Khelo India Youth Games 2022 : महाराष्ट्राची कबड्डीत विजयी सलामी, आंध्र प्रदेशला चारली धूळ
Khelo India Youth Games 2022 : चौथ्या खेलो इंडिया स्पर्धेत पहिल्या दिवशी झालेल्या महाराष्ट्राचा मुलांच्या कबड्डी संघाने आंध्र प्रदेशला धूळ चारली.
Khelo India Youth Games 2022 : चौथ्या खेलो इंडिया स्पर्धेत पहिल्या दिवशी झालेल्या महाराष्ट्राचा मुलांच्या कबड्डी संघाने आंध्र प्रदेशला धूळ चारली. तब्बल १९ गुणांनी हरियाणाच्या भूमीत विजयी सलामी देत आपले कौशल्य दाखवले. महाराष्ट्राने तब्बल ४८ गुण घेतले तर आंध्र प्रदेशला २९ गुणांपर्यंतच मजल मारता आली. ताऊ देवीलाल स्पोर्टस कॉप्लेक्समध्ये हा सामना झाला. सुरूवातीला अटीतटीचा वाटणारा सामना महाराष्ट्राने एकतर्फी केला.
महाराष्ट्राने पहिल्याच चढाईत एक गुण घेतला. डु ओर डाय रेडमध्येही गुण मिळवला. सुरूवातीपासूनच महाराष्ट्राने आक्रमक खेळ केला. परंतु नंतर आध्र प्रदेशने आक्रमकता वाढवून सामन्यात पुनरागमन केले. चार विरूद्ध पाच गुणांची आघाडी घेतली. त्यांनी चारगुणांची कमाई करीत महाराष्ट्राला ऑल आऊट केले. त्यामुळे सामना बारा विरूद्ध सहा असा फिरला. परंतु नंतर महाराष्ट्राचे खेळाडू आक्रमक झाले. आंध्र प्रदेशला ऑलआऊट केले. त्यामुळे त्यांचे पंधराविरूद्ध सोळा गुण झाले. अठराव्या मिनिटाला सतरा आणि सतरा अशी बरोबरी झाली. परंतु पहिल्या हाफमध्ये महाराष्ट्रने तीन गुणांची आघाडी घेतली. त्यावेळी गुणफलकावर २० विरूद्ध १७ असे गुण होते. दुसऱ्या हाफ मध्ये महाराष्ट्र आणखीच आक्रमक झाला. त्यांनी चढाई आणि बचावातही उजवा खेळ केला. त्यामुळे आठ मिनिटे बाकी असताना जवळपास दुप्पट गुण मिळवले. धावफलक ४० विरूद्ध असा होता. शेवटी महाराष्ट्राने ४८ गुण मिळवत पहिलावहिला खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये विजय नोंदवला. आंध्र प्रदेशचे २९ गुण होते.
शिवम पठारे (अहमदनगर), पृथ्वीराज चव्हाण (कोल्हापूर) यांनी चढाईत नेत्रदीपक कामगिरी केली. त्यांच्या बळावरच महाराष्ट्राला गुण मिळवता आले. दादासाहेब पुजारी, रोहन तुपारे, साईप्रसाद पाटील, जयेश महाजन यांनी उत्कृष्ट पकडी केल्या. त्यामुळे संघाला भरभक्कम आघाडी घेता आली. सामन्यात आऊ आउट झाल्याने महाराष्ट्र सहा गुणांनी पिछाडीवर होता. परंतु नंतर आक्रमक खेळ करीत मुलांनी सफाईदार खेळ केला.
आंध्र प्रदेशचा खेळाडू बेशुद्ध
आंध्र प्रदेशने एका चढाईत तब्बल चार गुण मिळवले. परंतु महाराष्ट्राने लगेच एक सुपर टॅकल करीत गुणसंख्या ४५ पर्यंत नेली. त्यावेळी आंध्र प्रदेशचे २७ गुण होते. त्यावेळी झालेल्या धरपकडीत आंध्र प्रदेशचा चढाईपटू जखमी झाला. त्याला मैदानातून स्ट्रेचर आणून बाहेर न्यावे लागले. त्यामुळे सामन्यात तणाव निर्माण झाला होता. परंतु महाराष्ट्राने चढाई आणि बचावातही नेत्रदीपक खेळ कायम ठेवला.