Ind vs Pak Asia Cup Match: आजच्या सामन्यात पाकिस्तान टीम इंडियाला नको ते करायलाच लावणार? सूर्यकुमार यादव आता काय करणार?
Ind vs Pak Asia Cup 2025: आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना होणार आहे. या सामन्यात पाकिस्तानी खेळाडू भारतीय संघावर हस्तांदोलनासाठी दबाव आणणार?

Ind Vs Pak No Handshake Controversy: पहलगाम हल्ला आणि त्यानंतर भारतीय सैन्याने राबवलेले 'ऑपरेशन सिंदूर'मुळे सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. अशातच भारताची इच्छा नसतानाही आशिया चषक स्पर्धेत (Asia Cup 2025) टीम इंडियाला नाईलाजाने पाकिस्तानी संघाशी खेळावे लागत आहे. गेल्या रविवारी भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) यांच्यात पहिला सामना झाला होता. या सामन्यात भारतीय संघाने (Team India) पाकला धूळ चारली होती. तसचे कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्यासह अन्य भारतीय खेळाडुंनी पाकिस्तानी संघातील खेळाडुंशी हस्तांदोलन करणे टाळत एक संदेश दिला होता. यावरुन बराच वादंग झाला होता. भारताच्या या कृतीनंतर पाकिस्तानी संघाने प्रचंड आकांडतांडव केले होते. भारतीय संघाने कशाप्रकारे नियमांचा भंग केला आहे, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पाकिस्तानी संघाने केली होती. मात्र, भारतीय संघ आपल्या भूमिकेवर ठाम राहिला होता. परंतु, आता दुर्दैवाने आज पुन्हा एकदा भारतीय संघाला सुपर-4 मध्ये पाकिस्तानशी सामना खेळावा लागणार आहे. त्यामुळे आज पाकिस्तानी संघ एखादी चाल खेळू शकतो, अशी शक्यता आहे. आज भारतीय संघ मैदानात उतरल्यावर पाकिस्तानी खेळाडू जबरदस्ती हस्तांदोलन करण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाकिस्तानी खेळाडू हे हस्तांदोलनाची प्रथा पाळावी, यासाठी आग्रही होते. त्यामुळे पाकिस्तानी संघ आज टीम इंडियाला हस्तांदोलनासाठी भाग पाडणार का, हे बघावे लागेल. सर्वप्रथम कर्णधार सूर्यकुमार यादव हा नाणेफेकीसाठी मैदानात उतरेल. गेल्यावेळी सूर्याने पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याच्याशी हात मिळवला नव्हता. यावर सलमान आगा प्रचंड नाराज झाला होता. त्यामुळे आज पाकिस्तानी कर्णधार मैदानात काय करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Ind vs Pak: भारतीय संघावर कारवाई होऊ शकते का?
भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यासाठी नकार देऊन नव्या वादाला तोंड फोडले होते. टीम इंडियाची ही कृती खिलाडूवृत्तीला धरुन आणि क्रिकेटच्या नियमाला धरुन होती का, अशी चर्चा सुरु झाली होती. यामुळे भारतीय संघावर कारवाई होणार का, असा प्रश्न अनेकांना पडला होता. परंतु, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) नियम पुस्तिकेनुसार, सामना संपल्यानंतर दोन्ही संघातील खेळाडुंनी एकमेकांशी हस्तांदोलन केलेच पाहिजे, असा कोणताही नियम नाही. ही केवळ वर्षानुवर्षे चालत आलेली प्रथा आहे. त्यामुळे एखाद्या संघातील खेळाडुंनी दुसऱ्या संघाशी हस्तांदोलन न केल्यास तो नियमाचा भंग वगैरे ठरत नाही. परिणामी भारतीय संघावर दंडात्मक कारवाई होऊ शकत नाही.
आणखी वाचा




















