एक्स्प्लोर
मलेशियात अडकलेल्या भिवंडीतील तरुणाची सुटका
एजंटने फसवणूक करुन नोकरीसाठी मलेशियात पाठवलेल्या भिवंडीतील तरुणाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मलेशियात अडकलेल्या तरुणाला सोडवले आहे.

भिवंडी : एजंटने फसवणूक करुन नोकरीसाठी मलेशियात पाठवलेल्या भिवंडीतील तरुणाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याशी खासदार कपिल पाटील यांनी संपर्क साधल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने पावले टाकून मलेशियात अडकलेल्या तरुणाची सुटका करण्यात आली आहे. जावेद मन्सूरी असे मलेशियात अडकलेल्या तरुणाचे नाव असून तो भिवंडीत टेलर काम करीत होता. त्याला एका एजंटने मलेशियात बड्या पगाराच्या नोकरीची विविध प्रलोभने दाखवली. त्यानंतर त्याच्याकडून मलेशियात जाण्याचे तिकीट, व्हिसा आदींसाठी 1 लाख 75 हजार रुपये घेतले. जावेदला मुंबईतील विमानतळाऐवजी ओदीशातील भुवनेश्वर विमानतळावरून मलेशियात पाठवण्यात आले, जावेद जेंव्हा मलेशियात पोहचला तेव्हा तेथील एजंटने पासपोर्ट व व्हिसाची कागदपत्रे ताब्यात घेतली. मलेशियामध्ये सुरवातीला जावेदने एका प्लास्टिक कंपनीत काम केले. त्या ठिकाणी त्याच्यावर अमानवी अत्याचार करण्यात आले. हे सर्व सहन करीत तो काम करीत होता. त्याला कामाचा मोबदलाही वेळेवर मिळत नव्हता. त्याने अनेकदा कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र ते शक्य झाले नाही. काही महिन्यांनंतर जावेद कंपनीत जावेद काम करीत होता त्या कंपनीवर मलेशिया पोलिसांनी छापा टाकला. तसेच जावेदकडे कागदपत्रांची मागणी केली. मात्र, कागदपत्रे नसल्याने त्याला चार तासांची मुदत देण्यात आली. या काळात जावेदने सातत्याने काम करीत असलेल्या ठिकाणच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयापुढे उभे करण्यात आले. न्यायालयाने त्याला दोषी ठरवून तीन महिने कैद व दोन कोडे (चाबकाचे फटके) मारण्याची शिक्षा दिली. जावेदला दोन कोडे मारल्यानंतर तो कोसळला. तो पुढील 15 दिवस उभाही राहू शकत नव्हता. जावेद सह 7 ते 8 भारतीय त्या जेल मध्ये अडकले होते. जावेद असलेल्या तुरूंगातून एक भारतीय कैदी सुटला. त्याने जावेदच्या कुंबीयांशी संपर्क साधला आणि त्यांना संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. जावेदच्या कुटुंबियांनी भाजपचे पदाधिकारी नजीर मन्सूरी यांची भेट घेतली. त्यांनी तातडीने भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील यांच्याशी संपर्क साधत त्यांच्याकडे मदत मागितली. यानंतर पाटील यांनी तातडीने ही बाब परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना सांगितली. त्यानंतर केंद्र सरकारची यंत्रणा हलली. मलेशियातील भारतीय वकिलातीने मलेशियन सरकारशी संपर्क साधला. जावेद हा निर्दोष असून, त्याची फसवणूक झाली असल्याची बाब स्पष्ट केली. त्यानंतर जावेदची तातडीने सुटका करण्यात आली. या संदर्भात अवघ्या 15 दिवसांतच कार्यवाही पूर्ण झाल्यामुळे मन्सूरी कुटुंबाने मोकळा श्वास घेतला.
Before You Go
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story






















