Mumbai Metro Aqua Line: मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासासाठी दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मेट्रो-3 म्हणजेच ‘ॲक्वा लाइन’ दसऱ्याच्या मुहूर्तावर संपूर्णपणे प्रवाशांसाठी आता प्रवासी सेवेसाठी खुला होण्याच्या मार्गावर आहे. . रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी नुकतीच वरळी-कफ परेडदरम्यानची अंतिम पाहणी पूर्ण केली असून, त्यानंतर या प्रकल्पाच्या पूर्ण शुभारंभाला हिरवा कंदील मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.मुंबई मेट्रो-३ चा वरळी नाका ते कफ परेड अंतिम टप्पा लवकरच सुरू होत आहे. आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आरे ते कफ परेड हा संपूर्ण मार्ग प्रवाशांसाठी खुला होणार असून, आता प्रवासाचा वेळ फक्त 60 मिनिटांवर येणार आहे.
मुंबईची पहिली भूमिगत मेट्रो
कुलाबा ते आरे कॉलनी असा तब्बल 33.5 किलोमीटर लांबीचा हा मार्ग हा मुंबईतील पहिला अख्खा भूमिगत मेट्रो कॉरिडॉर आहे. यात 27 स्थानकं असून त्यापैकी 26 पूर्णपणे अंडरग्राऊंड आहेत. यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रचंड वाहतूक कोंडीला पर्याय मिळणार आहे.
या मेट्रो मार्गाचं काम दोन टप्प्यांत पूर्ण करण्यात आलं. आरे–बीकेसी हा पहिला टप्पा ऑक्टोबर 2024 मध्ये प्रवाशांसाठी खुला झाला. तर बीकेसी-वरळी हा दुसरा टप्पा मे 2025 मध्ये कार्यान्वित करण्यात आला. मात्र कफ परेडपर्यंतची शेवटची जोडणी अद्याप सुरू नव्हती. आता दसऱ्याच्या दिवशी हा उर्वरित भागही उघडण्यात येणार असल्याने अख्ख्या कॉरिडॉरवर प्रवास करणे शक्य होणार आहे.
प्रवाशांना होणारे फायदे
सध्या आरे ते वरळी हा सुमारे 22 किलोमीटरचा मार्ग कार्यरत आहे. उर्वरित जवळपास 11 किलोमीटरचा टप्पा सुरू झाल्यानंतर कुलाबा, चर्चगेट, सीएसएमटी, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, दादर या महत्वाच्या ठिकाणी थेट कनेक्टिव्हिटी मिळेल. एवढंच नाही तर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळांनाही ही मेट्रो जोडली गेल्याने प्रवास सोपा होणार आहे. दैनंदिन कामकाजासाठी शहरात प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांना ही सेवा मोठा दिलासा ठरणार आहे.
तब्बल 37 हजार कोटींचा प्रकल्प
मेट्रो-3 प्रकल्पासाठी सुमारे 37 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हा मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेतील सर्वात महत्वाचा आणि खर्चीक प्रकल्प मानला जातो. समुद्रकिनारी वसलेल्या या महानगरात अंडरग्राऊंड मेट्रो बांधण्याचं आव्हान मोठं होतं. मात्र तांत्रिक अडचणींवर मात करून प्रकल्प आता पूर्णत्वास पोहोचला आहे. ऑगस्ट 2025 पर्यंत हा मार्ग सुरू होईल अशी आधीची घोषणा होती. मात्र आता काम वेळेआधी पूर्ण करून दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर संपूर्ण ॲक्वा लाइन मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत आहे. त्यामुळे या सणासुदीच्या काळात प्रवाशांना एक नवी आणि जलद वाहतुकीची सोय उपलब्ध होणार आहे.