Video: दुर्दैवाने औरंग्याच्या कबरीचं संरक्षण आम्हाला करावं लागतय, पण...; CM देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
छत्रपती शिवरायांनी देखील 18 पगड जातीच्या लोकांना एकत्रित केले, शेतकरी, बलुतेदार, यांना एकत्र केले, त्यांच्यात पौरुषत्व निर्माण केले

ठाणे : क्रूरकर्मा मुघल सम्राट औरंगजेबची (Aurangzeb) कबर कायमची नेस्तनाबूत करावी, ती महाराष्ट्रातून कायमस्वरूपी हटवावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन केले जात आहे. मुंबईसह राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आज बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून औरंगजेबाची कबर हटविण्याची मागणी केली जात आहे. संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवली नाही तर विश्व हिंदू परिषद कारसेवा करत स्वतः कबर हटवेल, असा इशाही सरकारला देण्यात आला आहे. त्यामुळे, शासनाकडून सध्या औरंगजेबाच्या कबरीला अधिकच संरक्षण देण्यात आलंय. याप्रकणावरुन राज्यात गदारोळ सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भिवंडीतील मराडे पाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते झाले. त्यावेळी, येथील कार्यक्रमातून त्यांनी औरंगजेबाच्या कबरीला दुर्दैवाने संरक्षण द्यावं लागत असल्याची खंत बोलून दाखवली. मात्र, औरंग्याचं महिमामंडन होऊ देणार नाही, असं वचनही त्यांनी दिलं.
छत्रपती शिवरायांनी देखील 18 पगड जातीच्या लोकांना एकत्रित केले, शेतकरी, बलुतेदार, यांना एकत्र केले, त्यांच्यात पौरुषत्व निर्माण केले. आपल्याला देव देश धर्मकारिता लढायचे आहेत, यासाठी तयार केले, हे जे बीजारोपण त्यांनी केले त्यामुळेच नंतर संभाजी महाराज राजाराम महाराज, ताराराणी यांनी स्वराज्यासाठी योगदान दिले. शिवरायांनंतर मराठ्यांनी औरंगजेबाला इथेच गाडला, मुघलांचा निःपात केला, दिल्लीवर भगवा फडकावला. त्यामुळेच, एकोप्याने राहणारा महाराष्ट्र महाराजांना अपेक्षित आहे, जातींमध्ये विभागलेला महाराष्ट्र त्यांना अपेक्षित नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.
संगमेश्वर इथेही संभाजी महाराजांचे स्मारक
शिवरायांचे 12 किल्ले आहेत त्यांना जागतिक वारसा मिळावा यासाठी आपण प्रयत्न करत आहोत, मोदींनी त्यासाठी प्रयत्न केले आहेत, त्याची प्रोसेस सध्या सुरू आहे, लवकरच हा दर्जा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला. तसेच, संगमेश्वर इथे जिथे छत्रपती संभाजी महाराजांना पकडले तिथे देखील आपलं स्मारक करत आहेत. तसेच, तुळापूर इथे देखील मोठे स्मारक आपण करत आहोत. उत्तर प्रदेश सरकारला विनंती केली आहे, आग्र्याला स्मारक व्हावे म्हणून निधी दिला आहे, पानिपत इथे देखील एक स्मारक व्हावे म्हणून प्रयत्न करत आहोत, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण देणे क्रमप्राप्त
या ठिकाणाला तत्काळ तिर्थस्थळाचा दर्जा देण्यात येतोय. जे जे गरजेचे आहे त्याची सोय करू, पीडब्लूडी विभागाला सांगून इथे येणारे सर्व रस्ते आपण बनवू, भिवंडी वाडा रस्त्याचे काम पूर्ण करू, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच इथे महिमामंडन होईल तर फक्त शिवरायांचे होईल, औरंगजेबाच्या कबरीचे होणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. औरंगजेबाच्या कबरीला एएसआयने 50 वर्षापूर्वी संरक्षण दिले आहे, त्यामुळे महाराष्ट्र सरकारला देखील तिथे संरक्षण देणे क्रमप्राप्त आहे. मात्र, या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचे महिमा मंडन कधीच होणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. एक वचन तुम्हाला देतो, काहीही झालं तरी या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचे महिमामंडन होऊ देणार नाही, उदात्तीकरण होऊ देणार नाही, तसा कोणी प्रयत्न केला तर तो प्रयत्न चिरडून टाकू, हे वचन छत्रपती शिवरायांच्या मंदिरासमोर देतो, असे मुख्यमंत्र्यांनी भिवंडीतील कार्यक्रमातून ठणकावून सांगितले.
हेही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

