एक्स्प्लोर
गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

नाशिक: नाशिक शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरीत व्हावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. काल रात्रीपासून शहरात जोरदार पाऊस सुरू आहे. सकाळपासून गोदावरीच्या पातळीत झपाट्याने वाढ होण्यास सुरूवात झाली. खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेच्या अग्निशमन दलाला नदीकिनाऱ्याच्या भागात तैनात करण्यात आले आहे. जिल्ह्यातील इतर भागातील नद्यांना पूर येण्याची शक्यता लक्षात घेता, तालुका स्तरावरील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. सर्व नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवण्यात आले आहेत. जिल्ह्यात उद्या दुपारपर्यंत पावसाचा जोर राहण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. दुपारनंतर पावसाच्या हलक्या सरी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी नदी किनारी गर्दी करू नये , असे आवाहनदेखील प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, संततधार पावासामुळे नाशिकमधील सकाळी मोडकेश्वर मंदिराजवळील एका घराची भिंत कोसळली. अग्निशमन दलाने मलवा बाजूला केला असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दोन व्यक्ति किरकोळ जखमी झाल्या आहेत. तर श्रद्धा लॉन्स अमरधाम रोड जवळील झोपडपट्टीत अडकलेल्या 10 नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. जिल्ह्यात सर्वत्र परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
Before You Go
Abhijeet Dipke Cockroach Janta Party PC : आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत : अभिजीत दीपके





















