Cabinet Meeting : कॅबिनेट बैठकीत विखे पाटलांचे कौतुक; एका दिवसाचे मुख्यमंत्री, काय तो रुबाब, काय तो थाट..., सगळेच हसायला लागले, नेमकं काय घडलं?
Cabinet Meeting : सरकारने ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राजमंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हशा पिकल्याचं पहायला मिळालं.

Radhakrishna Vikhepatil Maratha Reservation: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानात सुरु असलेल्या आंदोलनाचा अखेर मंगळवारी शेवट झाला. राज्य सरकारने मराठा आंदोलकांच्या पाच प्रमुख मागण्या मान्य केल्यानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा उपसमितीचे अध्यक्ष आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या हाताने सरबत पिऊन उपोषण मागे घेतले. तत्पूर्वी मनोज जरांगे आणि राज्य सरकारच्या शिष्टमंडळात बरीच चर्चा झाली. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांना प्रत्येक मुद्दा समजावून सांगत उपोषण सोडण्यासाठी मनवले. त्यामुळे राधाकृष्ण विखे-पाटील हे महायुती सरकारचे नवे संकटमोचक म्हणून उदयाला आले आहेत. त्यादिवसानंतर आता विखे पाटील यांच्या नावाची चांगलीच चर्चा होऊ लागली आहे. दरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळे सरकारला आता ओबीसी समाजाकडून रोष व्यक्त होऊ लागला आहे. त्यानंतर आता सरकारने ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राजमंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हशा पिकल्याचं पहायला मिळालं.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एकच हशा पिकला
जलसंपदामंत्री विखे पाटील यांचा कालचा रुबाब देखणा होता, अशी चर्चा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झाली. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा कालचा रुबाब देखणा होता, अशी मजेशीर चर्चा राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीवेळी झाली. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतचा त्यांचा वावर तर एखाद्या मुख्यमंत्र्यासारखा होता.. अहो ते काल एक दिवसाचे मुख्यमंत्रीच होते, असं म्हणताच राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत एकच हशा पिकल्याचं पहायला मिळालं. बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये रंगलेल्या या संवादाने मंत्रिमंडळात एकच हशा पिकल्याचं पहायला मिळालं. याबाबतचे वृत्त न्यूज18 मराठी या वृत्तसंस्थेने दिले आहे.
भुजबळांची नाराजी, बैठकीला फिरवली पाठ
कॅबिनेट बैठकीला ओबीसी नेते आणि अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ नाराज असल्याचं पहायला मिळालं. कॅबिनेट बैठकीपुर्वी राष्ट्रवादीची स्वतंत्र बैठक झाली होती. त्या बैठकीत छगन भुजबळ उपस्थित होते. मात्र, कॅबिनेट बैठकीपूर्वी भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली त्यानंतर त्यांनी बैठकीवर बहिष्कार घातला. कोणत्या जातीचा कोणत्या प्रवर्गात समावेश करायचा हे सरकारचं काम नाही, असं म्हणत भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर संपूर्ण जबाबदारी
गेल्या आंदोलनावेळी मनोज जरांगे मुंबईच्या वेशीवर आले होते तेव्हा परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचलली होती. मात्र, यावेळी हजारो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाल्यावर शिंदे साताऱ्यातील गावी गेले आणि त्यांनी आंदोलनाकडे फिरकलेसुद्धा नाही. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेहमीप्रमाणे वादापासून स्वतःला दूर ठेवले. त्यामुळे आंदोलकांचा रोष हा थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केंद्रित झाला. पण यावेळी फडणवीस यांनी पडद्यामागे रणनीती आखत, अनुभवी नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर संपूर्ण जबाबदारी सोपवून परिस्थिती शांततेत हाताळली. मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल होण्याआधीच मराठा आरक्षणासाठी स्वतंत्र उपसमिती स्थापन करण्यात आली होती आणि तिचे अध्यक्षपद विखे-पाटील यांना देण्यात आले होते.
मुंबईत आंदोलकांची नाकेबंदी झाल्याने वातावरण तापले होते. जरांगे पाटील यांनी सरकारवर आणि फडणवीसांवर टीका केली, तरी विखे-पाटील यांनी संयमाने परिस्थिती हाताळली. ते सतत मनोज जरांगे यांच्याशी वाटाघाटी करत राहिले आणि मराठा आरक्षणाच्या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी नव्या मसुद्याची आखणी केली. आंदोलनावर भाष्य करणाऱ्या लक्ष्मण हाके यांना थेट खडसावणे हा अपवाद सोडला, तर विखे-पाटील यांनी संपूर्ण काळात शांततेने काम केले. शेवटी, ते मंत्रिमंडळासह आझाद मैदानात पोहोचले आणि जरांगे यांच्या मागण्या मान्य करत आंदोलन संपवण्यात निर्णायक भूमिका बजावली.
विखे-पाटलांकडून फडणवीसांना श्रेय
राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आझाद मैदानात बोलताना अनेकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आम्ही मराठा समाजाला अपेक्षित आरक्षण देऊ शकलो, असा उल्लेख केला. देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्यामुळेच आम्हाला हे करणे शक्य झाले. त्यांच्यामुळेच मराठा समाजाला हे आरक्षण मिळाले, असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आवर्जून सांगितले. या माध्यमातून त्यांनी फडणवीसांविषयी मराठा समाजात असलेली कटुता कमी करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यामुळे राधाकृष्ण विखे-पाटील हे मराठा समाजासाठी एकप्रकारे नवे हिरो झाले आहेत.























