Sanjay Raut On Eknath Shinde: शिंदे गटाच्या 20 ते 25 आमदारांवर फडणवीसांचे नियंत्रण, ते अमित शाह...; संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ
Sanjay Raut On Eknath Shinde: संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना विविध गौप्यस्फोट केले.

Sanjay Raut On Eknath Shinde: महाराष्ट्रातील सरकार बहुमतातील असलं तरी त्यांच्यात एकवाक्यता नाही. एकमेकांविरोधात कुरघोड्या सुरु आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची कुरघोड्या करण्याची ताकद भाजपने संपवली आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाचा सरपटणारा प्राणी झाला आहे, असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना आज (2 फेब्रुवारी) संजय राऊत यांनी विविध गौप्यस्फोट केले.
विधानसभा निवडणुकीनंतर मीच मुख्यमंत्री राहीन असं वचन देण्यात आलं होतं, असं एकनाथ शिंदे खासगीत सांगतात. हे एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे, त्यांना विचारा, असंही संजय राऊत म्हणाले. निवडणुकीनंतर त्यांना खड्यासारखं बाजूला केलं. काही मंत्रिपद आणि महत्वाची खाती दिली, पण एकनाथ शिंदेंचा चेहरा पाहिल्यावर तुम्हाला कळेल, ते अजून धक्क्यात आहेत. 50-55 जागा कशा मिळाल्या हा पहिला धक्का आणि दुसरा म्हणजे भाजपने शब्द पाळला नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे कोलमडले आहेत. त्यांची पूर्ण कोंडी झालीय, असा दावाही संजय राऊतांनी यावेळी केला.
किमान 20 ते 25 आमदारांच्या गटावर देवेंद्र फडणवीसांचे नियंत्रण-
तसेच त्यांची लोक समोर येऊन काहीपण सांगतील पण सरकारमध्ये मंत्रिपद असणं म्हणजे मानप्रतिष्ठा असते असं नाही,अशी टीका संजय राऊतांनी केली. त्यांच्या (शिंदे गटाच्या) आमदारांमध्ये चलबिचल आहे. त्यांच्या पक्षाच्या एका गटावर फडणवीसांचे नियंत्रण आहे. किमान 20 ते 25 आमदारांच्या गटावर देवेंद्र फडणवीसांचे नियंत्रण आहे. ते आमदार देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांच्या सांगण्यावर सुरतला गेले होते, एकनाथ शिंदेंसाठी नाही. उरलेले लोक चलबिचल आहेत. आपल्याला नेतृत्व नाही, आपण पुन्हा मागं फिरायचं का? असा विचार सुरु आहे, असा खळबळजनक दावाही संजय राऊतांनी केला.
केंद्र सरकारच्या बजेटवरही संजय राऊतांचा निशाणा-
केंद्र सरकारच्या बजेटवरही संजय राऊत यांनी टीका केली आहे. कागदावरील बजेटवरुन लोकांना काय मिळणार हे बघण्यासाठी थोडा वेळ द्यायला हवा. बिहारच्या तुलनेत महाराष्ट्राला काय मिळालं?, नरेंद्र मोदींचे प्रत्येक बजेट निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केलेल्या असतात. भविष्यात बिहारच्या निवडणुका तिथे वर्षाव, जिथे भाजपचे सरकार नाही. त्या राज्यांच्या तोंडाला पान पुसतात, असा निशाणा संजय राऊतांनी साधला. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बजेट समजलं नाही. आकडे आणि घोषणांवरुन जाऊन चालत नाही. ते जाणून घेण्यासाठी किमान 72 तास लागतात, असंही राऊत म्हणाले.
























