एक्स्प्लोर
विकासकांकडून जीवाला धोका, म्हाडा अध्यक्ष उदय सामंतांची तक्रार
विकासकांच्या विरोधात निर्णय घेतल्यामुळे आपल्याला अज्ञातांकडून धमक्या आल्या आहेत. त्यामुळे माझ्या जीवाचं बरंवाईट झाल्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही सामंत यांनी दिला.

मुंबई : म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं पत्र मुंबई पोलिसांना दिलं आहे. विकासक आणि समाजकंटकांकडून धमक्या आल्याची तक्रार सामंत यांनी पोलिसांकडे दिली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून उदय सामंत हे म्हाडाचं अध्यक्षपद सांभाळत आहेत. विकासकांच्या विरोधात निर्णय घेतल्यामुळे आपल्याला अज्ञातांकडून धमक्या आल्या आहेत. त्यामुळे माझ्या जीवाचं बरंवाईट झाल्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही सामंत यांनी दिला. 'जनहितार्थ निर्णय घेण्यासाठी बृहन्मुंबईतील वर्षानुवर्ष रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांना भेट देत बैठका घेऊन जनतेचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावत आहे. ज्या विकासकांनी सामान्यांना फसवलं, त्यांच्याविरोधात कारवाईचा निर्णय घेतला. या निर्णयांमुळे जनतेच्या मनात म्हाडाची प्रतिमा सुधारत आहे.' असं सामंतांनी पत्रात म्हटलं आहे. म्हाडाभोवती असलेल्या दलालांचा विळखा सोडवण्याचा निर्णय घेतल्याने अनेक समाजकंटक माझ्यावर नाराज आहेत. काही अज्ञातांकडून मला धमक्या आल्या. सुरक्षा पुरवण्याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊनही कारवाई झालेली नाही, असंही पुढे उदय सामंत यांनी पत्रात म्हटलं आहे.
Before You Go
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह






















