![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Gadchiroli News : आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे टीबीग्रस्त आदिवासी युवकाचा मृत्यू, रुग्णवाहिका न मिळाल्याने मृतदेह खाटेला बांधून दुचाकीवरुन नेला
Gadchiroli News : आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे 23 वर्षीय क्षयरोगग्रस्त (TB) आदिवासी तरुणाचा मृत्यू झाला. इतकंच नाही तर मृत्यूनंतर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने त्याचा मृतदेह खाटेला बांधून दुचाकीवरुन गावात नेण्यात आला.
![Gadchiroli News : आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे टीबीग्रस्त आदिवासी युवकाचा मृत्यू, रुग्णवाहिका न मिळाल्याने मृतदेह खाटेला बांधून दुचाकीवरुन नेला Gadchiroli News Dead body of youth tied to a cot and taken away on a two-wheeler as an ambulance was not received on time Gadchiroli News : आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे टीबीग्रस्त आदिवासी युवकाचा मृत्यू, रुग्णवाहिका न मिळाल्याने मृतदेह खाटेला बांधून दुचाकीवरुन नेला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/25/6f13dce754d67dcd5b2bfa4d182369a0169026115476583_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Gadchiroli News : भारताला स्वातंत्र्य मिळून आता 75 पेक्षा जास्त वर्ष झाली मात्र तरीही आदिवासी पाड्यातील परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. मूलभूत सोयीसुविधांचा अभावामुळे आजही अनेकांचे नाहक बळी जात आहेत. अशीच घटना गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात घडली. आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे 23 वर्षीय क्षयरोगग्रस्त (TB) आदिवासी तरुणाचा मृत्यू झाला. इतकंच नाही तर मृत्यूनंतर रुग्णवाहिका (Ambulance) उपलब्ध नसल्याने त्याचा मृतदेह खाटेला बांधून दुचाकीवरुन गावात नेण्यात आला. या घटनेमुळे गडचिराेलीच्या दुर्गम भागातील आराेग्यसेवेचे धिंडवडे निघाले आहेत.
रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने शव खाटेला बांधून दुचाकीवरुन गावी नेला
भामरागड तालुक्यातील दुर्गम कृष्णार येथील गणेश लामी या 23 वर्षीय युवकाचा क्षयरोगामुळे मृत्यू झाल्याने आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. 17 जुलै रोजी गणेशला गंभीर अवस्थेत हेमलकसा येथे भरती करण्यात आले होते. 20 जुलैला उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने शव दुचाकीवर खाटेला बांधून गावी नेण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे तरुणाचा मृत्यू
देशात क्षयरोग निर्मूलनासाठी विशेष मोहीम चालवण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष विभाग कार्यरत असतो. निदान झाल्यानंतर रुग्णाला नियमित औषधोपचार देणे, वेळोवळी आरोग्यसेवकांच्या माध्यमातून त्याची देखरेख करणे, यासाठी सरकारकडून कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात येतो. मात्र, गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे कृष्णार येथील 23 वर्षीय क्षयरोगग्रस्त आदिवासी तरुण गणेश तेलामी याला जीव गमवावा लागला. जवळपास सहा महिन्यांपासून क्षयरोगग्रस्त रुग्ण परिसरात असल्यानंतरही आरोग्य विभाग झोपेत होतं काय असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
मृतदेह दुचाकीवर खाटेला बांधून नेला
बरं एवढ्यावरच हा प्रकार थांबला नाही. मृत्यूनंतर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने गणेशचा मृतदेह दुचाकीवर खाटेला बांधून गावात आणण्यात आला. हा प्रकार लक्षात येताच खळबडून जागं झालेल्या प्रशासनाने शववाहिका पाठवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत मृतदेह गावात पोहोचला होता. दरम्यान या प्रकरणी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याचं तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण चौधरी यांनी सांगितलं.
हेही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)