Maratha Reservation: राधाकृष्ण विखे पाटील ठरले महायुती सरकारचे नवे संकटमोचक, मनोज जरांगेंशी यशस्वी चर्चा अन् मराठा आंदोलनावर तोडगा काढला
Maratha Protest in Mumbai: मनोज जरांगे पाटील यांनी पाचव्या दिवशी आपले उपोषण मागे घेतले. यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.

Radhakrishna Vikhepatil Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानात सुरु असलेल्या आंदोलनाचा अखेर मंगळवारी शेवट झाला. राज्य सरकारने मराठा आंदोलकांच्या पाच प्रमुख मागण्या मान्य केल्यानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा उपसमितीचे अध्यक्ष आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या हाताने सरबत पिऊन उपोषण सोडले. तत्पूर्वी मनोज जरांगे आणि राज्य सरकारच्या शिष्टमंडळात बरीच चर्चा झाली. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांना प्रत्येक मुद्दा समजावून सांगत उपोषण सोडण्यास राजी केले. त्यामुळे राधाकृष्ण विखे-पाटील हे महायुती सरकारचे नवे संकटमोचक म्हणून उदयाला आले आहेत.
गेल्यावेळी मनोज जरांगे मुंबईच्या वेशीवर आले होते तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व परिस्थिती हाताळली होती. मात्र, यावेळी हजारो मराठा आंदोलक मुंबईत आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील त्यांच्या गावी गेले होते. ते एकदाही मराठा आंदोलनाकडे फिरकले नव्हते. तर अजित पवार यांनी नेहमीप्रमाणे वादापासून दूर राहण्याचा आपला स्वभाव कायम ठेवला. त्यामुळे मराठा आंदोलकांचा सर्व रोष हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर होता. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासारख्या अनुभवी नेत्याची निवड करुन पडद्यामागून मराठा आंदोलन अत्यंत शांतपणे हाताळले. मनोज जरांगे पाटील मुंबईत येण्याच्या आधी फडणवीस यांच्याकडून मराठा आरक्षण उपसमितीची स्थापना करण्यात आली. या समितीचे अध्यक्षपद राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे देण्यात आले.
मराठा आंदोलक मुंबईत आल्यानंतर वातावरण प्रचंड तापले होते. मराठा आंदोलकांनी दक्षिण मुंबईची नाकेबंदी करुन टाकली होती. मनोज जरांगे पाटील यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारवर टीकेची तोफ डागली जात होती. मात्र, या सगळ्या परिस्थितीत मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी असलेल्या राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कमालीचा संयम दाखवला. ते आंदोलनाच्या काळात शांतपणे मनोज जरांगे यांच्याशी वाटाघाटी करत होते. मराठा आंदोलनावर टीका करणाऱ्या लक्ष्मण हाके यांनाही त्यांनी खडसावले. मात्र, ही एक गोष्ट वगळता राधाकृष्ण विखे पाटील यांनी अक्षरश: डोक्यावर बर्फ ठेऊन काम केले. सुरुवातीला शिंदे समितीला जरांगेंशी चर्चा करण्यासाठी पाठवण्यात आले. त्यांनी मनोज जरांगेंच्या मागण्या जाणून घेतल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून मराठा आंदोलकांना मान्य होईल, असा नवा मसुदा तयार करण्यात आला. काल विखे-पाटील अन्य मंत्र्यांसह आझाद मैदानात मनोज जरांगेंना भेटायला आले तेव्हाही त्यांनीही चाणाक्षपणे जरांगे पाटलांच्या सर्व समस्यांचे निराकारण केले.
Devendra Fadnavis: विखे-पाटलांकडून फडणवीसांना श्रेय
राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आझाद मैदानात बोलताना अनेकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आम्ही मराठा समाजाला अपेक्षित आरक्षण देऊ शकलो, असा उल्लेख केला. देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्यामुळेच आम्हाला हे करणे शक्य झाले. त्यांच्यामुळेच मराठा समाजाला हे आरक्षण मिळाले, असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आवर्जून सांगितले. या माध्यमातून त्यांनी फडणवीसांविषयी मराठा समाजात असलेली कटुता कमी करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यामुळे राधाकृष्ण विखे-पाटील हे मराठा समाजासाठी एकप्रकारे नवे हिरो झाले आहेत.
आणखी वाचा
मराठा आंदोलन संपलं, पण भाकऱ्या अन् पाण्याच्या बाटल्यांची प्रचंड रास उरली, आंदोलकांनी काय केलं?
जीआरचा टाचणी एवढाही फायदा नाही, नवीन काहीच नाही; विनोद पाटील यांनी सगळं सांगितलं






















