![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Raigad News : तळीये ग्रामस्थांच्या पुनर्वसनासाठी सदनिकांचे बांधकाम सुरू; एप्रिलपर्यंत 200 सदनिकांसाठी म्हाडा प्रयत्नशील
Raigad News : तळीये (Taliye) गावात 263 सदनिकांचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे. एप्रिल 2023 पर्यंत 200 स्वतंत्र घरांच्या उभारणीचे काम पूर्ण करण्यासाठी म्हाडा प्रयत्नशील आहे.
![Raigad News : तळीये ग्रामस्थांच्या पुनर्वसनासाठी सदनिकांचे बांधकाम सुरू; एप्रिलपर्यंत 200 सदनिकांसाठी म्हाडा प्रयत्नशील Maharashtra MHADA Taliye 200 flats till April for the rehabilitation of villagers in Taliye Raigad Raigad News : तळीये ग्रामस्थांच्या पुनर्वसनासाठी सदनिकांचे बांधकाम सुरू; एप्रिलपर्यंत 200 सदनिकांसाठी म्हाडा प्रयत्नशील](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/05/59a4fb2c89d0a8f928c3b624863a3ba21675565526161339_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Raigad News : म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळातर्फे (Maharashtra Housing And Area Development Authority) रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातील तळीये (Taliye) गावात 263 सदनिकांचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे. दरडग्रस्त ग्रामस्थांच्या पुनर्वसनासाठी हे बांधकाम करण्यात येत आहे. एप्रिल 2023 पर्यंत 200 स्वतंत्र घरांच्या उभारणीचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती कार्यकारी अभियंता धीरजकुमार जैन (Dhiraj Kumar Jain) यांनी दिली आहे.
पुनर्वसन प्रकल्पाच्या कामास जून 2022 पासून सुरुवात
जुलै 2021 मध्ये अतिपर्जन्यवृष्टी होऊन डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या तळीये गावावर दरड कोसळल्याची दुर्घटना घडली होती. ग्रामस्थांच्या पुनर्वसनाची जबाबदारी राज्य शासनानं महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाकडे (म्हाडा) सोपवली आहे. कोकण मंडळातर्फे या पुनर्वसन प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या दुर्घटनेमध्ये तळीये गाव आणि शेजारील पाड्यांचे मोठे नुकसान झाले असल्याने या पुनर्वसन प्रकल्पाच्या माध्यमातून तळीये गावातील 66 दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांसाठी आणि इतर 6 पाड्यांतील ग्रामस्थांसाठी म्हाडातर्फे 263 स्वतंत्र घरे बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तांत्रिकदृष्टया पुनर्वसन प्रकल्पाच्या कामास जून 2022 पासून सुरुवात करण्यात आली आहे. या प्रकल्पाला प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी नुकतीच भेट दिली. यावेळी जैन बोलत होते.
600 चौरस फूट चटई क्षेत्रफळ आकाराचे घर
दुर्घटनाग्रस्त भागाच्या जवळच जिल्हाधिकारी कार्यालयाने 17.64 हेक्टर जागा पुनर्वसन प्रकल्पकरीता 'म्हाडा'ला उपलब्ध करून दिली आहे. या जागेवर 263 पैकी 231 घरे उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. उर्वरित 32 घरांच्या बांधकामासाठी लवकरच शासनाकडून जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दुर्घटनेचे स्वरूप लक्षात घेता केंद्र शासनातर्फे या जागेचे भौगोलिक सर्वेक्षण करण्यात आले असून आयआयटी पवई या संस्थेने सदनिकांच्या बांधकामाचे डिझाईन प्रमाणित करून दिले आहे. प्रत्येकी तीन हजार चौरस फुटाच्या भूखंडावर 600 चौरस फूट चटई क्षेत्रफळ (Carpet Area) आकारमानाचे स्वतंत्र घर अत्याधुनिक प्री फॅब स्टील स्ट्रक्चर, काँक्रीट सँडविच वॉल पॅनल सिस्टीम वापरून 2 बीएचके स्वरूपाचे स्वतंत्र घर बांधण्यात येत आहे.
अत्याधुनिक सोयींनी युक्त घरे
पुनर्वसित घरे भूकंप रोधक पद्धतीने उभारण्यात येणार आहेत. अत्याधुनिक सोयींनी युक्त घरांमध्ये प्रत्येकी पाण्याची टाकी आणि सौर ऊर्जेचे देखील नियोजन करण्यात आले आहे. सेप्टिक टॅंक देखील बांधण्यात येत आहे. घरांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर प्रकल्प जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. या प्रकल्प उभारणीकरिता इतर यंत्रणा देखील आपला खारीचा वाटा उचलणार असून जिल्हा परिषदेतर्फे प्रकल्पाकरिता नागरी सोयी सुविधा जसे पाणी पुरवठा, सांडपाणी, गटारे, रस्ते, पथदिवे इत्यादींचे नियोजन करण्यात येणार आहे. महावितरणतर्फे वीजपुरवठा केला जाणार असून वन विभागातर्फे वृक्षारोपण रोपण केले जाणार असल्याची माहिती त्यांनी याप्रसंगी दिली.
77 कोटी रुपये खर्चाला प्रशासकीय मान्यता
प्रकल्पाचे ठिकाण भौगोलिक दृष्ट्या समुद्रसपाटीपासून अतिउंचावर असल्याने पावसाळ्यामध्ये प्रकल्पाचे काम काही काळ करणे शक्य नव्हते. इतर वेळेस देखील बांधकाम साहित्य वर नेण्यास अनेक अडचणी येत असल्याने प्रकल्पाचे काम वेग घेऊ शकले नाही. परंतु, ग्रामस्थांच्या अडचणी लक्षात घेता ग्रामस्थांचे पुनर्वसन लवकरात लवकर करण्यास म्हाडा कटिबद्ध असल्याचे धीरजकुमार जैन यांनी सांगितले. एप्रिल महिन्यापर्यंत 200 घरांचे बांधकाम पूर्ण होऊ शकेल, अशी शक्यता असल्याचे जैन म्हणाले. 'सामाजिक बांधिलकी' या तत्वावर तळीये पुनर्वसन प्रकल्पाचे काम म्हाडाच्या निधीतून केले जात असून सुमारे 77 कोटी रुपये खर्चाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. सदर प्रकल्प राबवताना म्हाडातर्फे गावपण जपण्याचा प्रयत्न करण्यात आला असून ग्रामस्थांना आधुनिक सोयीसुविधांनी युक्त घर देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे जैन यांनी सांगितले.
तळीये पुनर्वसन प्रकल्पाची वैशिष्ट्ये
- 17.64 हेक्टर जमिनीवर प्रकल्प
- 263 स्वतंत्र घरांचे बांधकामाचे नियोजन, 200 घरांचे बांधकाम प्रगतीपथावर
- नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यास अनुकूल घरे
- भूकंप रोधक घरांची निर्मिती
- तापमानाचे संतुलन राखण्यासाठी एफ पॅनलचा घरांच्या छतासाठी वापर
- प्रत्येकी 3000 चौरस फुटांच्या भूखंडावर 600 चौरस फूट चटई क्षेत्रफळ आकारमानाचे स्वतंत्र घर
- दोन बेडरूम, एक हॉल, किचन सह शौचालय व न्हानीघराची सोय
- घराच्या चारही बाजूला 4 फुटांची पडवी
महत्त्वाच्या इतर बातम्या :
पुनर्विकासानंतर तळीये गाव राज्यातील आदर्श गाव; 13 हेक्टर वरती तब्बल 261 घरांचा पुनर्विकास होणार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)