Pune crime news: कोथरुड पोलिसांकडून छळ, रात्री साडेतीन वाजेपर्यंत पोलीस आयुक्तालयात ठिय्या, पण पुणे पोलीस मुलींना म्हणाले....
Pune Kothrud Dalit girls torture: पुण्यातील तीन दलित तरुणींचा कोथरुड पोलिसांकडून छळ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी जातीवाचक शेरेबाजी केल्याचा मुलींचा आरोप

Pune Kothrud Dalit girls torture: पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात तीन दलित मुलींचा शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला होता. या घटनेनंतर सध्या पुण्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी रविवारी रात्री साडेतीन वाजेपर्यंत सुजात आंबेडकर, अंजली आंबेडकर, रोहित पवार आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते पुणे पोलीस आयुक्तालयात ठाण मांडून होते. पोलिसांनी याप्रकरणात गुन्हा दाखल करावा, यासाठी या सगळ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. परंतु, पुणे पोलिसांनी रात्री साडेतीन वाजता या मुलींना अवघ्या चार ओळींचे पत्र देत गुन्हा दाखल करण्यास असमर्थता दर्शवली.
मुलींनी ज्याबाबत तक्रार केली आहे, ती घटना एका खोलीत घडली आहे. सार्वजनिक ठिकाणी घडलेली नाही. त्यामुळे संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात कोणतेही पुरावे नाहीत. मुलींनी जी अॅट्रोसिटीची तक्रार दाखल केली आहे. त्यामध्ये कोणतेही तथ्य आढललेले नाही. त्यामुळे याप्रकरणात गुन्हा दाखल करता येणार नाही, असे पोलिसांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे. सुरुवातीला पोलिसांनी रात्री 11 वाजेपर्यंत तुमच्या तक्रारीबाबत काय घडते, ते कळवू, असे मुलींना सांगण्यात आले. मात्र, त्यानंतरही या मुली, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते पुणे पोलीस आयुक्तालयात ठाण मांडून बसले होते. अखेर रात्री साडेतीन वाजता पोलिसांनी आम्ही गुन्हा दाखल करु शकत नाही, असे सांगत हे पत्र मुलींना दिले. त्यामुळे मुली संतापल्या आणि त्यांनी हे पत्र फाडून टाकले. या सगळ्यानंतर पोलिसांवर गुन्हा दाखल न करण्यासाठी दबाव असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे आज दिवसभरात काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Pune Kothrud Police Crime: सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांना विनवणी केली पण पोलिसांनी शेवटपर्यंत ऐकलंच नाही
याप्रकरणात मुलींना न्याय देण्यासाठी गुन्हा दाखल करुन घ्यावा, यासाठी राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते रविवारी रात्री उशीरापर्यंत पुणे पोलीस आयुक्तालयात ठाण मांडून बसले होते. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या आणि वकील परिक्रमा खोत यांनी पोलिसांसमोर मुलींची बाजू मांडली. त्यांनी म्हटले की, ' मुली वेड्या नाहीत, त्या खोटं बोलत नाहीत. कोणतीही मुलगी अशाप्रकरणात खोटं बोलणार नाही', असे परिक्रमा खोत यांनी पोलिसांना सांगितले. मात्र, पोलिसांनी शेवटपर्यंत याची दखल न घेता याप्रकरणात गुन्हा नोंदवून घेण्यास नकार दिला.
आणखी वाचा
कोथरुडमधील प्रकरण तापलं, 'त्या' 3 तरुणींशी रुपाली चाकणकरांची चर्चा; नेमकं काय घडलं?























