्स्टेबल प्रशांत चौधरीने समोरुन वरच्या बाजूने विवेक यांना गोळी मारली. प्रशांतला कोणतीही दुखापत झाली नव्हती. ना ते गाडीच्या धडकेने खाली पडले होते. कॉन्स्टेबल प्रशांत चौधरीने विवेक यांना अत्यंत जवळून गोळी मारल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. ही गोळी त्यांच्या शरीरातच रुतली होती.
डॉक्टर जितेंद्र श्रीवास्तव आणि प्रवीण कुमार शर्मा यांच्या टीमने विवेक तिवारी यांचं शवविच्छेदन केलं. 28 आणि 29 सप्टेंबरच्या रात्री विवेक यांना गोळी मारण्यात आली होती. अॅपल कंपनीचा एरिया मॅनेजर विवेक तिवारी हे आपली सहकारी सना हिला सोडण्यासाठी घरी जात होते. रात्री दीडच्या सुमारास गोमतीनगर परिसरात पोलिसांनी त्यांना गोळी मारली.
पोलिसांची सारवासारव
प्रशांत आणि संदीप नावाचे दोन पोलीस गस्तीवर होते. त्यावेळी त्यांनी विवेक यांना गाडी थांबवण्यास सांगितलं. मात्र विवेक यांनी गाडी न थांबवल्याने प्रशांतने त्यांना गोळी मारली. गोळी लागल्याने विवेक यांची गाडी भिंतीला धडकली. या सर्व घटनेदरम्यान सना त्यांच्या गाडीतच होती. गाडी भिंतीवर आदळल्याने विवेक यांच्या डोक्यालाही मार लागून रक्त येऊ लागलं. मात्र सनाला काहीही दुखापत झाली नाही.
विवेक तिवारी यांना रात्री 2 वाजून 5 मिनिटांनी गोमती नगरच्या लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र 20 मिनिटातच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी आधी विवेक यांचा मृत्यू गाडीच्या अपघातामुळे झाल्याचं म्हटलं होतं. मग पोस्टमॉर्टम अहवाल आल्यावर अधिक माहिती देऊ असं सांगितलं. पण या अहवालाने पोलिसांची पोलखोल केली. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळी चालवल्याचं नवं कारण दिलं.
पोलिसांनी सनाच्या नावे गुन्हा दाखल केला आहे. याच एफआयआरमध्ये कुठून तरी गोळी चालली असं म्हटलं. आता एसआयटी या प्रकाराची चौकशी करत आहे.
पोलिसांवर खुनाचा गुन्हा
ज्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा या गोळीबारामध्ये समावेश होता, त्यांच्यावर भा.दं.वि. कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय त्यांना अटकही करण्यात आली आहे. ही परिस्थिती टाळली जाऊ शकत होती. प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती यूपी पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.
कोण आहे मृत तरुण?
सुलतानपूर इथे राहणारा विवेक हा तरुण अॅपल कंपनीचा एरिया मॅनेजर या पदावर काम करत होता. त्याच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुली आहेत. याचदरम्यान विवेकची सहकारी सना हिला मीडियाशी बोलू नये यासाठी पोलिसांनी नजरकैदेत ठेवलं आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
प्रत्यक्षदर्शी नजरकैदेत
पोलीस कर्मचाऱ्याने गोळी मारल्याची घटनेची विवेकची महिला सहकारी ही प्रत्यक्षदर्शी आहे. तिला पोलिसांनी गोमतीनगरमधील तिच्या घरीच नजरकैदेत ठेवलं आहे, जेणेकरुन तिला मीडियाशी बोलता येणार नाही. गोळीबाराची घटना घडली तेव्हा ती विवेकसोबत कारमध्ये होती.
पत्नीचा सवाल
विवेकच्या पत्नीने या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. ''विवेकला फोन केला तेव्हा त्याने सांगितलं की सोबत असलेल्या महिला सहकाऱ्याला तिच्या घरी सोडून येणार आहे. काही वेळाने फोन केला तर दुसऱ्या एका व्यक्तीने फोन उचलला आणि सांगितलं की अपघात झालाय. रुग्णालयात गेल्यानंतर खरं काय ते सांगितलं नाही. असं सांगण्यात आलं, की डोक्याला मार लागल्यामुळे जास्त रक्तस्राव झाला आणि त्यांना वाचवता आलं नाही,'' अशी माहिती विवेकची पत्नी कल्पनाने दिली.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही कल्पना यांनी काही सवाल केले आहेत. “मला योगी आदित्यनाथ यांच्याकडून उत्तर हवंय की पोलिसांनी माझ्या नवऱ्याला का मारलं? ते कोणत्याही परिस्थितीत असतील तरी गोळी का मारली? आरटीओकडून नंबर घेऊन नंतर पत्त्यावर येऊ शकले नसते का? गोळी मारण्याची काय गरज होती,” असा सवाल कल्पना यांनी केला आहे.
संबंधित बातम्या
संशयित समजून यूपी पोलिसांनी अॅपलच्या एरिया मॅनेजरलाच गोळी घातली
ना कायदा, ना कोर्ट, संशय आला की यूपी पोलीस थेट डोक्यात गोळी घालतात
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion