एक्स्प्लोर

जातीधर्माच्या कळपातले प्रतिबिंब..

लोकांच्या जाती, धर्म पाहून त्यांच्याविषयी आपल्या धारणा निश्चित करण्याचे खूळ आमच्या डोक्यात इतके पक्के होत चालले आहे की आम्ही त्या बाबतीत निर्ढावत आहोत. शिवाजी महाराजांचे चित्र असलेला शर्ट परिधान केला म्हणून दंगलीत जीव गमवावा लागणारा राहुल फटांगळे असो की बाबासाहेबांची रिंगटोन मोबाईलमध्ये वाजल्यामुळे जीवाला मुकणारा सागर शेजवळ असो, आपण या बाबतीत बधीर होत चालल्याची लक्षणे दिसून येताहेत.

आपल्या प्रगल्भतेचा म.सा.वि. दिवसेंदिवस वाढतो आहे, शेअर किंवा कमोडीटीप्रमाणे भलेही त्याचे मूल्यमापन करून राजरोस प्रसिद्धीला दिले जात नसेल पण अलीकडच्या काळात घडणाऱ्या घटना अन त्यावरील पडसाद त्याचे द्योतक आहेत. याचे तुष्टीकरण करणाऱ्या अनेक घटना आपल्या भोवताली सातत्याने घडत असतात. दोनच दिवसांपूर्वी मध्यप्रदेशात सतना शहरात एका जमावाने गोमांस बाळगल्याच्या संशयावरून एकाची हत्या केली. लोकांच्या जाती, धर्म पाहून त्यांच्याविषयी आपल्या धारणा निश्चित करण्याचे खूळ आमच्या डोक्यात इतके पक्के होत चालले आहे की आम्ही त्या बाबतीत निर्ढावत आहोत. शिवाजी महाराजांचे चित्र असलेला शर्ट परिधान केला म्हणून दंगलीत जीव गमवावा लागणारा राहुल फटांगळे असो की बाबासाहेबांची रिंगटोन मोबाईलमध्ये वाजल्यामुळे जीवाला मुकणारा सागर शेजवळ असो, आपण या बाबतीत बधीर होत चालल्याची लक्षणे दिसून येताहेत. अशा घटना आपल्या देशात सातत्याने घडत असतात आणि अलीकडील काळात त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ही बाधा सर्व क्षेत्रात झाली आहे. अगदी चित्रपट क्षेत्रात देखील. सलमान खान आणि संजय दत्त यांच्यावरील खटले आणि त्यावर केला गेलेला वाद प्रतिवाद यालाही धार्मिक रंगाची काळी किनार होती. पण कुणालाच त्याचे सोयरसुतक नव्हते.  काही काळापूर्वी 'धरम संकट में'  हा सिनेमा आला होता, त्यात परेश रावलनी ( सध्या भाजपा खासदार ) धर्म या विषयाची यथेच्छ विडंबनात्मक टवाळकी केली होती पण त्याना व्यापक असा विरोध झाला नाही; त्या उलट त्याच्या काही महिने आधी आलेल्या 'पीके' या आमिरखानच्या सिनेमात 'धरम संकट में'च्या तुलनेने सॉफ्ट सीन असूनही प्रचंड विरोध झाला होता. अशा विरोधाभासी प्रकारामागे देखील वाढती प्रगल्भता (!) आहे.  अभिनेत्यांचे धर्म सुद्धा आपण आता चेक करू लागल्याचे हे सजग लक्षण आहे. बरे नुसते धर्म बघत नाही तर त्यांनी साकारलेले पात्र कोणत्या जाती-धर्माचे आहे ही बाब सुद्धा आता अधोरेखित होतेय.  'मोहल्ला अस्सी' या सिनेमात पांडित्याच्या, मौलवीच्या नावाखाली चालू असलेल्या पाखंडावर प्रहार होते, तर त्यालाही विरोध सहन करावा लागला. आपल्या लोकांच्या अशा अनेक गमजा सुरु असतात. त्यापैकीच एक म्हणजे हिंदूत्ववाद्यांना हिंदू धर्मातील सुधारक विचारांचे जन्माने हिंदू असलेले लोक अजिबात खपत नाहीत मात्र त्याच वेळेस त्यांना मुस्लीम धर्मातील सुधारणावादी विचारवंत जसे की सलमान रश्दी, तस्लिमा नसरीन, हमीद दलवाई यांचे फार अप्रूप असते. हीच बाब मुस्लीम कट्टरवाद्यांना लागू पडते. त्यांना त्यांच्याधर्मातील सुधारक हे पाखंडी वाटतात आणि हिंदू धर्मातले सुधारक विचारवंत जवळचे वाटतात ! याहीपुढे जाऊन लोक आता लिहिणाऱ्यांचेही जातधर्म गोत्र पाहू लागलेत. कलेच्या अन साहित्याच्या  मापदंडाचे नवे खंड हिरव्या- भगव्या लेखणीने शब्दांकित केले जातील की काय अशी शंका वाटते. यात ढवळाढवळ करणाऱ्यास हिंसेने दटावले जाते. ही आमची नवप्रगल्भता ठरते आहे. स्वातंत्र्य मिळवताना जे 'वंदे मातरम' गीत गात अनेकांनी आपले बलिदान दिले त्याला विरोध करण्यासाठीही धर्माचाच आसरा अजून घेतला जातो. तर त्याचा सहारा घेऊन काहीजण धर्मभेद करण्यासाठी उतावीळ होताना दिसतात. करदात्याकडून गोळा झालेले पैसे धार्मिक कारणासाठी मुक्त हस्ताने दिले  जातात तेंव्हा ‘आपल्या जाती धर्माचा विषय आहे’ या एकाच बाबीपोटी आम्ही सारासारबुद्धी अन विवेक केंव्हाच कमरेला गुंडाळून जेथे तेथे जातधर्माची 'प्राणप्रतिष्ठा' आम्ही करतो आहोत. धर्म, जात, उत्सव, उरूस, सण, विधी हे घरापुरते मर्यादित  न राहता ते आम्ही सार्वजनिक, सामुदायिक करून त्याचे आम्ही अक्राळविक्राळ इव्हेंटमध्ये रुपांतर केले आहे. विशेष म्हणजे यातील काही इव्हेंट सरकारी प्रायोजकत्वाने साजरे होऊ लागले आहेत. हे आपल्या प्रगल्भतेत  वाढ (!) झाल्याचे द्योतक नव्हे का ? ‘रस्त्यांवर मंडप मारणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे’ याची आम्हाला जाणीव होणे ही देखील एक प्रकारची प्रगल्भता आहे. “ज्याचा त्याचा धर्म आणि ज्याचे त्याचे धार्मिक सोहळे, विधी ज्याने त्याने आपल्या दमावर करावेत अन शासनाकडून एक छदाम देखील घेऊ नये, उत्सव साजरा करताना जनतेला त्रास होणार नाही आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेऊ ” अशी पश्चातबुद्धी आपल्याला कधीच होणार नाही का हा अनुत्तरीत सवाल आहे. आपआपल्या (सोयीनुसार ) दुखावणाऱ्या धार्मिक भावना या अतिसंवेदनशील झाल्या असल्या तरी आम्ही गय न करता त्याला पोषक असे उपद्व्याप चालू ठेवू असं अलीकडच्या काळात जाणवत आहे. पूर्वी आम्ही फक्त मतदानाच्या वेळेस उमेदवारांची धर्म-जात पाहायचो. आता आम्ही लेखकांची, खेळाडूंची, अभिनेत्यांची, शेजाऱ्यांची, ग्रुपमधल्या माणसांची, सोसायटीतल्या माणसांची, शास्त्रज्ञांचीच नव्हे तर राष्ट्रपती अन उपराष्ट्रपतींची जात-धर्म आता अगदी चिकित्सक पद्धतीने पाहू लागलो आहोत अन त्याबरहुकूम आम्ही त्यांच्याकडून आपल्या अपेक्षा व त्यांच्यावरील आरोपांची तीर कमान तयार ठेऊ लागलो आहोत. एकविसाव्या शतकात ही एव्हढी मोठी वैचारिक गगनभरारी नव्हे तर काय ?  आता आम्ही व्हॉटसअपमधून अजान ऐकतो अन फेसबुकवर आरती करतो ! तंत्रज्ञानाच्या अशा विधायक उपयोगासाठी जी प्रगल्भता लागते ती असल्याशिवाय हे आम्ही करू शकू का ? असे अनेक दाखले देवूनदेखील आपल्या मेंदूचे भेजाफ्राय होणार नाही कारण तो देखील आता मॉडीफाईड प्रगल्भ झाला आहे. खरे तर आता शाळांमध्येदेखील हिंदूंसाठी वेगळी अन मुसलमानांसाठी वेगळी प्रतिज्ञा असायला पाहिजे, जसे की ‘हिंदुस्थान माझा देश आहे आणि सारे हिंदू माझे बांधव असतील....’ वगैरे हिंदू मुलांसाठी आणि  'भारत माझा देश आहे, आणि सारे मुस्लीम माझे बांधव असतील....’ इत्यादी. ही प्रतिज्ञा मुसलमान मुलांसाठी असावी. 'तुमचा दाऊद तर आमचा गवळी' असे सांगून आम्ही गुन्हेगारांचे धर्म तपासून त्याना पावन करायची मोहीम आखली आहे ती अधिक जोमाने पुढे नेण्यास या प्रगल्भतेने हातभार लागेल.. जातधर्म या विषयावर जर मत मांडायचे झाले तर ‘सर्वप्रथम मी एक भारतीय आहे त्यानंतर जन्माने प्राप्त जो कोणता धर्म असेल तो असेल’ अशी धारणा असायला हवी. आपल्या वाट्यास आलेल्या धर्मातील ज्या संस्कारक्षम,सजग आणि सहृदयी गोष्टी आहेत त्या पटणे सहज सुलभ आहे आणि न पटणारया गोष्टीवर सडकून टीका करणे अपेक्षित आहे. सर्व जाती धर्माचे मित्र असणे आणि त्याचा आनंद आणि अभिमान असणे ही अधिकची बाब झाली. आपल्याला जन्मजात चिटकलेल्या जातधर्माच्या दोषवैगुण्यावर जर आपण  टिका-टिप्पणी करून त्यातील विषमतेवर बोट ठेवत असू तरच आपल्याला इतरांच्या जाती -धर्मा मधील कथित दोष - वैगुण्य यावर बोलण्याचा अधिकार आहे.  ज्या गोष्टी स्वीकारार्ह वाटतात त्याच स्वीकाराव्यात, ज्या पटत नाहीत त्या गोष्टी टाळाव्यात. पण आपले मत कोणावर लादू नये, आपले मत ऐकलेच पाहिजे आणि त्यानुसार इतरांचे मत असावे असा आग्रहही असू नये. पण त्यांचबरोबर आपले विचारही आपण मांडले पाहिजेत. सोबतच सर्वच जातीधर्मात काही तरी वैगुण्य असते, अधिकउणे असू शकते पण अमुक एकच जात वाईट नसते याचेही भान आपल्याला असले पाहिजे. व्यक्ती म्हणाल तर कोणताच वाईट नसतो ; त्याचे विचार वाईट असतात पण ते बदलताही येऊ शकतात.पण त्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन आणि मनापासून केलेले योग्य प्रयत्न गरजेचे आहेत. आपले ज्या व्यक्तीसोबत वा समूहासोबत पटत नाही, त्याच्या जातधर्मावर बोलण्यापूर्वी आत्मचिंतन आणि परस्पर तुलना करता येणे गरजेचे आहे. आपले विचार मांडताना त्यामागील मुद्दे हे तर्कसुसंगत, परखड, साधार  आणि स्पष्ट असले तरच मांडले जावेत पण त्याला जातीय वा धार्मिक विखार असू नये. कोणत्याही जाती वाईट नसतात पण आपल्या जातीचा वर्चस्ववाद लादू इच्छिणारे निश्चितच कावेबाज असतात. यांच तर्काने सर्वच जातीबद्दल बोलता येईल. त्या त्या जातीतले वैगुण्य असणारया बाबी आणि चांगले घटक याची माहिती असल्याशिवाय त्यावर भाष्य करणे अयोग्यच. जे वाईट आहे त्याला वाईटच म्हटले पाहिजे आणि जे योग्य आहे त्याला योग्यच म्हटले पाहिजे इतकी साधी भूमिका जरी आपण अंगिकारली तरी जातीधर्मविषयक आपल्या संकल्पना अधिक परिपक्व होतील. पुर्वग्रहदूषित दृष्टीकोन हा आपल्या जातधर्म विषयक भूमिकांचे विचके करून टाकतो, आणि अपुरी माहिती, अज्ञान, वृथा आवेश, सामाजिक समरसतेचा अभाव याने त्याला द्वेषमूलक खतपाणी मिळते. आपल्याला ज्याचा द्वेष, मत्सर, हेवा वाटतो अशा जाती-धर्मावर उलट खोलात जाऊन माहिती घेतली तर आपले मत आणि दृष्टीकोन बदलू शकतो त्यासाठी आपली भूमिका चिकित्सक व अभ्यासक असली पाहिजे. इस्लाममध्ये अमुक एक गोष्ट वाईट आहे असे जर मला म्हणावयाचे असेल तर मी आधी इस्लामचा अभ्यास केला असला पाहिजे आणि त्याहीआधी माझ्या धर्मातील ज्या बाबी वाईट आहेत त्याचा मी खुल्या मनाने निषेध केला पाहिजे. अमूक एक जातीचे वर्चस्व हवे असं मत मांडणारा माणूस धोकादायक असतो. जातपात विरहीत समाज हे अंतिम ध्येय असलेला समाज खऱ्या अर्थाने पुरोगामी आहे असे विचारवंतांनी म्हटले आहे. सर्व धर्मांचा, जातींचा आपण योग्य तो आदर करावा. जोडीला जरूर ती चिकित्सा करावी पण आपले मत त्यासाठी इतरांवर लादू नये. न पटणारया गोष्टीवर समान न्यायाने व कोणताही भेदभाव न करता मर्यादा राखून टिका करावी. स्वतःवर कोणाचीही मते लादून घ्यायची नसतील तर आपण ते आधी टाळले पाहिजे. उठसूठ प्रत्येक जातीनिष्टीत आणि धर्मनिष्ठीत बाबींशी प्रत्येकाने बोलले पाहिजे का याचाही विचार करता आला पाहिजे, अमक्याने एक मत नोंदवले आहे आणि त्याचा आपल्यावर प्रभाव आहे तर आपण कोणतीही शहानिशा न करता तसेच वा त्या अर्थाचे मत नोंदवत असू तर आपली विचारनिश्चितीची पद्धत सदोष आहे असे समजण्यास हरकत नाही. आपल्याला घटनेने दिलेले हे  धर्मस्वातंत्र्य आहे याचा व्यवस्थित वापर केला तरी सरकार आणि प्रशासनापुढील कितीतरी डोकेदुखी कमी होईल. पण असे होताना दिसत नाही कारण लोकांचे जातधर्म निहाय उग्र कळप आता विकट वेगाने बलाढ्य होताना दिसत आहेत. खरे तर यावर प्रत्येकाने आपलं मत बनवणे अपेक्षित आहे. आपले मत असे असावे की आपण एकांतात जो विचार करू तो आपल्याला खाजगीमध्ये आपल्या ज्या चारचौघा घनिष्ट मित्रांच्या कोंडाळ्यात मांडता यावा आणि तेच मत सार्वजनिक जीवनात तितक्याच सच्चेपणाने आणि छातीठोकपणाने सर्वांसमोर मांडता यायला पाहिजे. जर आपण असे आपण करत नसू तर आपला दृष्टीकोने न आपणच तपासला पाहिजे.आपण जर कोणाच्या मागे वाहवत जात असू तर त्यामागचा आपला हेतू आपल्यालाच तपासता आला पाहिजे तो हेतू प्रामाणिकता, सामाजिक ऐक्य, राष्ट्रहित, समानता, बंधुता, दया या कसोट्यांवर खरा उतरला पाहिजे. त्यानंतरच आपण त्या व्यक्ती वा समूहाच्या मागे जाणे हितकारक ! ही सर्व मतमतांतरे आहेत, प्रत्येकाला पटलीच पाहिजे असे नाही. परंतु आजच्या जातधर्माच्या द्वेषपूरक गढूळ वातावरणात या महत्वाच्या मुद्यावर आपले विचार स्पष्ट असावेत आणि ते निर्भीडपणे मांडता येणे गरजेचे आहे. कधी कधी असे वाटते की आपण जाती जातींचे कळप केलेत अन त्यात एकमेकांना वाटून टाकले आहे. कळप सगळीकडेच असतात, आपापल्या जातींचे काही गुप्त तर काही खुले असे हे समूह असतात. काही जातींच्या नावाने तर काही जातीपुरुषांच्या नावाने असतात. कळप कधी क्लोज्ड असतात तर कधी मुक्त असतात.  कळपात राहणारे कळपाबाहेर असतात तेंव्हा त्याना मुखवटे असतात, कळपात असले की त्याना कसे 'सेफ' वाटते. कळप असतात कधी जातीची महती सांगण्यासाठी, तर कधी आपली जात भारी हे ठसवण्यासाठी पण बहुतांश वेळा ते असतात इतरांची जात कशी नीच आहे हे सांगण्यासाठी. कळपात अहंकार मस्त जोपासले जातात. युगपुरुषांना देखील लोक येथे आपल्या दावणीला बांधतात, अदृश्य अशा अभेद्य भिंतीत त्यांच्या तसबिरी चिणून ठेवतात अन त्यांच्या कर्तुत्वाची थोरवी शब्दबंबाळ होऊन अहोरात्र गात राहतात. कळप मराठ्यांचा असतो, कळप ब्राम्हणांचा असतो, कळप धनगरांचा असतो, कळप माळ्यांचा असतो, कळप लिंगायतांचा असतो, कळप मांगांचा असतो कळप महारांचा असतो एव्हढेच काय कळप नवबौद्धांचाही असतो आजकाल जो तो आपापल्या जातींचे कळप करतो अन आपली टीर जातीचा चिखल लावून मोठी करतो. कळप साजरा करत असतो विकृत आनंद, कळपात बरयाचदा होत असते चिखलफेक मग ती साजूक पोळी खाऊन आलेल्या तृप्ततेतून आलेली असते किंवा न्यूनगंडाच्या चडफडाटातून वा आलेली असते गावकुसाबाहेर राहून आलेल्या शिसारीतून ! आजकाल तर जातीवाचक कायद्यांच्या कवचातून आलेली सेक्युअर्ड आक्रमकता देखील माणसांच्या अजस्त्र चिखलफेकीची प्रेरणा बनू पाहत्येय. जातीयतेच्या भिंती आम्ही मागच्या शतकात तोडल्या म्हणणारया शतमुर्खांच्या श्रीमुखात ठेवून देण्याची ताकद या कळपात असते. ‘मला तर सर्व जाती समान आहेत’ असे पालुपद म्हणणारे अनेक साळसूद अजूनही कोटींच्या संख्येने विविध कळपात आहेत. कोण कोणत्या कळपात आहे ? खरया की फेक नावाने आहे काही कळत नाही. आपल्या हिंस्त्र नजरा दांभिक पापण्यांच्या आड दडवून अनेक जण येथे गूढअगम्य संधीची अनामिक वाट बघत असतात. एकविसावे शतक जुने होत चाललेय तरी जातीयतेचा फडफडणारा वारू आम्ही कळपा कळपात मोठ्या प्रेमाने जतन करून वाढवलाय, येणारया काळाला आम्ही दाखवून देवू की आधुनिक सोशल मिडीयाची साधने वापरून एकविसाव्या शतकात जातीयता किती मन लावून जोपासली होती आम्ही. महापुरुषानो तुम्ही आम्हाला ओळखलेच नाही, आम्ही जातीयतेच्या शेणातले ते किडे आहोत की एकसंधतेच्या पक्वान्नात जे जगूच शकत नाहीत ! असो. जातीधर्माच्या कळपातले हे प्रतिबिंब वाईट असले तरी ते बदलता येईल पण त्यासाठीची इच्छाशक्ती आपल्याकडे हवी. आपण इतके निराश होऊनही चालणार नाही की 'सारेच दीप कसे मंदावले आता' असे म्हणून रडत बसण्यात अर्थ नाही, कुठेतरी फुरफुरणारा एखादा दिवा नाहीतर फडफडणारी एखादी पणती दिसली की तिच्या ज्योतीभोवती तळहाताची भिंत उभी केली पाहिजे आणि अशा ज्योतींमधली धग तेवत राहण्यासाठी तडफडणारया सहस्रावधी हातांचा एक अणूरेणू झालं पाहिजे. समीर गायकवाड
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Embed widget