Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीसंदर्भात डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती; उपोषण सोडल्यानंतर छत्रपती संभाजीनगरात उपचार सुरू
मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले असून दीर्घकाळ उपोषणामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला आहे. पुढील काही दिवस त्यांना वैद्यकीय देखरेखेखाली ठेवणार असण्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदान येथे उपोषणाला बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी अखेर आपले उपोषण सोडले असून उपचारासाठी ते छत्रपती संभाजीनगरात (Chhatrapati Sambhajinagar) दाखल झाले आहेत. मुंबईवरून परतताच रात्री उशिरा ते गॅलेक्सी रुग्णालयात दाखल झाले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून आराम करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, दीर्घकाळ उपोषणामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला असून पुढील काही दिवस त्यांना वैद्यकीय देखरेखेखाली ठेवणार असण्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
दरम्यान, उपोषण केल्यामुळे जरांगे पाटील यांची प्रकृती नाजूक असल्यामुळे त्यांना किमान दोन आठवडे आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असून त्यांच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या असल्याचही डॉक्टरांकडून सांगण्यात आलंय. उपोषणामुळं मनोज जरांगे पाटील यांनी प्रचंड थकवा जाणवत आहे. तसेच त्यांची स्थिती नाजूक असल्याची माहिती डॉक्टर विनोद चावरे यांनी दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या तब्बेतीत सुधारणा होण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती देखील चावरे यांनी दिली.
मनोज जरांगेंच्या कोणत्या मागण्या मान्य?
हैदराबाद गॅझेट अंमलबजावणीसाठी शासन निर्णय - मान्य
आंदोलनातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत - मान्य
आंदोलनातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी - मान्य
मराठा आंदोलकांवरील केसेस मागे - मान्य
प्रलंबित जात पडताळणीला मान्यता - मान्य
आंदोलकांवरील गुन्हे घेण्यास मान्यता - मान्य
मनोज जरांगेंच्या कोणत्या मागण्या प्रलंबित?
सातारा गॅझेट अंमलबजावणीसाठी - 1 महिन्याची मुदत
मराठा-कुणबी एकच शासन निर्णय - 2 महिन्यांची मुदत
5 दिवसांपासून उपोषण, जरांगे पाटील यांची प्रकृती नाजूक
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या 5 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाच्या माध्यमातून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाची लढाई सुरू केली होती. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची प्रमुख मागणी करत हैदराबाद आणि सातारा गॅझेटचीही मागणी केली होती. यासह, मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची आणि आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या मराठा आंदोलकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व नोकरी देण्याची मागणी केली होती. राज्य शासनाच्यावतीने आज मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह इतर सदस्यांनी आझाद मैदानात जाऊन उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. तसेच, सरकारने आपल्या सर्व मागण्या मान्य केल्या असून मराठा आणि कुणबी एकच असल्याचा शासन निर्णय काढण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी मागितला आहे. तर इतर मागण्याचे शासन निर्णय जारी केले आहेत. त्यानुसार, अखेर शासनाने हैदराबाद गॅझेट आणि इतर मागण्याचे शासन निर्णय जारी केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले.
ही बातमी वाचा:
























