![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
अबब! 2 लाख 40 हजार वाहनधारकांना दंड भरण्यासाठी एकाच दिवशी बोलावले; औरंगाबाद पोलिसांच्या आदेशाची सर्वत्र चर्चा
Aurangabad Police News: यामुळे 11 तारखेला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे लोक अदालतमध्ये मोठी गर्दी उसळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
![अबब! 2 लाख 40 हजार वाहनधारकांना दंड भरण्यासाठी एकाच दिवशी बोलावले; औरंगाबाद पोलिसांच्या आदेशाची सर्वत्र चर्चा maharashtra News Aurangabad News 2 lakh 40 thousand vehicle owners were called to pay the fine on the same day अबब! 2 लाख 40 हजार वाहनधारकांना दंड भरण्यासाठी एकाच दिवशी बोलावले; औरंगाबाद पोलिसांच्या आदेशाची सर्वत्र चर्चा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/04/2f8aa8bc79316f2de009cd9c088b41011675487198584443_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aurangabad Police News: वाहन नियम तोडणाऱ्या वाहनधारकांवर कायदेशीर कारवाई केल्यानंतर दंड भरण्यावरून होणारे वाद लक्षात घेता वाहतूक पोलिसांकडून आता ई-चलानद्वारे कारवाई येत आहे. मात्र ई-चलानद्वारे कारवाई करून देखील दंड न भरणाऱ्या वाहनधारकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे औरंगाबाद (Aurangabad) पोलिसांनी आता अशा वाहनधारकांना दंड भरण्यासाठी नोटीस पाठवल्या असून, 11 फेब्रुवारीला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे लोक अदालतमध्ये हजर राहण्याचे कळवले आहे. मात्र एकाचवेळी 2 लाख 40 हजार 768 वाहनधारकांना हजर राहण्याची नोटीस देण्यात आल्याने चर्चेचा विषय बनला आहे. तर यामुळे 11 तारखेला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे लोक अदालतमध्ये मोठी गर्दी उसळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
याबाबत औरंगाबाद पोलिसांनी याबाबत एक पत्र काढले आहे. ज्यात म्हटले आहे की, औरंगाबाद शहर पोलीस आयुक्त कार्यालयाअंतर्गत वाहतूक विभागतर्फे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारक, चालकावर ई चलानद्वारे कारवाई करण्यात येते. मात्र ज्या वाहनधारकांनी त्यांना देण्यात आलेले ई-चलान तडजोड रक्कम अद्याप भरलेली नाही, अशा 2 लाख 40 हजार 768 वाहन धारकांना SMS द्वारे नोटीस आणि सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या वाहनधारकांनी 11 फेब्रुवारीरोजी सकाळी 11 वाजता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण लोक अदालतमध्ये हजर राहणे बाबत नोटीस देण्यात आली आहे. ज्यामध्ये खाजगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या बसेस (लक्झरी), जड वाहने, काळी पिवळी, रिक्षा आणि इतर वाहने यांचा समावेश असून त्यांनी शक्य तितक्या लवकर दंडाचा भरणा करावा, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
एकाच दिवशी आणि एकाचवेळी दोन लाख वाहनधारकांना बोलावले...
औरंगाबाद वाहतूक पोलिसांनी ई-चलानद्वारे कारवाई करून देखील, 2 लाख 40 हजार वाहनधारकांनी दंड भरला नाही. त्यामुळे या सर्वाना तडजोडीसाठी लोक अदालतमध्ये उपस्थित राहण्याचे आदेश पोलिसांनी काढले आहे. मात्र एकाच दिवशी आणि एकाचवेळी 2 लाखपेक्षा अधिक लोकांना लोक अदालतमध्ये बोलवण्यात आले आहे. यातील काही लोकं ऑनलाईन दंड भरतीलही, पण तरीही उपस्थित राहणाऱ्या वाहनधारकांची संख्या मोठी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावेळी मोठी गर्दी उसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे यासाठी पोलिसांकडून नेमकं काय नियोजन करण्यात येणार हे पाहणं देखील तेवढच महत्वाचे असणार आहे.
न्यायालयात जाण्याची ईच्छा नसल्यास 'हे' करा
ई- चलनाच्या दंडाची रक्कम शक्य तितक्या लवकर खालील पत्त्यावर भरणा केल्यास त्यांना न्यायालयात जाण्याची गरज पडणार नाही.
- वाहतूक शाखेचे कार्यालय किंवा विविध वाहतूक पॉईंटवर हजर असलेले वाहतूक अधिकारी, अंमलदार यांच्याकडे भरणा करु शकता.
- वाहतूक पोलीसांकडे असलेल्या ई- चलान डिव्हाईसद्वारे डेबिट कार्ड किंवा क्रेडीट कार्ड स्वरुपात भरणा करु शकता.
- ई- चलान डिव्हाईसमधील QR कोडद्वारे Online पद्धतीने दंडाचा भरणा करु शकता.
- वाहन धारकांना प्राप्त झालेले ई- चलान मेसेजमधील लिंकवर टच करुन, दंडाचा भरणा करु शकता.
- औरंगाबाद जिल्हा विधी सेवा प्राधिकरणची नोटीसच्या शेवटच्या पानावर तडजोड रक्कम, डाची रक्कम भरण्यासाठी लिंक दिलेली आहे. त्याद्वारे दंडाची रक्कम भरु शकता.
- MahaTrafficechallan.gov.in या वेबसाईटवर जाऊन दंडाचा भरणा करु शकता.
- MahaTrafficapp मोबाईलमध्ये Install करुन, त्यामध्ये वाहन धारक आपल्या वाहनावरील ई- चलान पाहणे, चलन दंडाची रक्कम भरणे, चलान विषयी समस्या असल्यास त्या नोंदविता येतात.
महत्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)