Manoj Jarange Patil : सातारा गॅझेटिअरबाबत निर्णय न झाल्यास रस्त्यावर फिरू देणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, भुजबळांवरही कडाडले!
Manoj Jarange Patil : मी मराठवाड्यातला सर्व मराठा समाज आरक्षणात घालणार आहे. थोड्याच दिवसात मराठ्यांना हे दिसणार आहे. त्यामुळे मराठ्यांनी संभ्रम निर्माण करून घेऊ नये, असे देखील मनोज जरांगेंनी म्हटले.

Manoj Jarange Patil : मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील (Maratha Reservation) आठ मागण्यांपैकी सहा मागण्या राज्य सरकारने (Maharashtra Government) मान्य करत त्यासंदर्भात शासन निर्णय (जीआर) जारी केला आहे. या निर्णयानंतर गेल्या पाच दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांनी आंदोलन मागे घेत समाधान व्यक्त केले. मंगळवारी सायंकाळी, राज्यभरात विविध ठिकाणी मराठा समाजाकडून या निर्णयाचं सेलिब्रेशन करण्यात आलं. सहा महत्त्वाच्या मागण्या मान्य झाल्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं.मात्र, सरकारच्या या जीआरला आता ओबीसी नेत्यांकडून तीव्र विरोध होऊ लागला आहे. विशेषतः मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी या जीआरविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. तर ओबीसी समाजाची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने उपसमिती गठीत केली आहे. यावर भाष्य करताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिलाय. तर छगन भुजबळ यांच्यावर देखील मनोज जरांगे पाटील यांनी निशाणा साधला.
छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ओबीसीत मराठ्यांना मीच घालणार आहे. ओबीसी समाजाला जसं तुम्ही उपसमिती गठीत केली. तशीच दलित, मुस्लिमांसाठी उपसमिती गठीत करा. एक शेतकऱ्यांसाठी, आदिवासी आणि मायक्रो ओबीसींसाठी करा. गरीबांचा कल्याण होऊ द्या, असे त्यांनी म्हटले.
भुजबळ म्हणजे पक्षाचं अस्तित्व संपवणारा माणूस
गेल्यावेळी ओबीसी उपसमितीच्या अध्यक्षपदी छगन भुजबळ यांची नेमणूक करण्यात आली होती. यंदा मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांचे पंख कापल्याची चर्चा रंगली आहे याबाबत विचारले असता मनोज जरांगे पाटील म्हणाले की, भुजबळ म्हणजे पक्षाचं अस्तित्व संपवणारा माणूस आहे. कार्यकर्त्यांचा अस्तित्व संपवणारा माणूस आहे. त्यामुळे बावनकुळे साहेब त्यांना चांगले वाटले असतील. कोणाला केले तरी मला काय करायचं आहे? तो माझा विषय नाही. माझा विषय आरक्षण आहे मी त्यात कुठून पडलेलो आहे, असे म्हणत त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला.
सातारा गॅझेटिअरबाबत निर्णय न झाल्यास रस्त्यावर फिरू देणार नाही
मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, कोणी कितीही आमच्यात संभ्रम निर्माण केला. तरी माझा समाज कोणावर विश्वास ठेवत नाही आणि मी देखील कोणावर विश्वास ठेवत नाही. कारण माझ्या समाजाला माहित आहे की जे आता बोंबलत आहेत, संभ्रम निर्माण करत आहेत हे आधी कुठे झोपलेले होते? हे आधी का येत नाहीत? बैठकांना बोलवल्यावर येत नाहीत. मुंबईत बोलवल्यावर येत नाहीत, हे कशातच नसतात. हे फक्त टीव्हीवर असतात. मला हे अभ्यासक बोलवायचे देखील नव्हते. मराठा समाजाची देखील हीच इच्छा होती. पण, मुंबईतील काही बांधव बोलले की, आपण त्यांना विश्वासात घेऊन सोबत घेतले पाहिजे त्यामुळे त्यांना बोलावले. परंतु हे संभ्रम निर्माण करतात. मराठा समाजात संभ्रम निर्माण होणार नाही. मी मराठवाड्यातला सर्व मराठा समाज आरक्षणात घालणार आहे. थोड्याच दिवसात मराठ्यांना हे दिसणार आहे. त्यामुळे मराठ्यांनी संभ्रम निर्माण करून घेऊ नये. पश्चिम महाराष्ट्रात असलेल्या सातारा गॅझेटिअरबाबत देखील सरकारने हयगय करता कामा नये, जर हे झाले नाही तर तुम्हाला मी पुन्हा रस्त्यावर फिरणे बंद करेल, असा इशारा त्यांनी यावेळी राज्य सरकारला दिला.
आणखी वाचा

























