IND vs PAK : उपांत्य फेरी किंवा अंतिम सामना, टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने? जाणून घ्या समीकरण
IND vs PAK T20 World Cup 2026: टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येण्याची शक्यता आहे. दोन्ही संघ उपांत्य फेरीतील लढतीत किंवा अंतिम सामन्यात आमने सामने येऊ शकतात.

India vs Pakistan T20 World Cup 2026 नवी दिल्ली : टी 20 वर्ल्ड कप 2026 मध्ये 21 फेब्रुवारीपासून सुपर 8 चे सामने सुरु होणार आहेत. भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असल्यानं त्यांच्यातील सामना 15 फेब्रुवारीला पार पडला होता. हा सामना भारतानं 61 धावांनी जिंकला होता. भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ अ गटातून सुपर 8 मध्ये दाखल झाले आहेत. सुपर 8 मध्ये दोन्ही संघ वेगवेगळ्या गटात आहेत. त्यामुळं दोन्ही संघांमध्ये सुपर 8 मध्ये सामना होणार नसला तरी उपांत्य फेरीत किंवा अंतिम सामन्यात दोन्ही संघ आमने सामने येऊ शकतात.
भारतानं साखळी स्पर्धेतील सामना एकतर्फी जिंकला होता. आता भारत आणि पाकिस्तान पुन्हा आयसीसीच्या इव्हेंटमध्येच आमने सामने येऊ शकतात. टी 20 वर्ल्ड कपमध्ये आमने सामने येण्याची शक्यता कशी आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. सुपर 8 मधून भारत आणि पाकिस्तान पुढे गेल्यास उपांत्य फेरीत आमने सामने येऊ शकतात.
सुपर 8 मध्ये भारतासमोर कोणाचं आव्हान?
टी 20 वर्ल्ड कपमधील सुपर 8 मधील लढती ठरल्या आहेत. 8 संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान वेगवेगळ्या गटात आहेत. ज्यामुळं भारत आणि पाकिस्तान सुपर 8 मध्ये आमने सामने येणार नाहीत. लीग स्टेजमध्ये भारत आणि पाकिस्तान अ गटात होते. सुपर 8 मध्ये भारत, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बॉब्वे एकाच गटात आहेत. तर दुसऱ्या गटात श्रीलंका,इंग्लंड, न्यूझीलंड आणि पाकिस्तान आहेत.
उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्याचं गणित?
उपांत्य फेरी : भारत आणि पाकिस्तान यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होऊ शकतो. भारत आणि पाकिस्तान त्यांच्या गटात पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानावर राहिले, म्हणजेच भारत X गटात पहिल्या स्थानी राहिला आणि पाकिस्तान Y गटात दुसऱ्या स्थानी राहिल्यास उपांत्य फेरीचा सामना होऊ शकतो. याशिवाय पाकिस्तान Y गटात पहिल्या स्थान आणि भारत X गटात दुसऱ्या स्थानी राहिल्यास उपांत्य फेरीची लढत दोन्ही संघात होऊ शकते.
अंतिम सामना : जर भारत आणि पाकिस्तान उपांत्य फेरीच्या लढतीत आमने सामने आले नाहीत तर अंतिम सामन्यात देखील आमने सामने येऊ शकतात. जर भारत X गटात पहिल्या स्थानी राहिला आणि पाकिस्तान Y गटात पहिल्या स्थानी राहिला तर या दोन्ही संघ उपांत्य फेरीत आमने सामने येणार नाहीत. मात्र, भारत आणि पाकिस्ताननं दुसऱ्या संघांना पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केल्यास भारत आणि पाकिस्तान अंतिम सामन्यात आमने सामने येऊ शकतात.
उपांत्य सामना आणि अंतिम सामन्याचं वेळापत्रक
उपांत्य फेरीतील पहिला सामना - 04 मार्च
उपांत्य फेरीतील दुसरा सामना - 05 मार्च (मुंबई, वानखेडे स्टेडियम)
अंतिम सामना- 08 मार्च
























