कोरोनाची लाट ओसरतेय, प्रादुर्भावाचे प्रमाण कमी होत आहे. मात्र, कोरोना नष्ट झालेला नाही. अजूनही राज्यात दररोज हजारोंच्या घरात कोरोनाचे नवीन रुग्ण सापडत आहेत. या आजाराने दररोज मृत्यू होतच आहेत. या सगळ्या परिस्थितीचा विचार केला तर आजही कोरोनाचे संकट टळलेलं नाही. आजही या संसर्गजन्य आजाराची टांगती तलवार लटकलेली आहे. प्रशासन सगळ्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून वेळेच्या-वेळी आढावा घेत आहे. गेल्या काही दिवसांत अजूनही कोणते मोठे निर्णय घेतले नसले तरी मुंबईची लाईफ लाईन मानली जाणारी लोकल सेवा नवीन वर्षात सुरु होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. सध्या नियमाप्रमाणे एका ठिकाणी 50 पेक्षा जास्त लोकांना जमण्यास मनाई आहे. प्रशासन कुठल्याही प्रकारची गर्दी होऊ नये यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. त्यातच अनेकांना थर्टी फर्स्ट म्हणजे नवीन वर्षाचे स्वागत करण्याचे वेध लागले आहेत. मात्र, कोरोनाचा हा काळ पाहता गेले वर्षभर कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सर्वच सण-सोहळे लोकांनी साधेपणाने साजरे केले, त्यामुळे यंदाचा थर्टी फर्स्ट साधेपणाने साजरा व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुंबई महापालिका प्रशासन या संदर्भात काही नवीन नियमावली आणायची का? यासंदर्भात 20 डिसेंबरनंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेणार आहे.


आपल्याकडे गेल्या काही वर्षांपासून वर्षाचा शेवटचा दिवस 31 डिसेंबर - थर्टी फर्स्ट हा दिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. मोठ-मोठ्या पार्ट्यांचे आयोजन विविध ठिकाणी केले जाते. साहजीकच या काळात खूप मोठ्या संख्येने नागरिक गर्दी करतात. जल्लोषात नाचत वाजवत नवीन वर्षाचे स्वागत करत असतात. मात्र, यंदाचे वर्ष हे जगातील सर्वच भागातील लोकांना 'कोरोना' वर्ष म्हणून कायम स्मरणात राहणार आहे. या संसर्गजन्य आजाराच्या वातावरणाचा अनुभव सगळ्यांनीच घेतला आहे. अनेक महिने लोकांनी घरात बसून काढली आहे.


आजही अनेक वयस्क लोकांच्या मनात या आजाराने धास्ती निर्माण केली आहे. या आजाराने मोठ्या प्रमाणात वयस्क लोकांचे मृत्यू झाले आहेत. मात्र, प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी यंदाचे सर्वच सण वैयक्तिक कार्यक्रम छोटेखानी पद्धतीने साजरे केले. सध्या या आजाराने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी असली तरी आरोग्य यंत्रणा सर्व तयारी करून सज्ज आहे. कारण कोरोना हा कशा पद्धतीने वाढू शकतो याचे ठोकताळे अजून कुणी बांधू शकलेले नाही. त्यामुळे अजून काही काळ शक्यतो या आजारा विरोधातील लस येईपर्यंत किंवा त्याच्यानंतर काही काळ लोकांना सुरक्षिततेचे नियम पाळून आपले आयुष्य जगावे लागणार आहे.


याप्रकरणी मुंबई शहराच्या कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश सुपे सांगतात, की, "आपल्याकडे अजूनही कोरोनाची पहिलीच लाट सुरु आहे, जोर मात्र कमी झाला आहे हे निश्चित. मात्र, नियमाचे काटेकोर पालन करत राहणे काळाची गरज आहे. पाश्चिमात्य देशात पहिली लाट आली रुग्णसंख्या नगण्य इतकी झाली आणि सर्व काही आलबेल असल्याचं वाटत असतानाच झपाट्याने रुग्णसंख्या वाढीस लागली. तिथे काही ठिकाणी दुसरी लाट सुरु आहे. आपल्याकडे मात्र तसे झाले नाही आपली पहिलीच लाट अजून संपलेली नाही. आपण सगळ्यांनीच वर्षभर खूप काळजी घेतली आहे. आता आणखी काही काळ आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. लस आल्यानंतर या संकटातून बाहेर पडू अशी आशा आहे, तोपर्यंत विनाकारण गर्दी होणार नाही याची सर्वानीच दक्षता घ्यायला हवी.


राज्याचा आरोग्य विभाग दररोज कोरोना संबंधित रुग्णांच्या आकडेवारीचा अहवाल जाहीर करत असते. त्यानुसार शुक्रवार, 11 डिसेंबर रोजी, 4 हजार 268 रुग्णांचे निदान झाले असून 87 नागरिकांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. तर 2 हजार 774 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ह्या आकडेवारी वर नजर टाकली तर कोरोनाने अजूनही राज्याची पाठ सोडलेली नाही. त्यामुळे प्रशासन वारंवार नागरिकांना सुरक्षिततेचे नियम पाळा असे आवाहन करत आहे. बराच काळ लोकांनी घरी बसून काढल्यामुळे मोकळीक मिळताच नागरिकांनी रस्त्यावर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. ज्यांना बाहेर जाण्याशिवाय पर्याय नाही, त्यांनी मास्क घालूनच घराबाहेर पडावे आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेत. मात्र काही जण विनाकारण रस्त्यांवर गर्दी करतात. ते जर टाळता आले तर नक्कीच कोरोना पसरण्याचे शक्यता कमी होण्यास मदत होऊ शकते. शेवटी प्रशासनातील यंत्रणा प्रत्येक नागरिकांच्या मागे तर राहू शकत नाही. काही गोष्टी ह्या नागरिकांनी स्वतःच ठरवायच्या आहेत.


मुबंई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त्त सुरेश काकाणी यांनी एबीपी माझा डिजीटलशी बोलताना सांगितले कि, "निश्चितच कुणीही कुठेही गर्दी करून नये अशा स्वरूपाच्या सूचना आहेत आणि रहातील. मात्र 20 डिसेंबर नंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील सूचना जारी करण्यात येणार आहे. सुरक्षिततेचे नियम सगळ्यांनी पाळलेच पाहिजे यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.


ऑक्टोबर 7 ला, ' धोका टळलेला नाही!' या शीर्षकाखाली सविस्तर लिखाण करण्यात आले होते. त्यामध्ये, दैनंदिन रुग्णसंख्या कमी होत आहे, रुग्णसंख्येचा चढता आलेख उतरणीला लागला आहे. हे वास्तव असले तरी धोका मात्र अजिबात टळलेला नाही. कारण मागील काही काळातील आपण कोरोनाचे वर्तन बघितले तर लक्षात येते कि ज्या ज्या ठिकाणची कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या कमी झाली होती. त्या परिसरातील संख्या पुन्हा एकदा वाढीस लागली होती. त्यामुळे राज्यातील काही शहरात आणि जिल्ह्यात ही संख्या कमी होत असली तरी कधीही वाढू शकते. त्यामुळे नागरिकांनी रुग्णसंख्या कमी झाली असून सगळं काही आलबेल झालं आहे ह्या भ्रमात कदापी न राहता अधिक सजग राहणे गरजेचे आहे, नाहीतर गफलत होऊ शकते. कोरोना रुग्ण बरे होत असले तरी अनेक रुग्ण असे आहेत कि त्यांना घरी जाऊन काही वेगळ्या व्याधींना सामोरे जावे लागत असून वेळ प्रसंगी रुग्णालयात पुन्हा उपचाराकरिता दाखल करावे लागत आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार असून त्यापासून सुरक्षित राहायचे असल्यास सध्याच्या घडीला एक उपाय आहे तो म्हणजे सुरक्षिततेचे नियम पाळणे.


कोरोनाची पहिली लाट येऊन गेली आहे की ही दुसरी लाट आहे, की आपण आता सर्वोच्च बिंदूवर आहोत हे शास्त्रीय आधारावर अजून कुणी सांगू शकलेले नाही, प्रत्येकजण आडाखे बांधत आहे. त्यामुळे कोरोना येत्या काळात कसा वागेल याचा थांगपत्ता कुणालाच नाही. अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येण्यासाठी काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे त्याचा कुणीही गैरफायदा न घेता केवळ आवश्यक कामासाठीच घराबाहेर पडावे, कारण कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही.


सगळ्यांनाच पूर्वीसारख्या सर्व गोष्टी करायच्या आहेत. मात्र, कोरोनाच्या या आजाराने सर्वाच्याच आयुष्यात 'खो' घातला आहे. मात्र, एवढा मोठा काळ धीराने, संयमाने काढला आहे. त्यामुळे आणखी काही काळ आपण नवीन जीवनशैलीचा अवलंब करून काढू शकतो. ज्या पद्धतीने लसीकरणाच्या मोहिमेच्या कामाची जोरदार तयारी राज्य आणि महापालिका प्रशासन करत आहे. त्यावरून लवकरच लस सर्वसामान्यांना मिळेल याची शक्यता नाकारता येत नाही. थर्टी फर्स्ट काय आणि अन्य सोहळे सगळ्यांनाच साजरे करायचे आहेत. एकदा का वैद्यकीय तज्ञांनी आता धोका टळला आहे असे जाहीर केले की आपण सगळ्या गोष्टी पूर्वीसारख्या साजरे करु शंका नाही. तो पर्यंत थोडा धीरच धरलेला बरा.


संतोष आंधळे यांचे आणखी काही महत्वाचे ब्लॉग